सरपंच थेट निवड

सरपंच थेट निवड

निकालाचा आनंद अजून सदाशिवरावांच्या चेहऱ्यावरून झळकतच होता. आज दुपारीच ग्रामपंचायत इलेक्शनचा निकाल जाहीर झाला होता. जनतेतून थेट निवडणुकीतून सरपंच म्हणून सदाशिवराव निवडून आले होते.यावेळी पहिल्यांदाज जनतेतून थेट सरपंच निवड झालेली असल्याने निवडणुकीचे आणि राजकीय समीकरणं बऱ्यापैकी बदलून गेलेले होते. सदाशिवराव आपल्या खुर्चीत बसून मागील 15-20 दिवसांच्या घटनाक्रमाबद्दल विचार करत होते. आज ते सरपंच झाले होते. खरं तर ते खूप खुश होते.मात्र क्षणभर त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. सुनीताताई सदाशिवरावांच्या सुविद्य पत्नी, हातात चहा घेऊन त्यांच्याकडे बघत होत्या. तिकडे सदाशिवरावांचे लक्षच नव्हते.
"अहो, सरपंचसाहेब, चहा घ्या..!" सुनीताताईंच्या या आवाजाने ते थोडेसे दचकलेच.! भानावर येऊन हसत हसत म्हणाले,
"आता हे काय नवीन..!"
"अहो नवीन म्हणजे काय, तुम्ही आता सरपंच झालात न्हवं..आता सवय केली पाहिजे!" हसत हसत सुनीताताई बोलल्या आणि दोघेही खळखळून हसले. दोघांच्याही चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.
"अहो, एक ईचारू का..?" सुनीताताईने कुतूहलाने विचारले.
"काय.?"
"ते निकाल लागल्यावर 10-15 दिवस सगळ्या सदस्याला घेऊन कुठे टूरला जावे लागत असते, ते आता उद्या जाणार का..?" सुनीताताईंनी पृच्छा केली.
"अगं,कसली टूर म्हणते तू..?
"ते नाही का मागच्या वेळी ते गणपतराव सरपंच झालते तव्हा, ते सर्व 15 दिवस सगळ्या निवडून आलेल्या सदस्याला घेऊन कुठेतरी कुणाला माहीत नाही अशा ठिकाणी घेऊन गेलते म्हणे, गंगू सांगत होती की, त्यांना कुठल्या चांगल्या हॉटेलात जेवणखाण, राहणं ते सगळं करावं लागतं असं.." सुनीताताईने जरा सविस्तर सांगितले.
सदाशिवराव गालातल्या गालात हसले, आणि म्हणाले,
"तीच तर खरी मेख आहे आता..!"
सुनीताताईची काहीशी न समजल्यासारखी मुद्रा बघून सदाशिवराव म्हणाले,
"अगं, हे बघ पहिल्यांदा काय असायचं कि, निकाल लागला कि ज्याला सरपंच व्हायचं त्याला सगळ्या सदस्याला सांभाळीत बसावं लागायचं अन आत्ता..."
"अहो सरपंच.....!!!" बाहेरून आलेल्या या भारदार आवाजाने सदाशिवरावांचं बोलणं अर्धवट राहिलं आणि सदाशिवरावांनी आवाजाच्या दिशेनं बघितलं.
आवाजापाठोपाठ काही मंडळी आत आली. त्यांच्या हातात एक फुलांची मोठी माळा होती. सुनीताताईने बघितले, ते सर्वजण आज निवडून आलेले सदस्य होते. त्यांनी सोबत आणलेली फुलांची माळ सदाशिवरावांना  घातली. गुलाल उधळला, त्याचवेळी बाहेर फटाक्यांची आतिषबाजी झाली. सदाशिवरावाने सुनीताताईकडे बघून स्मितहास्य केले.सुनीताताईला थोड्या वेळापूर्वी सदाशिवरावांच्या अर्धवट राहिलेल्या वाक्याचा अर्थ समजून गेला. त्यांनाही हसू आवरले नाही.
"सदाशिवराव तुम आगे बढो... हम तुम्हारे साथ है" अशा घोषणांनी परिसर कितीतरी वेळ दणाणून गेला होता.
-राजेश खाकरे
औरंगाबाद
मो.७८७५४३८४९४
rajesh.khakre@gmail.com

No comments:

Post a Comment

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...