मनुष्य गौरव दिन

--------------------------------------------------
१९ ऑक्टोंबर, स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्मदिवस. संपूर्ण विश्वातील स्वाध्यायी हा दिवस मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतात. पांडुरंगशास्त्री यांचे संपूर्ण नाव पांडुरंगशास्त्री वैजीनाथशास्त्री आठवले. स्वाध्यायी त्यांना आपले मोठे बंधू या नात्याने दादाजी म्हणतात. दादांचा जन्म दिनांक १९ ऑक्टोंबर १९२० ला रायगड जिल्ह्यातल्या रोहा या गावी झाला. दादांनी उभा केलेला स्वाध्याय परिवार आणि स्वाध्याय विचार आज विश्वातल्या कानाकोपऱ्यात गेला आहे.त्यांच्या ९७ व्या जन्मदिवासानिमित्त ही भाववंदना
--------------------------------------------------
मनुष्य गौरव दिन
"केवळ दोन पायावर चालतो म्हणून कुणी माणूस होऊ शकत नाही, जर तसे असेल तर कावळा ही दोन पायावर चालतो मग त्याला पण माणूस म्हणणार का..? माणूस कुणाला म्हणायचे हा मोठाच प्रश्न आहे, प्रत्येक पशु पक्षी प्राण्याला तर माणूस म्हणता येत नाही, म्हणजे माणसाचे काही वेगळेपण आहे, त्याची काही वेगळी ओळख आहे. केवळ जगतो, श्वासोच्छवास करतो म्हणूनही कुणाला माणूस म्हणता येत नाही. माणसाला भगवंताने काही विशेष बनवले आहे." दादा जेव्हा समोर बसलेल्या विशाल जनसमुदायासमोर ह्या ओळी उच्चारतात तेव्हा ते शब्द प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेतात. ते केवळ शब्द राहत नाही तर एखाद्या मंत्राप्रमाणे ते माणसाच्या मन बुद्धीत संचारीत होतात.
माणूस स्वतः बद्दल  विचार करायला लागतो. मी एक माणूस.. खरंच मी माणूस आहे म्हणजे नेमके काय आहे.? मला माणसाचे शरीर मिळाले म्हणून मी माणूस आहे, मी संसार करतो म्हणून माणूस असेन तर पशु पक्षीही आपल्या पिलांना जन्म देतात, त्यांना खाऊ पिऊ घालतात, त्यांचा सांभाळ करतात.सृष्टीतील इतर प्राण्यांपेक्षा माझ्यात काय विशेष आहे म्हणून मी माणूस आहे? मी जर माणूस आहे तर मी माणूस म्हणून जगतो का? माणूस म्हणून वागतो का? माझ्यात माणूसपण आहे का.? आणि तिथून सुरु होतो माणसाचा स्वतः विषयीचा अभ्यास.. स्वाध्याय.
दादा समजावतात की, "ज्याच्यात अस्मिता, कृतज्ञता,आणि भावमयता आहे तोच खरा माणूस आहे". माणसाचा स्वतः बद्दलचा स्वाभिमान म्हणजे अस्मिता, केलेले प्रेम आणि उपकार यांची जाणीव म्हणजे कृतज्ञता, आणि दुसऱ्याकडे, माणसाकडे, सृष्टीकडे भावपूर्ण नजरेने बघण्याची क्षमता म्हणजे भावमयता. या गोष्टी जर माणसात नसतील तर त्याला माणूस म्हणता येणार नाही. आज आपण बघितले तर आज माणसाकडे या तिनही गुणांचा काही अपवाद सोडले तर अभावच दिसतो. समाजात बघितले तर पद, प्रतिष्ठा आणि पैसा या तीन गोष्टीलाच जास्त महत्व आहे. प्रत्येकजण या गोष्टीमागे धावतो आहे. स्वतः चे अस्तित्वच हरवून गेले आहे. माणूस मोठा का तर त्याच्याकडे पैसा आहे म्हणून मोठा, पद आहे म्हणून मोठा, प्रतिष्ठा आहे म्हणून मोठा, मात्र यात कुठेतरी माणूसपण हरवून गेले आहे. ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तो कमी पैशावाल्याला तुच्छ समजतो, तर त्याच्यापेक्षा अधिक पैसेवाला दिसला की स्वतः ला लहान समजतो, हेच पद, प्रतिष्ठेच्या बाबतीतसुद्धा लागू होते. माणूस माणूस म्हणून मोठा आहे असे दिसत नाही. तर त्याच्याकडे काय आहे, यावरून माणसाची किंमत ठरते. आणि हीच बाब दादांजीना खटकत होती. त्यांना वाटायचे कि, पद, प्रतिष्ठा आणि पैसा यांच्याशिवाय माणसाचे काहीच मूल्य नाही का..? दुधात साखर, केशर, इलायची, खोबरं घातले तर दुधाची किंमत वाढेलच पण दुधाला स्वतः ची पण एक किंमत आहे, तीच म्हणजे अस्मिता किंवा आत्मगौरव. आणि हा आत्मगौरव माणसाला उभा करतो, त्याला शक्तिशाली बनवतो. माणूस हा न्यूनगंड, भयगंड आणि अहंगंड या तीन गंडानी ग्रस्त होतो म्हणून त्याचा विकास होत नाही हे फ्राईडने सांगितले होते. ज्याच्याकडे काही नाही त्याच्यात न्यूनगंड येतो, ज्याच्याकडे काही आहे तो अहंगंडाचा शिकार बनतो, माझ्याच्याने होईल का, मला जमेल का ही भीती भयगंडाला जन्म घालते. या मानसशास्त्रावर दादांनी तोडगाच शोधून काढला. सामान्यातल्या सामान्य माणसात दादांनी अस्मिता उभी केली. दादांनी समजावले कि, या सृष्टीचा पालनकर्ता भगवंत तुझ्या शरीरात येऊन बसला आहे." सर्वस्यच्याहं हृदिसान्निविष्टो" असे गीतेत स्वतः च भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. आणि जर या सृष्टीला चालविणारा, तसेच माझे शरीर चालविणारा भगवंत जर माझ्यासोबत असेल तर मग मी छोटा कसा असेल? मला दोन शर्ट कमी आहेत म्हणून मी छोटा नाही, मी मोठयांचा (भगवंताचा) आहे म्हणून मी मोठा आहे. त्यामुळे माणसात आत्मगौरव निर्माण झाला.त्याचा न्यूनगंड गळून पडला. भगवंतावर प्रीतीतून भक्ती निर्माण झाली. भगवंतावर बौद्धिक प्रेम निर्माण झाले. मी भगवंतांमुळे मोठा आहे त्यातून अहंगंड गळाला, आणि भगवंतच माझ्यासोबत आहे, ही जाणीव झाल्याने भीती निघून गेली.
मला जसे देवाने निर्माण केले आणि तो माझ्यासोबत माझ्या हृदयात राहतो आहे, माझे जीवन चालवतो आहे, तसाच तो भगवंत दुसऱ्यात पण आहे म्हणजे त्याचा आणि माझा काही संबंध आहे, ही जाणीव म्हणजे परसन्मान. आत्मगौरव आणि परसन्मान मिळून मनुष्य गौरव तयार होतो. दादा आयुष्यभर मनुष्य गौरवासाठी झिजले, मनुष्य गौरव हे जणू स्वाध्यायाचे दुसरे नावच आहे. माणूस चांगला बनावा, माणूस कृतज्ञी बनावा, लाखो लोकांचा एक परिवार बनावा, हे स्वप्न दादाजींने बघितले, त्यासाठी झिजले आणि साकार केले.
स्वाध्याय म्हणजे चांगले जीवन, आनंदी जीवन आणि प्रभूला आवडेल असे जीवन जगण्याची पद्धती. स्वाध्याय म्हणजे स्वतः चे अध्ययन, स्वतः च्या जीवनविकास, स्वाध्याय म्हणजे निःस्वार्थ प्रेम करण्याचा अभ्यास, स्वाध्याय म्हणजे दिव्यात्वाचा ध्यास, स्वाध्याय म्हणजे एक जीवनवृत्ती, स्वाध्याय म्हणजे एक विचारप्रवृत्ती, स्वाध्याय म्हणजे एक संस्कृती, स्वाध्याय म्हणजे सदवृत्ती, स्वाध्याय म्हणजे एक विश्वकुटुंब, स्वाध्याय म्हणजे प्रभूप्रेमरती,
दादांनी स्वाध्यायाचे रोपटे लावले, त्याला प्रेम आणि विचारांचे खतपाणी घातले. केवळ विचार देऊन दादाजी थांबले नाहीत तर ते विचार घेऊन हार्ट टू हार्ट(heart to heart) आणि हट टू हट (Hut to Hut) गेले, माणसाला उभे केले.माणसाला घडवले त्रिकाल संध्या,स्वाध्याय केंद्र, युवा केंद्र, बाल संस्कार केंद्र, युवती केंद्र, महिला केंद्र,माणार्ह केंद्र,प्रवचन केंद्र आदी केंद्रातून ज्ञान आणि भक्ती फुलवली तर योगेश्वर कृषि, निर्मलनिर, वृक्षमंदिर, हिरामंदिर, मत्स्यगंधा, भावफेरी,भक्तिफेरी,तीर्थयात्रा, एकादशी, व्रती, आदी विविध प्रयोगातून स्वाध्यायी कर्मभक्ती करू लागले. माणसाचे माणसाशी, माणसाचे सृष्टीशी, आणि माणसाचे भगवंताशी नाते दादांनी जोडले.
या जगात आज बघतो तेव्हा, सर्वत्र लाचारी दिसते, मागणी दिसते, स्वार्थ दिसतो, कुरघोडी दिसते, भ्रष्टाचार, अप्रामाणिकता दिसते, कुटुंबव्यवस्था ढासळताना दिसते, माणुसकी परेशान दिसते, मात्र त्याचवेळी नजर दादांच्या स्वाध्याय परिवारावर आणि स्वाध्याय कार्यावर जाते, मला निःस्वार्थ प्रेम दिसते, दुसर्याबद्दल भाव दिसतो, जगण्याचा आशावाद दिसतो.माझा नातेवाईक कामाशिवाय मला भेटायला येत नाही पण दादांचा स्वाध्यायी येतो, त्याला माझ्याकडून काहीच नको असते, आभाराचीही अपेक्षा नसते. तो काही मिनिटे येतो, मला जीवन समजावून जातो. माझ्यात ऊर्जा पेरून जातो. जगाकडे बघितले आणि स्वाध्याय परिवाराकडे बघितले तर अगदी विरोधाभास वाटावे असे चित्र दिसते. आज लाखोंच्या संख्येने स्वाध्यायी आमच्या अवतीभवती प्रेम आणि विचार वाटत फिरतात. ते आम्हाला ठळक वाटावे असे दिसत नाही, कारण ते प्रचार करत नाही, पोस्टर लावत नाही, जाहिरात करत नाही. मात्र ते खऱ्या अर्थाने मनुष्य गौरव निर्माण करताहेत.ते सरळ हृदयात शिरतात आणि माणसाला हृदयापासून बदलून टाकतात. माणसात खऱ्या अर्थाने मनुष्यगौरव निर्माण करणाऱ्या पूजनीय दादांजीना ह्रदयपूर्वक वंदन..!
-राजेश खाकरे
औरंगाबाद
मो.७८७५४३८४९४

1 comment:

  1. माणसाला माणसातील मनुष्याचा परिचय. अन्य सजीव आणि मनुष्य सजीवातील सार असार जाणण्याची क्षमता याचा अर्थ सुस्पष्ट होतो

    ReplyDelete

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...