चारोळ्या बिरोळ्या-३२-पाऊस

चारोळ्या बिरोळ्या-३२
■■ पाऊस ■■
मेघराजाच्या प्रेमाला
येते जेव्हा भरती
हिरवीगार सजते
अखंडित ही धरती

पावसाचे अन धरतीचे
घट्ट किती नाते
धुव्वाधार बरसे तो
ती धरी हृदयाते

पाऊस तो बरसणारा
कधी बेधुंद कधी शांत
कधी लहर वाऱ्याची
कधी उत्साह सर्वांगात

आर्त झालेल्या धरेला
सांगा कोणी शांत केले
कुणी पाऊस म्हणे त्याला
कुणी जीवन नाव दिले

काल एक थेंब
पडला धरणीवर
शहारली धरती अन
डोळे लागले अंबरावर

किती युगांचा ऋणानुबंध
झाला ना कधी कमी
येता हा 'सात' जून
त्याची बरसण्याची हमी

तिने पाहिले स्वप्न वेडे
त्याच्या लवकर येण्याचे
त्यानेही मग ठरवले
तिला थोडे छळायचे

काल उन्हाळा गेला
कुणी महिमा न गाईला
चाहूल नुसती पावसाची
कसा मनात राहिला

आर्ततेच्या उरातूनच
फुटतात धुमारे प्रीतीचे
म्हणूनच होते गाणे
धरती अन पावसाचे

का कधी तो राहिला
अन डोळ्यांतून वाहिला
मनीचा भाव वेडा
पावसापरी साहिला

न बोलता तिला कळाली
त्याच्या प्रेमाची भाषा
मृदगंध पसरला चहूकडे
सांगत धरतीची मनीषा

नाही सतावणे, नाही बतावते
ती तर चाल प्रेमाची
नाही समजणार कुणा कधी ही
प्रीत धरती पावसाची

नको अलंकार नको दागिने
काही ओले थेंब दे
नको विरह, नको दुरावे
पर्जन्याचे देणे दे

तप्त जळाली तुझ्या आठवणीत
तिला जलाचे दान दे
बळीराजाने तुज नभी शोधिले
जगण्याचे त्यास साधन दे

वीज बिचारी उगाच तळपे
धरती-पावसाच्या मिलनाने
ढगांचे ढोल वाजत सुटले
सहन ते न झाल्याने

विजेने मग राग काढला
झाडावर कधी माणसांवर
नाही बघितले पडताना
जातो कोण सरणांवर
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
rajesh.khakre@gmail.com

पुस्तक : माझा मित्र

पुस्तक: माझा मित्र
नमस्कार मित्रांनो,
पुस्तक म्हटले की आपल्याला खुप आनंद होतो. पुस्तक आपला मित्र असतो. तो आपली एखाद्या सख्याप्रमाणे सोबत करत असतो, विविधांगी अनुभव देतो, पुस्तक वाचताना आपण लेखकांच्या भावविश्वाशी समरस होतो. विश्वाचा विसर पाडण्याची प्रचंड क्षमता पुस्तकात असते. सारे विश्व आपल्या विरोधी असतानाही आपण पुस्तकांशी मैत्री करू शकतो. पुस्तक आपला एकटेपणा तर घालवतातच पण त्याच बरोबर एक नवीन शक्तिसंचार, नवीन उत्साह आणि नवीन दिशाही देतात. जीवनात आलेली मरगळ घालवायची असेल तर पुस्तक वाचले पाहिजे, संकटाशी सामना करण्यासाठी मानसिक आणि बौद्धिक तयारी करण्यासाठी सुद्धा पुस्तकांशी मैत्री केली पाहिजे. तसेच मनाच्या शांततेसाठी सुद्धा पुस्तक वाचले पाहिजे.ज्यांना ज्ञान कण वेचायचे आहेत त्यांनी तर पुस्तक वाचले पाहिजेच पण ज्यांना काही लिहायचे, व्यक्त व्हायचे, मांडायचे त्यांनी तर पुस्तक वाचलेच पाहिजे. पुस्तक तुमचे अनुभवविश्व समृद्ध करते. कुणीतरी म्हटल्याप्रमाणे " सर्वच अनुभव स्वतः च्या जीवनात घेण्याएव्हढे आपले आयुष्य मोठे नसते, म्हणून आपण इतरांच्या अनुभवावरून पण शिकले पाहिजे..!" प्रत्येक पुस्तक एक अनुभव असतो. तो अनुभव घेण्यासाठी त्या व्यक्तीने सारे आयुष्य खर्ची घातलेले असते. तोच अनुभव एक किंवा दोन दिवसात घ्यायचा असेल तर पुस्तक वाचण्यासारखा सोपा उपाय दुसरा कुठलाही नाही. एकूण काय की माणसाला जगण्यासाठी सुद्धा पुस्तक वाचले पाहिजे म्हणूनच "वाचाल तर वाचाल" असे म्हटले असावे.
राजेश खाकरे

पाऊस आला (बालकविता)

पाऊस आला पाऊस आला
(बालकविता)

पाऊस आला पाऊस आला
ढगांचा गडगडाट झाला
जिकडे तिकडे पाणीचपाणी
मनात हर्ष अपार झाला

पाऊस आला पाऊस आला
सुट्ट्या संपून भरल्या शाळा
किलबिल करी सारी पाखरे
झाडांवरती जमला मेळा

पाऊस आला पाऊस आला
कोकीळ कुहुकुहू गाऊ लागला
गंध मातीचा सवे पसरला
हिरवा अंकुर छान उगवला 

पाऊस आला पाऊस आला
पेरणीचा मौसम आला
लगबग करी धनी घरचा
मैना भाकरी नेई त्याला 

पाऊस आला पाऊस आला
मळभ मनीचा उतरून गेला
हिरवाईने नटली धरती
समृद्धीची किनार त्याला
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
rajesh.khakre@gmail.com

पाऊस (लेख)

पाऊस नुसता मनात झिरपत जायचा
    आज पावसाच्या सरी आल्या, खरं तर यावर्षीचा पहिलाच पाऊस. अगदी वेळेवर आलेला. ते पावसाचे टप टप थेंब आणि सोबत अल्लड वारा, मधूनच चमकणारी वीज. सगळे परिचयाचे असले तरी प्रत्येक वर्षी पहिला पाऊस सुरू झाला की, वातावरणात एक वेगळाच उत्साह येतो. कुठे दूरवर पावसाचे थेंब मातीवर पडून तो मृदगंध वाऱ्यासोबत वाहून आला की तो सुगंध अंगात भिनत जातो. एक अल्लड मुलगी सासरी गेल्यावर जशी दोन-चार तासात एक जबाबदार स्त्री बनते, तसा पाऊस आला की तो तप्त उन्हाळा जाऊन काही तासातच ऋतू पालट होऊन जातो.  पाऊस मला पहिल्यापासूनच प्रिय..अगदी लहानपणापासून... लहानपणी पाऊस आल्यावर घर गळायला लागले की आई, घरातले भांडे पाणी गळणाऱ्या जागेत ठेवायची, कधी खूपच गळायला लागले की, कुठलीशी मोठी कपडे चार बाजूला बांधायची, सर्व पाणी त्यामुळे एका ठिकाणी पडायचे. त्यावेळी पावसाचा राग यायचा. पाऊस पडून गेला किंवा तीन चार दिवस मुक्काम करून गेला की गल्लीत चिखलाची किचकीच व्हायची ते पण आवडायचे नाही. मात्र असे असले तरी पाऊस मात्र आवडायचा. गल्लीतून वाहणारे पुराचे पाणी बघतांना, त्यात होड्या सोडतांना, त्यावर मातीचे धरण करताना, एकमेकांच्या अंगावर पावसाचे गढूळ पाणी उडवतांना, ओल्या मातीचे खोपे आणि घरे बनविताना जाम मज्जा यायची. त्यावेळी किती सहज घर बनायचे. कुठले लोन काढावे लागायचे नाही, हप्ता भरण्यासाठी नोकरी धंदा करावा लागायचा नाही. पाऊस आला की ते सर्व अगदी सहज करता यायचे.
पाऊस पडून गेला की हळूहळू सर्व शिवार हिरवीगार व्हायची. जणू ह्या धरणीमातेने हिरवा शालूच परिधान केलेला आहे असेच वाटायचे. वर गच्च भरून आलेले आभाळ, सभोवतीचा हिरवागार परिसर आणि अशा वेळी अंगावरून थंड हवा गेली की अंगात एक शिरशिरी उठायची. एक सुखद अनुभूती देऊन जायची.
कधी वाटायचे हा पाऊस नुसता पडत रहावा, सतत तीन चार-पाच दिवस, शाळेची अवघड गणितं आणि गुरुजींची ती छडी वाहून जावी पुरात, मग मज्जाच मज्जा, नुसते खेळायचे घरात, मंदिरातल्या मोकळ्या जागेत, वाहणाऱ्या पाण्यात, किंवा दूर डोंगरावरच्या खोंगळ्यातून वाहणारे पांढरेशुभ्र पाणी पाहत नुसते बसून राहावे तासन्नतास. पण नेहमीच तसे व्हायचे नाही. पाऊस एखाद्या पाहुण्यासारखा येऊन मनसोक्त बरसून जायचा पाठीमागे निरभ्र आकाश ठेवून अलगद पसार व्हायचा. मग मित्रमंडळी जमायची अन गोणपाटाचे घोंगटे अंगावर घेऊन सगळी स्वारी गावाशेजारच्या नदीतीरावर जमायची. नदी तिच्या सीमेबाहेर येऊन वाहत असायची. त्या गढूळ पाण्यात मग कित्येक गोष्टी वाहून आलेल्या दिसायच्या.खेकडे, माशा, यासोबतच पालापाचोळा, लाकडे, बाभळी, सगळे काही वाहून यायचे. कधी शेतीची औजारे वाहून जायची. नदीला आणि पावासाला त्याचे सुखदुःख नसायचे. एखाद्या स्थितप्रज्ञासारखे ती दोघेही आपली कामे चोख बजवायची. नदीत सर्व कचरा वाहून जातो म्हणूनच की काय लोकं नदीत अंघोळ करायला जात असावी असे मला कितीतरी दिवस वाटायचे. माणसातला कचरा कदाचित नदीलाही वाहून नेणे शक्य नसावे.
       पाऊस पडून गेला की सगळे कसे ताजे टवटवीत व्हायचे, सगळी घरे, मंदिरे, डोंगरे धुवून निघायची. जणू त्यांनी अंघोळ केली असे वाटायचे. झाडांची पाने तजेलदार दिसायची. पक्षी आपले पंख झटकायला लागली की एवढ्या पावसात कुठे थांबत असतील बिचारे असे मनाला वाटून जायचे.
पावसाळा सुरू झाला की काही दिवसांनी शाळा उघडायची. सुट्ट्या लागल्यावर सुट्ट्या संपूच नये असे वाटायचे.मग शाळा सुरू झाली तरी उगीच दोन-चार दिवस शाळा बुडवायची. नव्या वह्यांना एक वेगळाच सुगंध यायचा. तो ओलसर वास पुन्हा शाळेची गोडी लावायचा.
सुट्टीच्या दिवशी शेळ्यांमागे, गुरांमागे डोंगरावर जायचे. तिकडच्या नाल्यात मनसोक्त पोहायचे.पाण्यात शिवाशिवी खेळायची, दुपार झाली की तिथल्याच एखाद्या काळ्याकुट्ट मोठ्या दगडावर बसून सर्वांनी सोबत आणलेली भाकरी सोडायची.बाजरीची भाकरी, लोणचं आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा खाऊन तृप्तीचा जो ढेकर यायचा तो आजपर्यंत काहीपण खाऊन कधीच आला नाही. भाकर खाल्ली की तिथल्या झऱ्यावर कुठल्याशा दगडाखाली, स्वच्छ थंडगार पाणी खाली वाकून तोंड लाऊन प्यायचे आणि मग खेळायला धूम ठोकायची.जनावरे चरत रहायची आणि मुले खेळत बागडत रहायची. कोणते जीवन चांगले होते या प्रश्नांचे उत्तर मात्र कधीच मिळत नाही.फरक फक्त एव्हढाच होता, तेव्हा जगण्यात सुख होते. आणि आता सुख मिळवण्यासाठी जगतो.
दूरवर पुन्हा आभाळ भरून यायचे. काळ्याकुट्ट ढगांनी अंधारून जायचे. विजांचा कडकडाट व्हायचा. शेतात काम करणारी बाया माणसे लगबगीने घराकडे धावायची.गावाकडे परतत असताना पाऊस मध्येच गाठायचा.सर्वांग ओलेचिंब होऊन जायचे. केसांतून, कपड्यातून, डोक्यातून, पाणी ओघळायला लागायचे. सगळीकडे पाणी वहायला लागायचे. तेव्हा मनात नुसता पाऊस झिरपत जायचा. मनातल्या भावना हिरव्यागार करत जायचा. स्वप्नांना आशेचे नवे पंख दाखवत जायचा. निरुत्साही मनाला नवपल्लवित करत जायचा. मनात नुसता पाऊस झिरपत जायचा..!
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
rajesh.khakre@gmail.com

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...