कविता: चालत आलो वाट

चालत आलो वाट कुठेही वळली नाही
तिच्या मनातील गुपिते कधीच कळली नाही

तुझ्यासारखा नाही कुणी, ती मला म्हणाली
हसलो नुसता,अजून इथे तू रुळली नाही

ठिगळे लावून केली आईने रोजंदारी
रुतला काटा जखम तिची भळभळली नाही

रात्र वाढता पांगून गेल्या सर्व चांदण्या
ध्रुवताऱ्याची जागा कधीच ढळली नाही

कशास दोष द्यावा नुसत्या सुगंधाला
हवी तितकी फुले अजून फुलली नाही

दिसतो मनाचा तळ कधीतरी खोलवर
वाटते तितकी जिंदगी आपली मळली नाही
© राजेश खाकरे, मो.७८७५४३८४९४
दिनांक: १६/१२/२०१९

भावपूर्ण श्रद्धांजली

भावपूर्ण श्रद्धांजली

इथल्या राजकारणाला
राजकारणातल्या निष्ठेला
सत्तेच्या लालसेला
भावपूर्ण श्रद्धांजली..!

इथल्या चढाओढीला
खुर्ची ओढाओढीला
त्यांच्या फोडाफोडीला
भावपूर्ण श्रद्धांजली..!

जनतेच्या मताला
बहुमताच्या भुताला
त्यासाठीच्या गणगोताला
भावपूर्ण श्रद्धांजली..!

विकासाच्या वाटेला
प्रगतीच्या भेटीला
अंगठ्या जवळच्या बोटाला
भावपूर्ण श्रद्धांजली..!
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
२४ नोव्हेंबर २०१९

हे नाराज आहेत, ते नाराज आहेत!

हे नाराज आहेत, ते नाराज आहेत,
फक्त जनता नाराज नाही होत कधीच!
ती सज्ज आहे हातात फुलांचा हार घेऊन
कुणाच्या गळ्यात घालायचा म्हणून!
पण अजून लोकांना कळलच नाही
कोणत्या उमेदवारापुढे कोणतं चिन्ह आहे म्हणून!

पक्ष बिक्ष या सगळ्या अंधश्रद्धा उरल्यात आता.
तिकीट देणारा पक्षच आपला खरा पक्ष असतो;
हे कळलंय आता त्यांना, त्यांना उगीच बंडखोर म्हणून
हिणवू नका!

निष्ठावंत वगैरे काही नसतं कधी. फक्त असतं ते 'निसटा-वंत'
एक उपरणे खिशात ठेवणाऱ्याचा जमाना नाही ऱ्हायला आता!

काल एकाने विचारलं, "ते प्रचार कधी चालू होणार आहे?"
"का बरं?" मी उत्सुकतेने विचारलं!
"दुसरं काही नाही, दहा बारा दिवस मजेत जातात!"
"तू कुठल्या पार्टीचा आहेस का?"
"नाही भाऊ, मी फक्त पार्टीचा आहे!"
"अजून वेळ आहे!"
"कशाला?" त्याचा प्रतिप्रश्न..
"सगळं काही सुरू व्हायला!"  मी काय सांगणार दुसरं!
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४


प्रेम आणि मैत्रीचे भांडण


प्रेम आणि मैत्रीचे भांडण
●●●
प्रेमाचा आणि मैत्रीचा सुरू जाहला झगडा
तुझ्या न माझ्यामध्ये म्हणे कोण आहे तगडा

दोन जीवाची प्रीत माझी जगात आहे नांदते
प्रेमानेच दोन मनांची जवळीक म्हणे साधते

प्रेम असते हवा गुलाबी प्रेम असते अत्तर
जीवनात प्रेमापेक्षा सांगा काय बेहत्तर?

प्रेमासाठी वाट्टेल ते करण्या माणूस धजतो
म्हणूनच प्रेम म्हणाले, मीच मोठा ठरतो

हसून म्हणाली मैत्री, खरेच आहे मित्रा
तुझ्याशिवाय फुलत नाही जीवनाची जत्रा

कटू आहे पण सत्य सांगतो, तुला तुझी महती
तुझ्यामुळेच दररोज ती, कितीक ह्रदये तुटती

भंगलेले ह्र्दय ते मग माझ्याच दारी येते
मित्रांकडे मैत्रीचा आश्वासक हात मागते

मैत्री घालते हळूच फुंकर, ह्रदयाशी कुरवाळते
काळजी नको करुस मित्रा! मी आहे ना म्हणते

मैत्री नसते सिजनेबल, नसते स्वार्थापुरती
लंगोटी घातल्यापासून सोबत करते मैत्री

सगळे जातील सोडून, दिवस पालटताना
मैत्रीचा दीप तुला दिसेल सोबत जळताना

मैत्रीला ना जात असते, ना लहान मोठेपणा
मित्रांशिवाय कुठे असतो, अर्थ ह्या जीवना?

प्रेमाचा अन मैत्रीचा मिटेना काही तंटा
दोघांनी वाजवली "विश्वासा" च्या दाराची घंटा

दोघांचाही एकच प्रश्न म्हणाले 'उत्तर सांगा?'
प्रेमाने की मैत्रीने, जास्त कुणी दिला दगा?'

दुखावलेल्या भावना घेऊन 'विश्वास' बाहेर आला
प्रेमा तुझा नाही भरवसा मैत्रीने डाव जिंकला
© राजेश खाकरे
मैत्री दिन, दिनांक: ४ ऑगस्ट २०१९

प्रेम आणि मैत्रीचे भांडण


प्रेम आणि मैत्रीचे भांडण
●●●
प्रेमाचा आणि मैत्रीचा सुरू जाहला झगडा
तुझ्या न माझ्यामध्ये म्हणे कोण आहे तगडा

दोन जीवाची प्रीत माझी जगात आहे नांदते
प्रेमानेच दोन मनांची जवळीक म्हणे साधते

प्रेम असते हवा गुलाबी प्रेम असते अत्तर
जीवनात प्रेमापेक्षा सांगा काय बेहत्तर?

प्रेमासाठी वाट्टेल ते करण्या माणूस धजतो
म्हणूनच प्रेम म्हणाले, मीच मोठा ठरतो

हसून म्हणाली मैत्री, खरेच आहे मित्रा
तुझ्याशिवाय फुलत नाही जीवनाची जत्रा

कटू आहे पण सत्य सांगतो, तुला तुझी महती
तुझ्यामुळेच दररोज ती, कितीक ह्रदये तुटती

भंगलेले ह्र्दय ते मग माझ्याच दारी येते
मित्रांकडे मैत्रीचा आश्वासक हात मागते

मैत्री घालते हळूच फुंकर, ह्रदयाशी कुरवाळते
काळजी नको करुस मित्रा! मी आहे ना म्हणते

मैत्री नसते सिजनेबल, नसते स्वार्थापुरती
लंगोटी घातल्यापासून सोबत करते मैत्री

सगळे जातील सोडून, दिवस पालटताना
मैत्रीचा दीप तुला दिसेल सोबत जळताना

मैत्रीला ना जात असते, ना लहान मोठेपणा
मित्रांशिवाय कुठे असतो, अर्थ ह्या जीवना?

प्रेमाचा अन मैत्रीचा मिटेना काही तंटा
दोघांनी वाजवली "विश्वासा" च्या दाराची घंटा

दोघांचाही एकच प्रश्न म्हणाले 'उत्तर सांगा?'
प्रेमाने की मैत्रीने, जास्त कुणी दिला दगा?'

दुखावलेल्या भावना घेऊन 'विश्वास' बाहेर आला
प्रेमा तुझा नाही भरवसा मैत्रीने डाव जिंकला
© राजेश खाकरे
मैत्री दिन, दिनांक: ४ ऑगस्ट २०१९

लव्ह यु कविते, लव्ह यु जिंदगी

लव्ह यु कविते..लव्ह यु जिंदगी..!
●●●
आज एका मित्राने सहज विचारलं, "एवढ्या व्यापात कविता कशी सुचते?"
मी नुसतं स्मितहास्य केलं.
खरं तर कविता सुचायला व्यापच लागतो. मनात एक अस्वस्थता निर्माण व्हावी लागते. उन्हाच्या काहिलीसारखी तगमग झाली की कविता बाहेर येते. चरख्यात ऊस पिळवटून निघाल्यावर रस बाहेर यावा, तसे कळत नकळत मन पिळून, पोळून निघाले की कविता अवतरते. बोलतांना, सांगतांना शब्दांना मर्यादा येतात. आपली भावना समोरच्याला सांगतांना ती त्यांच्यापर्यंत हवी तशी पोहचतेच असे नाही. किंबहूना बरेच बोलूनही मनात खूप काही मागेच राहून जाते. शब्द फाफटपसारा निर्माण करतात. कवितेचे तसे नसते. ती बाहेर येते तीच परिपूर्ण होऊन. अगदी कमी शब्दांत खूप काही पोहचवते समोरच्यापर्यंत. कविता अनेक पैलूंनी पोहचते सगळ्यांपर्यंत. कविता भावनेत ओथंबून निघते. तिला कायदे कानून समजत नाही. कवितेला युक्तिवाद समजत नाही, तिला मनाचा सच्चेपणा समजतो. भावनेचा ओलावा समजतो. म्हणून कविता वाचल्यावर काही क्षण माणूस शांत होतो. स्वतः च्या आत डोकावतो. त्याला एक तृप्ततेची अनुभूती येते.
कविता शब्दांची ओळ नसते. ती एक अभिव्यक्ती असते. कवितेला जन्म देऊन कवी मातृत्व प्राप्तीची अनुभूती घेत असतो. ती अनुभूती अवर्णनीय असते. कारण कविता जन्मण्यापूर्वी कवीने प्रसववेदना सहन केलेल्या असतात. त्या कराव्याच लागतात. त्याशिवाय मजाच नाही. कवितेचे सीझर करता येत नाही. तिला प्रसवूच द्यावी लागते नैसर्गिकपणे; त्याशिवाय कवित्वच नाही.
कुणी चांगले म्हणेल म्हणून आई मुलाला जन्म देत नाही, तिला आनंद वाटतो म्हणून ती मुलाला जन्म देते. कवितेचेही तसेच, कविता कुणाला आवडेल म्हणून कवी कविता लिहीत नाही, तो त्याच्या आनंदासाठी लिहितो. हा आनंदाचा मार्ग आहे.
लुच्चेगिरीने भरलेल्या या जगातून कधी दमून भागून मनाच्या पायथ्याशी बसलं की, कविता तिच्या कोमल हातांनी अंतःकरणाला अलगद स्पर्श करते आणि आतला सगळा कचरा झाडून पुसून दूर होतो.  एखाद्या पाऊस पडून गेल्यानंतर स्वच्छ झालेल्या रस्त्याप्रमाणे मन स्वच्छ होते. सगळ्या भावभावना उचंबळून बाहेर येऊ बघतात. संघर्षाच्या विजा कडकडू लागतात. धो-धो कोसळणाऱ्या पावसाप्रमाणे मन बरसू लागते आणि त्याची एक सुंदर कविता होते. सगळं कसं प्रसन्न प्रसन्न होतं, पाऊस पडून गेल्यासारखं..
लव्ह यु कविते...लव्ह यु जिंदगी..!
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४

इंग्लिश स्कुल (कथा) भाग-५ (अंतिम भाग)

इंग्लिश स्कुल (कथा)
लेखक © राजेश खाकरे
भाग-५ (अंतिम भाग)

दूरवरून येणाऱ्या गाड्यांच्या ताफ्याकडे सर्वांची नजर गेली; तसे सर्वांनी तिकडे आश्चर्याने बघितले. नंदू आणि त्याचे सहकारी दुपारच्या जेवणानंतर विहिरीच्या बाजूला असलेल्या झाडाच्या सावलीत गप्पा करत बसले होते. सूर्य आग ओकत होता. त्या कडक उन्हात कच्च्या रस्त्याने आलेल्या गाड्या आपल्या सभोवताली धुळीचा लोट पसरवत होत्या. थोड्याच वेळात तो ताफा बांधाजवळ येऊन थांबला. लाल दिव्याच्या गाडीतून तरुण वयाचे कलेक्टर खाली उतरले. तसे सर्वजण आदबीने आपापल्या गाड्यातून खाली उतरुन त्यांच्या सभोवताली चालू लागले.
जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळ आणि बोंडअळी यांची पाहणी करण्यासाठी कलेक्टर साहेब वेगवेगळ्या गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करत होते. लवकरच शासनाला त्यासंदर्भात त्यांना एक अहवाल सादर करायचा होता.
नंदू आणि त्याचे सहकारी लगोलग उठून त्यांच्यात जाऊन सामील झाले.
जवळच्याच एका कापसाच्या शेतात सर्वजण शिरले. कलेक्टर स्वतः कापसाची बोंडे उघडून बघत होते. नुकसानीचा अंदाज घेत होते.गावातील सरपंच व ज्येष्ठ मंडळी त्यांना नम्रतेने माहिती देत होती.  त्यांनी आपला मोर्चा विहिरीकडे वळवला. तळ गाठलेल्या विहिरी त्यांना दुष्काळाच्या दाहकतेची साक्ष देत होत्या.
थोड्या वेळाने सर्वजण तिथल्याच एका झाडाखाली जमले. समोर कलेक्टर साहेब, बाजूला काही अधिकारी मंडळी, सरपंच आणि काही ग्रामस्थ. कलेक्टर साहेबांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. समस्या जाणून घेतल्या. लवकरच त्याबाबत शासनाला कळवून उपाय केले जातील असेही सांगितले.
"अजून कुणाचे काही प्रश्न असतील तर सांगा?" कलेक्टर साहेब समोरील ग्रामस्थाकडे निर्देश करत म्हणाले. तसा नंदूने हात वर केला.
"साहेब माझा एक प्रश्न होता!" नंदू उभा राहत म्हणाला.
"हो,हो, विचार" कलेक्टर साहेबांनी परवानगी देत म्हटले.
"साहेब, आपण एवढे मोठे कलेक्टर झालात, जिल्ह्याचे बॉस झालात, तुम्ही इंग्लिश स्कुललाच शिकले असतान ना?" नंदूच्या या अनपेक्षित प्रश्नाने कलेक्टर साहेबांना काहीसे आश्चर्य वाटले. समोर थोडासा हशाही पिकला. पण कलेक्टर असल्याने कुठलीही परिस्थिती आणि प्रश्न  सकारात्मकतेने हाताळण्याची कला त्यांच्याकडे होती. थोडेसे स्मितहास्य करत ते म्हणाले,
"नाही, माझे शिक्षण मराठी शाळेत झाले.पण तुला असा प्रश्न का पडला?"
"साहेब, लोक असं म्हणतात की मराठी शाळेपेक्षा इंग्लिश स्कुल भारी असते म्हणून विचारलं" नंदू म्हणाला.
"त्याच काय आहे, एखादी शाळा हलकी की भारी हे आपण नाही ठरवू शकत. म्हणजे,शिक्षण म्हणजे काय असतं, 'टू ड्रॉ  आऊट' म्हणजे आपल्या आत जे आहे ना ते बाहेर काढणं... आता तुला कसं समजावू,..मला सांग तू काय काम करतो?"
" साहेब, ही विहीर आहे ना, तिच्यात आडवे बोर घेण्याचे काम करतो मी सध्या"
"ओके गुड..आता बघ, तू आता बोर घेतला तर पाणी येते का?" कलेक्टर साहेबांनी विचारले.
"साहेब, आतच पाणी नाही तर बाहेर कुठून येणार" नंदू सहजतेने बोलून गेला.
"Exactly, जर आत असेल तरच बाहेर येणार. शिक्षण,शाळा, आपल्या आत असलेल्या कला, गुण, यांना बाहेर काढते, फुलविते आणि आपल्याला एक चांगला माणूस बनविते. ती आपल्याला लायक बनविते. आणि शिक्षणाच्या माध्यमाबद्दल अधिक विचार करायचा तर प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून असावे असे रवींद्रनाथ टागोर म्हणतात..! मला सांगा आपण स्वप्न कोणत्या भाषेत बघतो..आपल्या मातृभाषेत..मुले इंग्लिश माध्यमात जरी शिकत असली तरी प्रश्नांचे उत्तर देताना ती विचार मात्र स्वतःच्या मातृभाषेतच करतात.. कारण जन्मापासून ते मातृभाषेशी जोडलेले असतात. याचा अर्थ असा नाही की त्यांना इतर भाषा शिकवायच्या नाहीत; नक्कीच शिकवायच्या. मात्र शिक्षणाचा उद्देश आणि बाल मानसशास्राचा विचार करायचा झाल्यास प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे असेच कुणालाही वाटेल." कलेक्टर साहेबांच्या अभ्यासपूर्ण बोलण्याने सर्वचजण भारावून गेले होते. नंदूच्या मनातील शंकेच्या निमित्ताने सर्वानाच अतिशय मौलिक ज्ञान मिळाले होते.

नंदूला यापूर्वीही अनेकवेळा हा प्रश्न पडला होता आणि त्यांनी तो बर्याचजणांना विचारला सुद्धा होता. मागे एकदा बाहेर गावाहून येतांनी जिल्हा परिषद शाळेच्या देशमुख सरांनी त्यांच्या मोटार सायकलवर नंदूला लिफ्ट दिली होती. तेव्हा गप्पाच्या ओघात तो देशमुख सरांना म्हणाला होता,
"तुमची मुले, इंग्लिश स्कुललाच असतील, नाही सर"
"हो नंदू, पण का बरं विचारलं?"
"म्हणजे इंग्लिश स्कुल मराठी शाळेपेक्षा भारी असते ना म्हणून"
" तसं काही नाही नसतं..उलट मला तर मराठी शाळाच जास्त आवडते."
"खोटं सांगता सर तुम्ही, तसं असतं तर मग तुमची मुलं मराठी शाळेत नसती घातली का तुम्ही!"
"खरं सांगू का नंदू...आम्ही हे जे शिकलेले, नोकरीवाले, मोठमोठे पगारवाले लोकं आहोत ना...आमच्या प्रतिष्ठा, मोठेपणा याच्या काही कल्पना रूढ झालेल्या आहेत. एका बेगडी व्यवस्थेचे आम्ही बळी झालेलो आहे.मी ज्या गल्लीत राहतो, तिथल्या सगळ्या पालकांनी त्यांची मुले इंग्लिश स्कुलला घातली म्हणून मीही घालतो. आमचे एक परिमाण आम्ही ठरवून टाकले, जेवढी जास्त फीस तेवढी मोठी शाळा, तेवढाच आमचा मोठेपणा आणि तेवढे आमच्या मुलाचे शिक्षण भारी. उद्या जर मी माझ्या मुलाला मराठी शाळेत घातले तर माझ्या आजूबाजूची लोकं मला हसतील.मी कंजूष आहे म्हणून हिणवतील.अरे बाहेरचं जाऊदे 'तुम्हांला मुलाच्या भवितव्याची पर्वा नाही' म्हणून माझी बायकोच मला टोमणे मारील. एवढी हिंमत नाही रे माझ्यात या सर्वांचा विरोध पत्करण्याची."
देशमुख सर पोटतिडकीने बोलत होते..कितीतरी दिवसांनी त्यांच्या पोटातल्या जाणिवा ओठावर येत होत्या. ते पुढे म्हणाले,
" नंदू, शिक्षणाचा नुसता बाजार होऊन बसला आहे. एक चांगला माणूस तयार व्हावा, हा शिक्षणाचा उद्देश शिकवला आम्हांला आमच्या डि.एडच्या अभ्यासक्रमात..पण आज शिक्षण म्हणजे नोकरी मिळवण्यासाठीची खटाटोप. अशीच परिस्थिती होऊन बसलीय. प्रत्येकाला इंग्लिश शिकायची ती इंग्लिशवर फार प्रेम आहे म्हणून नाही तर इंग्लिश शिकून चांगली नोकरी आणि चांगला पैसा मिळेल म्हणून"
"मग सर त्यात काय वाईट आहे, पैशासाठी तर चालू आहे ना हे सर्व?"
" पैसा हे साधन आहे, ते जीवनाचे साध्य नाही. शिक्षण करून नोकरी मिळेल, रोजगार मिळेल, किंवा कामधंदा करावा लागेल पण तो आपल्याला आवडणारा असावा, त्यात आपले मन रमावे, ते काम करतांना थकवा, त्रागा नाही तर आनंद मिळावा. पण आज तसे होते काय? ज्याला रक्त बघून चक्कर येते; त्याचा बाप त्याला डॉक्टर होण्यासाठी रेसमध्ये उतरवतो, गणित ज्याच्या डोक्यावरून जाते त्याला इंजिनीयर बनविण्यासाठी त्याचा बाप धडपडतो. हा सर्व घोडेबाजार चालू आहे. आमच्या सर्व मुलांना आम्ही रेसचे घोडे आणि पाठांतराचे पोपट बनवत आहोत."
"मग नेमके काय व्हायला पाहिजे सर?"
"नंदू, आपण आपल्या मुलांना फक्त चांगले शिक्षण द्यायला पाहिजे, पुढे त्यांनी काय बनायचे हे आपण त्यांच्यावर सोडून द्यायला पाहिजे. म्हणजे तो डॉक्टर बनो, इंजिनीयर बनो, वकील बनो, शिक्षक बनो, कलाकार बनो, शेतकरी बनो, किंवा एखादा व्यवसायिक बनो, मग तो जे काही बनेल, जे काही शिकेल त्यातून पैसा तर कमवेलच पण त्याहीपेक्षा त्याने निवडलेल्या कामात त्याला आवड असेल आणि त्याला समाधान मिळेल."
"बरोबर आहे सर तुमचं म्हणणं" नंदू मान डोलवत म्हणाला.
"सर आणखी एक प्रश्न होता, ईचारू का?" नंदूने पृच्छा केली.
"हो विचार ना..!"
"सर मला एक कळत नाही, आपल्या कडल्या पोरांना इंग्लिश कठीण जातं, मग हे डॉक्टर इंजिनीयर होण्यासाठी जे शिक्षण लागतं ते मराठीत, हिंदीत नाही का? म्हणजे नसेल तर, तशी व्यवस्था नाही होऊ शकत का? आता बघा मी दवाखान्यात गेलो की डॉक्टर मला इंजेक्शन टोचतो, त्याची कुठली भाषा थोडी असते की मला त्यांनी अमुक भाषेत इंजेक्शन दिल म्हणून,आणि त्याला फक्त एवढंच शिकावं लागेल ना की इंजेक्शन कसं द्यायचं ते.मला ज्या गोळ्या देतात त्यावर इंग्रजीत लिहिलेले असते ते मराठीत, हिंदीत लिहिता येणार नाही का? .आणि मी पण माझं दुखणं त्यांना मराठीतच तर सांगतो.!"
एका चौथी शिकलेल्या नंदूच्या बुद्धीची विचार करण्याची क्षमता बघून देशमुख सरांनाही आश्चर्य वाटले. असा प्रश्न त्यांनाही आजपर्यंत कधी पडला नव्हता.
त्यांना ती कल्पनाही भन्नाट वाटली. ती कल्पनाच पुढे वाढवत ते मनाशीच विचार करू लागले  'समजा जो अभ्यासक्रम असेल तो तिन्ही भाषेत उपलब्ध केला, इंग्रजी, हिंदी, मराठी, जो मराठी भाषेतून शिकेल त्याला महाराष्ट्रापुरते डॉक्टर होता येईल, जो हिंदीत शिकेल त्याला भारतापूरते आणि जो इंग्रजीमध्ये शिकेल त्याला भारत आणि कदाचित बाहेरदेशात डॉक्टर होता येईल. आणि एका भाषेतील अभ्यासक्रम, नवनवीन संकल्पना भाषांतरित करणे आजच्या काळात अवघड तर नक्कीच नाही. मग आम्ही विद्यार्थ्यांना उगीच वेठीस तर धरत नाही ना याचा पण कुठेतरी विचार व्हायलाच हवा.'

गाव आले तसे देशमुख सरांचा निरोप घेऊन नंदू घरी गेला आणि देशमुख सर शाळेत.
●●●

"अहो,ऐकलत का?" गंगू काहीशी धावतच नंदू बसला होता त्या खोलीत आली.
"क्क..काय झाले?" नंदू गडबडीने उठला.
"अहो, एक खुशखबर हाय...आता आपले सगळे प्रॉब्लेम संपतील...!"
"का$$ य?" नंदूने आश्चर्याने विचारले.
"आत्ताच दादाचा फोन आलता...त्याची दोन एकर जमीन एमआयडीसीत नव्हती गेली का..त्याचे चेक मिळणार आहेत म्हणे उद्या! आम्हा दोघीही बहिणीला खुशीने दोन-दोन लाख रुपये देणार आहे म्हणे तो..! पुढच्या आठवड्यात पैसे पण घेऊन येतो म्हणाला." आनंदाची बातमी सांगून गंगू पुढच्या घरात निघून गेली.

काही वेळ मध्ये निघून गेला असेल.

"अगं ये ऐक ना! " त्याने गंगूला आवाज दिला तशी ती त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. त्याचा चेहरा प्रचंड खुलला होता. त्या पणतीच्या प्रकाशात तो अधिकच तेजस्वी भासत होता. ती त्याच्या चेहऱ्याकडे नुसती पाहतच राहिली.
"अगं, आपण अविनाशच्या इंग्लिश स्कुलचा राहिलेला एक हप्ता या आठ-दहा दिवसांत भरु. त्याचे हे वर्षही लवकरच संपेन. थोडेसे थांबत दूरवर नजर टाकत तो पुढे बोलला,
"पुढच्या वर्षी आकाश आणि अविनाश दोघांनाही दोन शाळेचे ड्रेस, स्कुलबॅग, वह्या-पुस्तके, बूट-सॉक्स आणू..!" नंदूच्या बोलण्यावर गंगूने मान डोलावली.
"आणि ऐक ना..पुढच्यावर्षी आपण दोघांनाही मराठी शाळात घालणार आहोत." नंदू आत्मविश्वासाने म्हणाला.
आपण मुलांना मराठी शाळात घालणार हे ऐकून गंगूला आश्चर्य वाटले;मात्र क्षणभरच. त्याने घेतलेला निर्णय नक्कीच योग्य असणार हा तिला विश्वास होता. दुसऱ्याच क्षणी गंगूने त्याचा हात हातात घेत संमती दर्शविली.

समस्त मानवजातीला आपला जीवनरुपी प्रकाश देणारा भास्कर विश्रांतीसाठी निघाला होता. पुन्हा रात्रभर सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरणार होते. छोटीसी पणती मात्र आपल्या ज्योतीने आपला सभोवतालचा परिसर उजळवून टाकत होती. त्या प्रकाशातच त्याची दोन्ही मुले आकाश आणि अविनाश निद्रिस्त झालेली होती.
नंदू कसल्याशा विचारचक्रात गुंतला होता.त्याची नजर त्या अंधाऱ्या रात्रीत तेवणाऱ्या पणतीकडे गेली. 
'किती छोटीसी पणती, पण साऱ्या घराचा अंधार घालवते, जसं शिक्षणाने अज्ञानाचा नाश होतो तसा, तसा ही पणती अंधाराचा नाश करते. पणतीच्या उजेडाचं पण तसं काही असेल का म्हणजे इंग्लिश- मराठी असं काही??' त्याच्या विचाराचे त्याला स्वतःलाच हसू आले. 'उगीच आपलं काहीतरी' असं मनाशी म्हणाला. त्याला तो विचार विचित्र वाटला, 
'पणतीचं तसं काही नसतं, इंग्लिश-मराठी, ती कोणत्याही भाषेत उजेड देते' त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमलले.त्याच्या कुशीत शिरून गंगू ते स्मितहास्य कितीतरी वेळ  न्याहाळत होती.
●●● समाप्त●●●


इंग्लिश स्कुल (कथा) भाग-४

इंग्लिश स्कुल (कथा)
लेखक © राजेश खाकरे
भाग-४
●●● 
"मम्मी, मला वही आणायची, वीस रुपये देना." आकाश गंगूला म्हणाला.
आकाश यावर्षी दुसरीला गेला होता. जिल्हापरिषदेची शाळा घरापासून जवळच होती. शाळेची वेळ झाली म्हणून आकाश पिशवीत पुस्तके भरून शाळेत निघाला होता. काल मोरे सरांनी चित्रकलेची वही आणायला सर्वांना सांगितले होते. त्याची आठवण झाली म्हणून आकाशने आईकडे पैशाची मागणी केली.
"बेटा, तोहे पप्पा येतील आता, त्यांच्याकडून घे हा, मह्याजवळ नाही सध्या." गंगू म्हणाली,
नंदूची वाट बघत आकाश तिथेच झाडाखाली गोट्या खेळत बसला. सोबतीला त्याच्या वर्गातला उमेशही होता. थोड्या वेळाने नंदू घरी आला तशी गंगू त्याला म्हणाली,
"अहो, आक्याला, काय वही का काय आणायची होती, त्याला पैसे पायजे होते." 
" कारे, आक्या, कसली वही घ्यायची होती तुला"
"पप्पा, चित्रकलेची वही घ्यायची, मोरे सरांनी सांगीतली.
"काय मास्तरं आहेत, शिकवायचं सोडून चित्र काढायला सांगतात व्हय, जा, त्यांना म्हणावं उद्या आणीन."
"अहो, पण लेकरू मागतंय तर द्याना वीस रुपये, लागत असेल." 
"गंगू तुला पण समजत नाही का, पैसे काय झाडाला लागतात का? अगं हे मास्तर लोकं काही पण काढतात. हे आणा, ते आणा, याचे पैसे द्या, त्याचे पैसे द्या, आन तुला माहित नाही का, आता असे पैसे उधळून चालणार नाही. अविच्या इंग्लिश स्कुलचा खर्च, घरचा खर्च, त्यामुळे आता इतर खर्च कमी केलेच पाहिजे, धकतंच ना, निदान आजचं उद्यावर तरी जातं."
" हो, पण मागे तो स्कुलबॅग घ्या म्हणाला तेव्हा पण तुम्ही असंच काही सांगून टाळलं" गंगू त्याला आठवण करून देत म्हणाली.
" अगं, त्याला काय करायची स्कुलबॅग, झेडपी शाळेतल्या किती पोरांकडे स्कुलबॅग आहे? अशीही शाळा जवळ तर आहे मग काय पिशवीत पुस्तके जात नाहीत व्हय, अगं आम्ही पण गेलो होतो शाळात, चौथीपर्यंत का होईना, आम्हाला साध्या पाट्या पण नाही मिळायच्या, फुटलेल्या पाट्यावर शिक्षण केलं आम्ही, आता तर हे पायजे ते पायजे,अवघडच झालं सगळं. "
" हो ते खरंय, पण या मंगळवारी त्याला त्यो शाळेचा ड्रेस आणा तेव्हढा, चौधरी मॅडम दोनदा घरी येऊन गेल्या"
" ह्या मंगळवारी जमतका नाही माहित नाही, पण लवकरच आणीन." 
गंगू पुढे काही बोलली नाही. तिने मानेनेच होकार दिला आणि ती आपल्या कामाला लागली. 
●●● 

अविला इंग्लिश शाळेत घालून सहा-सात महिने झाले होते.अवी पण शाळेत बराच रुळला होता. शाळेत शिकविलेले विविध खेळ, पोएम्स,बडबडगीते तो इंग्लिश मध्ये म्हणून दाखवायचा, नंदू आणि गंगुला पण त्याचे कौतुक वाटायचे. अविला इंग्लिश स्कुलला घातले हे योग्यच केले असे त्यांना वाटत होते. आतापर्यंत दोन हप्त्याने सात-सात हजार याप्रमाणे त्यांनी चौदा हजार रुपये फीस जमा केली होती. हे करतांना त्यांना बऱ्याच तडजोडी कराव्या लागल्या होत्या. एकतर यावर्षी दुष्काळ,त्यातही कापसावर बोण्डअळी पडली होती. स्वतः च्या एकदीड एकर शेतीत तीन कुंटल कापूस निघाला होता. खत-बियाणांचा खर्चही भागला नव्हता. सोमिनाथची उसनवारी, घरखर्च आणि अधून मधूनचा किरकोळ दवाखाना, यामुळे हातात दिडकी शिल्लक नव्हती. दुष्काळामुळे मजुरीही मिळत नव्हती. शाम पाटलांच्या विहिरीवर आडवे बोर घेण्याचे काम चालू होते. गेल्या दोन दिवसांपासून बळे-बळे विचारणा करून तो तिथे कामाला जात होता. आज उद्या करून त्याने इंग्लिश स्कुलचा हप्ता पुढे ढकलला होता. शाळेतून निरोपावर निरोप येत होते. नंदू काहीसा वैतागून गेला होता. गंगूलाही त्याची चिंता समजत होती. मात्र ती बिचारी तरी काय करणार होती. शब्दांच्या आधाराशिवाय तिच्याकडे दुसरे होते तरी काय. गळ्यातले आणि कानातले किडुक मिडुक तर केव्हाच गरिबीच्या अग्नीत भस्मसात झाले होते. ती लंकेची पार्वती आपल्या शंकराला- नंदूला आधार देत होती. त्याच्यासोबत राबत होती. त्या दिवशी चहा घेता घेता गंगूने विषय काढला,
"मला वाटतं तुम्ही रावसाहेबांकडे तरी जाऊन या, काही व्याजाने जर भेटले तर एवढा राहिलेला एक हप्ता तरी भरता येईल. वायदा करून महिना वर झाला, त्यांना कधीपर्यंत आज-उद्या करणार!"
"मलाबी तेच वाटतं..दुसरा काही मार्ग पण दिसत नाही, सकाळीच जाऊन येतो" नंदू कप खाली ठेवत म्हणाला.
रावसाहेब ही गावातली बडी आसामी होती. व्याजाने पैसे देणे हा त्यांच्या अनेक व्यवसायांपैकी एक प्रमुख व्यवसाय होता. सावकारीच्या जोरावर त्यांनी आतापर्यंत कित्येक एकर जमीन कमावली होती. गावात आरसीसीचा टोलेजंग बंगला, फिरायला गाड्या. रावसाहेब काही भला माणूस वगैरे नव्हता. मग्रुरी त्याच्या नसा-नसात दौडत होती. सारे गाव त्यांना 'आबा' या नावानेच हाक मारायचे.  कुणीही त्याच्याकडे शेवटचा पर्याय म्हणूनच जात होते.
दुसऱ्या दिवशी सकाळीच नंदू रावसाहेबांच्या बंगल्यावर गेला. आरामखुर्चीत बसून रावसाहेब वर्तमानपत्र चाळत होते.
"राम-राम आबासाहेब"
नंदूच्या राम-राम ला प्रत्युत्तर म्हणून रावसाहेबांनी नुसते हूं केले.आणि पुढे म्हणाले,
"बोल नंदया, आज सकाळी-सकाळीच"
"होय साहेब, काम होतं थोडं!"
खरं तर रावसाहेबांना येणाऱ्या व्यक्तीला कशासाठी आलात हे विचारायची गरजच नव्हती. आपल्याकडे एखादा माणूस का येतो हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. नंदू कशाला आला होता हे त्यांना कळले नसते तरच नवल.त्यांनी नजरेनेच विचारले तसे नंदू पुढे बोलला,
"साहेब, पैशाचं काम होतं थोडं, सात हजार पाहिजे होते, येणाऱ्या जुनमधी परत करीन.!"
"कशाला पाहिजे होते, एवढ्या दुष्काळात काय काम काढलं?"
"ते माझं पोरगं इंग्लिश स्कुलला टाकलय ना..!त्याच्या फिसचा हप्ता भरायचा होता.तुम्ही विश्वास ठेवा, जुनमधी व्याजासगट परत करीन.!"
"ख्य$$$ख्य$$$$ ख्य$$$$" रावसाहेब कुत्सितपणे हसले मग काहीसे थांबून दीर्घ श्वास घेत म्हणाले,
"तुम्ही भीकारडे लोक नाही सुधारणार...खायची पंचाईत आणि चालले पोरं इंग्लिश स्कुलला टाकायला, म्हणे जुनमधी परत करतो, जुनमधी तुझ्या बापाची शेती पिकणार हाय व्हय? काही पण भिकारचोट चाळे..!"
कुणीतरी कानात गरम तेल ओतावे तसे नंदूला ते शब्द ऐकून झाले. त्याचा चेहरा लालबुंद झाला होता. रावसाहेबांच्या दोन कानशिलात ठेऊन द्याव्या असेही त्याला वाटून गेले. पण तो तसे करू शकत नव्हता. तो गरिबीचे प्रतिनिधित्व करत होता आणि रावसाहेब श्रीमंतीचे. श्रीमंताने गरीबाला छळावे, राबवावे, शोषण करावे हा जणू अलिखित नियमच झालेला. इथल्या समाजात एखाद्या हरळीप्रमाणे खोलवर शिरलेला. गरीब आवाज उठवू शकत नाही कारण त्याचा गळा परिस्थिती दाबून ठेवते. फक्त अश्रूला वाहण्याची परवानगी असते. आसू मात्र मुके असतात.त्यांना बोलता येत नाही.
नंदू उलट्या पावलाने घरी परतला. "काम झाले का?" या गंगूच्या प्रश्नालाही त्याने उत्तर दिले नाही. त्याने हातात डबा घेतला आणि तो तडक शाम पाटलांच्या विहिरीवर गेला.
●●●
नंदूचे डोके अजूनही गरगरत होते.. रावसाहेबाचे शब्द त्याला पुन्हा पुन्हा ऐकू येत होते. डबा वर ठेऊन तो विहिरीत उतरला. अजून त्याचे इतर सहकारी आलेले नव्हते. त्याने बोरचे मशीन चालू केले.पहारी घातल्या, हातांनी जोरात मशीन दाबत तो पहारी ढकलत होता. कोरड्या जमिनीतुन दगड-मुरुमाचा चुरा बाहेर पडत होता. नंदूचे डोके मात्र अजून शांत झाले नव्हते. त्याने मशीन बंद केले. समोर घण आणि हातोडी पडलेली होती. त्याने ती हातोडी हातात घेतली. समोरच्या मोठ्या शिळेवर ती हातोडी बेभान होऊन मोठ्या त्वेषाने तो मारू लागला...दण$ दण$$ दण$$$ दण$$$$$$"
अखेर ती दगडी शिळा तुटली त्याने एक आर्त किंकाळी फोडली. डोळ्यातून घळाघळा अश्रू खाली आले. तो मटकन खाली बसला. त्याचा श्वास जोराने चालू होता. घामाने सर्वांग भिजले होते. त्याचे डोके मात्र कमालीचे शांत झाले होते. बराचवेळ तो तसाच बसून होता.
"
(क्रमशः)
●●●

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...