काय करु रामा,पुन्हा निवडणूक आली

काय करु रामा,पुन्हा निवडणूक आली

रामा रामा रामा, तुझी आठवण झाली
काय करु रामा,पुन्हा निवडणूक आली

तुझे आणि माझे आहे अजब नाते
दर इलेक्शनला तुझे मंदिर आठवते
तुझ्याशिवाय रामा कोण आम्हा वाली
काय करु रामा,पुन्हा निवडणूक आली

मंदिराच्या मुद्द्याला जरी साठ वर्ष झाली
धर्माची जखम आम्हांला करता येते ओली
भावनिक होते दरवेळी जनता ही भोळी
काय करु रामा,पुन्हा निवडणूक आली

त्यांना ना तुझी चिंता ना तुझ्या मंदिराची
फक्त तुंबडी भरायची आहे जनतेच्या मताची
कोर्टाची पायरी आहे रामा तुझ्या भाळी
काय करु रामा,पुन्हा निवडणूक आली
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४

...राहिल्या फक्त आठवणी

राहिल्या फक्त आठवणी
"गेले ते दिवस,राहिल्या फक्त आठवणी" ह्या ओळी कुठल्या मोटार सायकलच्या किंवा ट्रकच्या मागे वाचल्या की मनात उगीच कालवाकालव होते. जगलेल्या क्षणांचे नकळत आठवणीत रूपांतर होत जाते. ते दिवस जगतांना ते नेहमीच चांगले,आनंददायी असतात असे काही नाही; ते कधी आनंददायी असतात तर कधी त्रासदायकही. मात्र त्यांचे आठवणीत रूपांतर होताना ना जाणे कुठून त्यात कोमलपणा,हळुवारपणा येतो. एखादे मऊ पीस गालावरून फिरवावे आणि त्याच्या स्पर्शाने आपण पुलकित होऊन जावे तशीच काही अनुभूती आठवणी देतात.
जीवन म्हणजे जणू आठवणींचे गाठोडेच. अनुभवांचे पुंजके जमा करत आपण जगत असतो. त्यात विविध अनुभव येतात. कधी हर्षाचे तरंग उठतात तर कधी दुःखावेगाने जीव त्रासून जातो. नजर लागावी इतका आनंद तर जगणे मुश्किल व्हावे इतके दुःख, या सुखदुःखाच्या झोपाळ्यावर जणू मानवी आयुष्य झुलत असते.
"रम्य ते बालपण" म्हणत आपण बालपणातल्या आठवणीत गुंग होतो. बालपण किती अल्लड, किती खोडकर, त्याचबरोबर किती निष्पाप किती निर्विवार. पाण्यात होडी सोडण्याइतकी श्रीमंती बालपणानंतर कधी आपल्या जीवनात आलेली नसते. भांडणं, धिंगामस्ती, अभ्यासाचा कंटाळा, शाळा आणि शिक्षकांचा धाक आणि ओढही, नदीकिनारी खेळलेल्या सुरपारोंब्या, पाराशेजारची कबड्डी, आणि खोखो, चोरपोलिस खेळतांना आलेली आपसूक प्रौढतेची जाणीव... आणि भूक लागल्यावर आठवणारे घर आणि आई. सगळं कसं आठवणींच्या कुपीत गच्च भरून ठेवलेलं.
तो कॉलेजचा पहिला किंवा कुठलासा दिवस ...तिची न आपली झालेली पहिली नजरानजर...आणि मग ईश्क,प्रेम की काय म्हणतात ते,त्याची जाणीव होऊन पोटात उठलेला गोड हवाहवासा वाटणारा सुखद गोळा. आणि पुढे मग कित्येक दिवस आणि कित्येक रात्री तिच्या गोड आठवणीत गेलेल्या. तिचा एखादा शब्द ऐकायला मिळावा किंवा तिच्याशी दोन शब्द बोलायला मिळावे यासाठी केलेली धडपड. जगाचे सारे सुख जणू आपल्याच पायाशी लोटांगण घालतेय याची येणारी सुखद अनुभूती. कधी योग आलेला असतांना कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये तिच्यासोबत पिलेला,अमृतालाही लाजवील असा तो कटिंग चहा. सगळं कसं स्वप्नवतच.
जशा तिच्या सोबतच्या आठवणी गोड तशाच ती सोडून गेल्याच्या आठवणी जीवघेण्या,मनावर आघात करणाऱ्या. ती का अशी एकाकी सोडून गेली असेल हा प्रश्न मनाला पुन्हा पुन्हा विचारत जगणे अन तेही तिच्याच आठवणीत, त्या आठवणी मात्र मनाला कुरतडणाऱ्या,मनाला पोखरून टाकणाऱ्या. विरह अग्नीत भस्मसात होतानाही, त्यात समिधा अर्पण करायच्या त्याही तिच्याच आठवणीच्या.
जसे हे एक विश्व असते तसेच एक विश्व असते मैत्रीचे घराबाहेर पडायला लागल्यापासून गल्लीतल्या लंगोटी मित्रांपासून ते शाळा, कॉलेज आणि ऑफिसातल्या मित्रापर्यंत मैत्रीचे विश्व विस्तारलेले. ऑफिसमधली मैत्री काहीशी औपचारिक, थोडीशी शिष्टपणा असलेली. तिला शाळा कॉलेजातल्या मैत्रीची सर नाही यायची. मग जुन्या मित्रांच्या आठवणी घालत बसतात पिंगा आपल्या मनाशी. मित्रांसोबत जगलेले बिनधास्त आयुष्य, केलेली मौजमस्ती, अडी-अडचणीत दिलेला एकमेकांना आधार, कधी केलेली टवाळखोरी, पैसे नसताना जुळवाजुळव करून केलेली पार्टी, ते सगळं जगताना समजायचं नाही की ते ही दिवस सुरेख होते तर, मात्र मोठं होण्याच्या, करिअरच्या नादात ते मैत्रीचं वर्तुळ मागे पडत जातं. मोबाईलच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्येच मित्रांची यादी अडकून जाते आणि मनात उरतात फक्त आठवणी.
घर सोडून बाहेरगावी शिकण्यासाठी जाताना आईने डोळ्याला लावलेला पदर आणि तिच्या आशावादी डोळ्यात भरगच्च भरलेले अश्रू, ताईला सासरी जाण्यासाठी निरोप देताना आलेला गहिवर, शाळा कॉलेजात निरोप समारंभात भाषण करताना जड झालेला आवाज, आपल्या प्रिय व्यक्तीने आपला आणि जगाचा घेतलेला आकस्मात निरोप हे आणि असं बरच काही, सगळं कधीच न विसरता येणारं.
चांगल्या असो वा वाईट आठवणी मात्र मागे राहतातच. कधी छळतात, कधी डोळ्यांच्या कडा पाणावतात. कधी आनंदाचे स्मितहास्य चेहऱ्यावर फुलवतात. कुणी आठवणींवर आपले आयुष्य काढतो, कुणाला आठवणीमुळे आयुष्य असह्य होते. काही लोकं क्षणभर किंवा फारच कमी वेळासाठी आपल्या आयुष्यात येतात. मात्र ह्रदयात एक घर करून जातात. त्याउलट काही लोकं खूप काळ संपर्कात राहूनही आठवण ठेवण्यासारखं काही मागे उरत नाही. आठवण हा भावनेचा खेळ आहे. मनावर उठलेल्या स्पंदनाचा खेळ आहे. गेलेल्या क्षणांची ती मागे उरलेली सावली असते. म्हणून जीवनात जगतांना मनसोक्त जगूया, प्रत्येक क्षण आनंदाने जगूया. प्रत्येक क्षणाचा उत्सव करूया. सुंदर आठवणी निर्माण करूया. कारण दिवस जातात निघून..मागे उरतात त्या फक्त आठवणी..!
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
rajesh.khakre@gmail.com

कुठं गेला रे पावसा (चारोळ्या-बिरोळ्या-३३

चारोळ्या~बिरोळ्या - ३३

कुठं गेला रे पावसा
आता तरी ये ना घरी
पिके गेली वाळून
दुःख शेतक-या उरी
✍🏻 राजेश खाकरे

किती बघावे वरती
जीव होतो खालीवर
कुठे गेला रे पावसा
आता ये ना धरेवर
✍🏻 राजेश खाकरे

तुझं दर पावसाळी
असं दडी मारून जाणं
कुठं गेला रे पावसा
नशिबी देऊन उन्ह
✍🏻 राजेश खाकरे

माय राबते शेतात
बाप मनालाच खातो
कुठं गेला रे पावसा
असं काहून करतो
✍🏻 राजेश खाकरे

सुकली सारी सरकी
तुरीचा पालापाचोळा झाला
उभ्या बाजरीच्या कणसा
एक दाणा नाही आला
✍🏻 राजेश खाकरे

कुठं गेला रे पावसा
असं मध्यात सोडून
हिरव्यागार शिवाराचं
स्वप्न पायदळी तुडवून
✍🏻 राजेश खाकरे

दुष्काळ हा दरसाल
माझ्या भाळी लिहिलेला
कुठे गेला रे पावसा
सोडून तुझ्या लीला
✍🏻 राजेश खाकरे

विहीर पडली कोरडी
कोरड पडली घशाला
कुठे गेला रे पावसा
दुःख ठेऊन उशाला
✍🏻  राजेश खाकरे

केली सुरवात भारी
पिके उगली जोमात
कुठं गेला रे पावसा
त्यांना टाकून कोमात
✍🏻 राजेश खाकरे

पावसाचे नाव घेता
अण्णांच्या डोळा येते पाणी
कुठं गेला रे पावसा
तुझा पत्ता सांगेना कोणी
✍🏻 राजेश खाकरे

असशील तेथून परत ये
तुला रागावणार नाही कोणी
कुठे गेला रे पावसा
सोडून डोळ्यामध्ये पाणी
✍🏻 राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
दिनांक: ५ ऑक्टोंबर २०१८

"विश्वासाची निर्घृण हत्या"


"विश्वासाची निर्घृण हत्या"

विश्वासाचं काय घेऊन बसलात तुम्ही?
विश्वासाची केव्हाच झाली निर्घृण हत्या
आरोपी फरार वगैरे नाही
आरोपी सरेआम फिरत असतो
तुमच्या आमच्यात राजरोसपणे
तो पकडला जात नाही
आणि कधी पकडलाही जाणार नाही
कारण खूप "विश्वासात" घेऊन करत असतो तो
विश्वासाची हत्या
मामला खूप जवळचा होऊन जातो
डोळे झाकून विश्वास ठेवावा इतका
उगीच प्रत्येकवेळी सांशक होऊन जगावं
इतकं उथळ नसावं आयुष्यानं
कुठेतरी शाश्वती असावी माणसाला
त्याच्यासोबतच्या अपेक्षित वागण्याची
कधी शांतपणे डोके धरतीवर टेकून
आकाशाकडे बघताना
मनाला नसावी धास्ती
कुणी डोक्यात धोंडा घालण्याची
बऱ्याचवेळा त्या धोंड्यापाठीमागच्या हातांचेच
बोट धरून तुम्ही दाखवलेला असतो मार्ग
त्याच्या उन्नत जीवनाचा
मात्र ती जाणीव नाही राहत त्या हातांना
ते दाखवतातंच हात वेळ आली की
अशा कित्येक हत्या रोजच होतात विश्वासाच्या
मग नाही ठेवावा वाटत विश्वास कुणावर
पुन्हा हत्या होईल या भीतीने
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४

टिव्हीवरची भांडणं

टिव्हीवरची भांडणं
●●●
लहानपणी मला
भांडणं बघायला आवडायची
गल्लीत भांडणं लागली की
मी चवीने बघायचो,
मला आजही
भांडणं बघायला आवडतात
पण सध्या गल्लीत जास्त भांडणं होत नाहीत
त्यामुळे बघायला मिळत नाही
मग मी टीव्ही चालू करतो,
न्यूज चॅनल लावतो
तिथे बरेच शिकलेले वगैरे
तज्ञ वगैरे
प्रवक्ता वगैरे लोक
समाजाचे, धर्माचे
ठेकेदार वगैरे
बसलेले असतात
खूप भांडणं करतात,
एकमेकांवर धावतात,
जोरजोराने ओरडतात
ते कुठल्याही गोष्टीवर भांडू शकतात
आपले प्रखर वगैरे मत मांडू शकतात
कधी कारणांवर कधी विनाकारण
त्यांचं चालूच असतं भांडण
दिवसभरात कुठे न कुठे काहीतरी होतंच असतं
कुणीतरी एखादा शब्द जिभेवरून घसरंवत असतंच
ते त्यातूनच शोधतात एखादा विषय
घंटाभर भांडायला
चांगली असतात ही भांडणं
कधी बोअर वगैरे झालो की
मी बघतो त्यांची भांडणं
मला ही भांडणं बघायला
जाम मजा वगैरे येते
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
rajesh.khakre@gmail.com

आज पुन्हा एकदा माझ्या शाळेत आलो

परत एकदा सर मी तुमचा विद्यार्थी झालो
आज पुन्हा एकदा माझ्या शाळेत आलो

शिकलो, सवरलो, पडलो, धडपडलो
तुमच्या प्रेमछायेत रोज रोज घडलो
म्हटली प्रार्थना, राष्ट्रगीतही म्हटले
पाढे पाठ होण्यास सर तुम्ही झटले
तुमची शिकवण म्हणून संकटास न भ्यालो
आज पुन्हा एकदा माझ्या शाळेत आलो

जीवनाच्या शाळेपेक्षा ही शाळा चांगली होती
मोकळे होते आभाळ सर्व खरंच चंगळ होती
हसणं, खेळणं, अभ्यास करणं,आणि उनाड फिरणं
मित्रांसोबतची धमाल, कधी उगीच खोड्या करणं
ते सर्व आठवतानाच भान हरपून गेलो
आज पुन्हा एकदा माझ्या शाळेत आलो

आज पुन्हा त्या वर्गात सर मला बसुद्या
काही अवघड गणितं अन हातावर छडी द्या
मधल्या सुट्टीत धावतपळत जेवायला जाऊ द्या
बाजरीची भाकरी अन मिरचीचा ठेचा खाऊ द्या
ती अवीट चव मी पुन्हा चाखायला आलो
आज पुन्हा एकदा माझ्या शाळेत आलो

काही क्षण असतात जगण्याचे ते असे भरून घ्यावे
आयुष्यभर पुरतील असे मित्र जोडून घ्यावेत
शिकावं जीवनाचं सार चार भिंतीच्या शाळेत
जगण्यास बळ देणाऱ्या गुरूंचे आशीर्वाद पाठीशी घ्यावेत
ही सर्व शिदोरी मी पुन्हा घ्यायला आलो
आज पुन्हा एकदा माझ्या शाळेत आलो

कितीही मोठा झालो तरी मी लहानच ठरतो
शाळा आणि शिक्षकांची आठवण नेहमीच करतो
उर येतो भरून जेव्हा तुमचे प्रेम स्मरतो
विद्यार्थी मी तुमचा आहे अभिमानाने सांगतो
या कृतार्थ सोहळ्याने मी कृतकृत्य झालो
आज पुन्हा एकदा माझ्या शाळेत आलो

धन्यवाद सर तुमचे,धन्यवाद तुझे शाळा
तुमच्यामुळे झाला हा जगण्याचा सोहळा
फिरुनी फिरुनी जन्मू आम्ही, येऊ तुमच्या अंगणात
भरभरून ज्ञान आणि शक्ती देई मनगटात
आज परत मी, लहान बालक झालो
आज पुन्हा एकदा माझ्या शाळेत आलो
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
rajesh.khakre@gmail.com


लायकी...


लायकी...

माणसाची लायकी नसते त्याच्या जवळच्या पैशावर अवलंबून
नसते तो किती दादागिरी करु शकतो त्यावर
माणसाची लायकी समजते त्याच्या वागणुकीवरुन
तो किती प्रामाणिक आहे नीतिमत्तेशी,
तो स्वार्थासाठी कोणत्या थराला जातो यावरुन.
तो वास्तव नाकारून त्याच्या स्वत्वाचा बळी तर देत नाही ना यावरुन.
स्वतः चा स्वार्थ तर पशुनांही समजतो. पण माणूस म्हणजे पशु नाही.सत्य हे चिरंतन शाश्वत असते.सत्यावर क्षणभर निर्लज्जपनाचा पडदा टाकताही येईल कदाचित; पण म्हणून सत्य झाकाळले असे नाही म्हणता येत.
जग तुमच्या कृतिचा त्यांना अनुकूल असा अर्थ लावत असते.परंतु तुमची कृति योग्य की अयोग्य हे मात्र दोन लोकानांच माहीत एक आपण स्वतः अन दुसरा तो सर्वसाक्षी चिरंतन भगवंत!
माणसाने त्याची लायकी सोडावी की धरावी हा ज्याचा त्याचा प्रश्न;परंतु त्याने परिणामासाठी मात्र सदैव तयार असले पाहिजे! हे परिणाम त्याला भोगावे मात्र नक्की लागणार! भगवंताचे एक न्यायालय या सृष्टीत काम करते.त्याला तुम्ही नियती म्हणा, नशीब म्हणा,ते मात्र कुणाला कधीच क्षमा करत नाही. आणि येथे कुठल्या साक्षी पुराव्याची गरज नसते.नियती लाच घेत नाही.तुमची घसेओरड करायची तेथे गरज नसते.मात्र तिथला न्याय म्हणजे न्याय असतो.तिथे कुठले अपील नसते. कुठला फेरविचार नसतो.मात्र जे काही असते ती भगवंताची अतिशय उत्कृष्ट अशी न्यायिक व्यवस्था असते.
©राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

पोथी जीवनाची


आमल्या गावातील ज्येष्ठ नागरिक साहेबराव पाटील कोळगे ( दादा) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यावेळी त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी लिहीलेला हा लेखप्रपंच व शब्दरुप श्रद्धांजलि जानेवारी 2016)
 
पोथी जीवनाची

"अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र...."या ओळी कानावर पडल्या की गावात प्रत्येकाला कळायचे की पोथी सुरु झाली म्हणून.आणि अर्थातच पोथीला जाणार्याची लगबग सुरु व्हायची.
काठी टेकत टेकत कोंडीबाबा कधीच मंदिरात पोचलेला असायचा.त्यांच्याच बाजूला पोलिस पाटील, लक्ष्मण बाबा ,बुवा महाराज,वारीक मामा ही मंडळी बसलेली असायची.आणि समोर इतर लोक आणि मुलांना सावरत बसलेल्या स्रिया यांची गर्दी असायची.मंदिराच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या सभागृहात हा अलौकिक सोहळा गेली कित्येक वर्षे चालायचा.याच ठिकाणी रामायणातला राम ,भागवत आणि हरिविजय मधला श्रीकृष्ण यांची अख्ख्या गावाला ओळख झालेली.याच ठिकाणी कधी श्रीकृष्ण जन्म सोहळा तर कधी रामजन्माची लगबग असायची.आताच्या सारखी टीव्हीवर चे फारसे कार्यक्रम नसायचे त्यामुळे दिवसभर शेतात राबुन आलेल्या जीवाला हा एक विरंगुळा ही असायचा.त्याचबरोबर रामायण,महाभारत,इत्यादि ग्रंथातील पात्रांशी समरस होण्याची संधी सर्वाना मिळायची.त्या कथेतील पात्रे जणू आपल्या समोरच वावरताय या थाटात मांडणी करण्याची दादांची हातोटी यामुळे पोथी ऐकतानी सारा श्रोतृवर्ग त्यात गुंतून जायचा.क्षणभर आयुष्यातील समस्त चिंताचा विसर पडायचा.दिवसभराचा शिणभाग हलका व्हायचा.आणि ओढ़ लागायची उद्याच्या अध्यायाची.
      पोथी वाचाताना प्रत्येक विषय समजाउन सांगण्याची  दादांची एक शैली होती.त्यामुळे प्रत्येक विषय ऐकणार्याला सोपा अन आपला वाटायचा.दादांच्या आवाजातही एक विलक्षण प्रभाविपणा होता.त्यामुळे भारदस्त पण मृदु आवाजामुळे तो आवाज कानात भरुन रहायाचा.
  गावात पोथी चालू असताना सूतक पडले की दादांना पोथी वाचता यायची नाही आणि मग त्यांच्याजागी बसून पोथी वाचण्याची हिम्मत कोणात नसायची पण नाइलाजाने कस तरी तेवढे दिवस उरकावे लागायचे.
पोथी आणि दादा हे जणु समिकरणच झालेले.पोथीबरोबर हरिपाठ, काकड़ आरती, भजन,कीर्तन यात सहभाग तर असायचाच पण पोथीवाचन हा विषय आला की मग कुणाच्याही ओठावर एकच नाव येणार!
  आणि आजही प्रत्येकाच्या ओठावर ते एक नाव आणि एक अलौकिक हळहळ आहे. शेवटी काय प्रत्येकाला च त्या विश्वनियंत्याकडे एक दिवस जीवनाचा हिशोब द्यायला जायचेच आहे.कोणी जीवनाची पोथी वाचतो तर कोणाचे जीवनच एक पोथी बनून जाते.
-राजेश खाकरे

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...