बालकविता: उंदीरमामाची माढी

एकदा उंदीर मामाने बांधली एक माढी
माढी त्याची बघायला जमा झाली वाडी

ससा आला,कासव आला,चिमणीही आली
उंदीरमामाच्या माढीवरती मोठी गर्दी झाली

प्रत्येकाच्या तोंडात होता एकच बोलबाला
उंदीरमामा आता म्हणे खूप मोठा झाला

तिथे मोठ्या सिंहासनावर उंदीरमामा बसले
येणाऱ्यास नमस्कार करत स्मित स्मित हसले

थोड्या वेळाने तिथे मांजर मावशी आली
उंदीरमामाची भीतीने चुळबुळ सुरू झाली

टुणकून उडी मारुन उंदीरमामा पळाले
हसता हसता सर्वांना गुज त्याचे कळाले
© राजेश खाकरे
rajesh.khakre@gmail.com

अशी सुचते कविता

अशी सुचते कविता अर्थात कवितेच्या जन्माची कहाणी

कवी हा एक आगळावेगळा निर्मितीकार असतो. स्वतः च्या प्रतिभेतून नवनवीन कवितांना जन्मास घालत असतो. कविता कधी, कुठे, कशी सुचेल याचा काहीच नेम नसतो. कधी रस्त्याने, कधी गर्दीत, कधी चालताने, कधी गाडीवर, कधी कधीपण...अमुक वेळी मला कविता सुचेल हे कवी स्वतः पण ठामपणे सांगू शकत नाही. शरीराच्या एखाद्या भागात अणकुचीदार सुई टोचावी आणि त्यातून रक्ताची चिळकांडी बाहेर यावी तशी कवींच्या संवेदनशील मनावर एखाद्या बाह्य किंवा अंतस्थ: परिस्थितीचा आघात होतो आणि कविता बाहेर निघते. तिचा आवेग हा त्या भावनेच्या आघाताच्या तिव्रतेवर  ठरत असतो. भावना वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, कधी राग, द्वेष, उद्रेक, तर कधी सुखद, हास्य अशीही असू शकते. कविता या भावनेचा हात धरून कागदावर उतरते.आणि तसेच स्वरूप धारण करते. एखादी कविता वाचताना कधी तोंडातून आपसूकच वाह शब्द निघतात याचे कारण त्या कवीने त्या त्या भावनेला यतार्थपणे आपल्या कवितेत मांडलेले असते. कविता ही कवींच्या भावना आविष्कराचे मूर्तीमंत स्वरूप असते. ती कविता जन्म घेताना कवी ज्या मानसिक भावना आवेगातून जात असतो, त्याच भावनेतून जर वाचकाने कविता वाचली तर कविता खऱ्या अर्थाने वाचकपर्यत पोचली असे म्हणता येईल, मात्र ते प्रत्येकवेळी साध्य होईलच असे नाही. कारण कवी आणि वाचक यांचे स्वतंत्र भावनाविश्व असते.कवितेत कवीने मांडलेला एखादा प्रसंग किंवा शब्द,ओळ वाचकाला रुचत नाही किंवा त्याला खटकते मात्र कवीने मांडलेला प्रसंग, शब्द किंवा ओळ ही कवीने ज्या पूर्वपार्श्वभूमीतून मांडलेली असते. ती पार्श्वभूमी मात्र वाचकाला माहीत नसते.
कविता जन्म घेण्यापूर्वी ती अनेक मानसिक प्रक्रियेतून जात असते. तिच्या निर्मितीमध्ये जशी एखादी तात्कालिक परिस्थिती कारणीभूत ठरते तसेच त्या निर्मितीमागे कवीचा काही विचार असतो, काही दृष्टिकोन असतो. त्याच्या काही जीवनाविषयीच्या जाणिवा असतात. जेव्हा कुठे काही कमी जास्त होताना दिसले की कवीची लेखणी डोकं वर काढते, ती प्रहार करायला लागते, कुठे व्यंगावर बोट ठेवते, कुठे उपरोधिक टीका करते, कुठे शाबासकी देते, कुठे हास्य फुलविते, कुठे प्रोत्साहन देते, तर कुठे जगण्याला दिशा देते, जीवनाला आकार देते. आणि या सर्व गोष्टी कवी करत असतो. त्याच्या लेखणीतून. त्याची लेखणी म्हणजे एक एक क्रांतिकारक शस्र असते.त्याच्या ह्याच लेखणीतून अवतरलेल्या कवितेच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय होती, कवीला ही कविता नेमकी का लिहावी लागली, असे काय घडले, अनुभवले किंवा बघितले ज्यातून ह्या कवितेचा जन्म झाला, ही एक न सांगितलेली कहाणी असते, आणि कवितेचे तेच मूळ असते.जसे एखादे गाणे कसे तयार झाले, त्याच्या पाठीमागची रोचक कहाणी ऐकली की ते गाणे आवडायला लागते, तसेच कवींच्या भावनेशी एकरूप होऊन कविता वाचण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला की कविता आवडायला लागते.
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
Rajesh.khakre@gmail.com

मित्रो....!

मित्रो
●●●
एक वर्षांपूर्वी 8 नोव्हेंबरला रात्री 8 वाजता टिव्हीवरून आमच्या मोदीसाहेबांची मित्रो अशी हाक आली आणि तेव्हापासून समस्त देश वासीयांनी मित्रो या शब्दांची जेव्हढी धास्ती धरली आहे ती पण ऐतिहासिकच आहे. नाहीतरी लोकसभा इलेक्षनात मोदी साहेबांनी ही हाक कितीतरी वेळा दिली होती, पण आठ तारखेची हाक मात्र बारा वाजवून गेली.
एका क्षणात पैशाचा कागद व्हावा तसा काहीसा भास झाला. आणि मग कुठे कुठे किती किती पैसा ठेवला ते धनाढय लोक शोधू लागले, नियोजन करायला लागले, या निर्णयाने पाहिल्यांदाच पैसे नसण्यातला आनंद काही लोकांनी घेतला. वाईट आणि खोट्या मार्गाने ज्यांनी पैसा कमवला त्यांची मोठी पंचाईत झाली.गरीब जनतेला या निर्णयातून मोठे मोठे घबाड बाहेर येतील असेही वाटत राहिले, आपल्या पती, मुलांपासून काही पैसे गुपचूप, काटकसर करून ठेवलेल्या आणि स्वतः चे बँकखाते नसलेल्या महिला भगिणीची मोठी पंचाईत झाली. सर्वसामान्यांची बँकेसमोर रांगा लावून मोठी परवड झाली. प्रवासात आणि बाहेरगावी गेलेल्या लोकांची तर तारांबळच उडाली.घरी लग्नकार्य असणारे मोठ्या चिंतेत पडले,बऱ्याच गोष्टी घडून गेल्या. काही चांगल्या तर वाईट. नोटबंदी झाल्यावर काही महिने सर्वसामान्य लोकांना त्रासही झाला, मात्र जर काही चांगले घडत असेल तर होउद्या थोडा त्रास म्हणत काहींनी सहन केला तर काहींनी नेहमीप्रमाणे शिव्याशापही दिले.
पैसा हातात नव्हता मात्र सर्वत्र पैशाच्याच गप्पा चालत होत्या. बसस्टॅन्डवर कटिंग चहा पिता- पिता कुठे किती पैशाचे पोते सापडले याची चर्चा चालत होती. काही ठिकाणी गंगेत, रस्त्यावर फेकलेल्या आणि बातम्यात दाखवलेल्या घटनांवर ऑफिसातून, नाक्यावर, पारावर, चर्चासत्रे रंगत होती. ज्याला उधारी द्यायची आहे तो मुद्दाम फोन करून घेऊन जाण्यास सांगत होता, तर असुदे सध्या काही घाई नाही म्हणून समोरचा पैसे घेण्याचे टाळत होता. कुणाला आपल्याकडे फारसे पैसे नाही याचा आनंद होत होता तर ज्यांनी भ्रष्टाचार आणि अनितीने माया जमवली त्याची व्यवस्था लावण्याच्या भीतीने काया थरथरत होती. पेट्रोलपंपावर काही काळ नोटा चालत असल्याने पेट्रोल टाकताना काहींना उगीच आनंद मिळत होता. 10, 20,50,100 रुपयांच्या नोटा असणारा व्यक्ती तर एकदम श्रीमंत वाटायला लागला.
जुन्या नोटा जाऊन नवीन करकरीत नोटा आल्या, काहींनी पाहिल्यादाच हातात आलेल्या नोटा जपून ठेवल्या. नवीन आलेल्या नोटांची सवय नसल्याने त्या कागदाप्रमाणे वाटायला लागल्या. काही महिने विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा सुरु झाले. या काळात ऑनलाइन व्यवहाराकडे बऱ्यापैकी ओढा वाढला.
नोटबंदींतर काळापैसा बाहेर आला का? भ्रष्टाचार कमी झाला का? अर्थव्यवस्था सुधारली का?? यात सामान्य जनतेचे हित झाले का? काळा पैसा पुन्हा सफेद करण्यात भ्रष्टाचारी लोक यशस्वी झाले का? नोटाबंदीने देशाचा जनतेचा फायदा झाला का?
नोटबंदीची गरज होती की नव्हती? नोटबंदी यशस्वी झाली का??? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मात्र अजूनही स्पष्टपणे लोकांना समजली नाही.
सत्ताधारी पक्ष सुरवातीपासून नोटबंदीचे समर्थन करत ती कशी यशस्वी झाली हे पटवून देण्याचा प्रयत्न करत राहिला. तर दुसऱ्या बाजूला विरोधक सुरुवातीपासून नोटाबंदीला विरोध करून ती कशी निष्फळ आणि जनतेला परेशान करणारी होती याचे चित्र रंगवत राहिला.
सामान्य माणसाला मात्र थोडा त्रास आणि त्याच्या खिशात असणाऱ्या तुटपुंज्या पैशाचा रंग बद्दलण्यापलीकडे नोटबंदीतून काही मिळाले असे जाणवले नाही.
नोटबंदीतून देशाचा, जनतेचा फायदा झाला की तोटा हे  येणारा पुढील काळ सांगून देईल, असे असले तरी नोटबंदी अगदीच निरर्थक होती असे म्हणणेही योग्य होणार नाही. नोटाबंदीने खोट्या मार्गाने मिळवलेली संपत्ती तुम्हाला अडचणीत आणू शकते, हे प्रकर्षाने जाणवून दिले, online व्यवहारात आपोआप वाढ झाली ती नोटबंदीमुळेच..आणि पैशाच्या पाठीमागे धाप लागेपर्यंत धावणाऱ्या आणि पैसाच सर्वस्व आहे असे मानणाऱ्या लोकांना पैसा म्हणजे सर्वस्व नाही हे  या निमित्ताने अनुभवता आले ही गोष्टही नाकारून चालणार नाही.
-राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
rajeshkhakre.bolgspot.in

बालकविता: स्वप्नात आली शाळा

स्वप्नात आली शाळा

काल रात्री स्वप्नात आली माझी शाळा
सुट्ट्या संपल्या आता शाळेत ये बाळा  !! धृ !!

दिवाळीचा फराळ तुझा संपला असेल
धिंगा-मस्ती, मौज मजा करून झाली असेल
माझ्या आवारात येऊन थोडे खेळा
सुट्ट्या संपल्या आता शाळेत ये बाळा ||१ ||

मामाच्या गावाची सफर कशी केली?
नव्या ओळखी, भेट कुणाकुणाशी झाली?
निबंध लिहून मला गमतीजमती कळवा
सुट्ट्या संपल्या आता शाळेत ये बाळा  ||२||

तुमच्या त्या किलबिलीची सवय आहे मला
तुम्ही गेला तेव्हापासून जीव व्याकुळ झाला
आल्यावर तुम्ही एकदा स्वच्छ पुसा फळा
सुट्ट्या संपल्या आता शाळेत ये बाळा ||३||
- राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
rajesh.khakre@gmail.com

कामापूरता मामा

कामापूरता मामा असतो कामापूरता मामा
गरजेनंतर कोण ठेवतो आठवण तुमची सांगा

कुडकुडणाऱ्या थंडीत सूर्याची वाट पाहिली जाते
उन्हाळ्यात त्याच सूर्याला लाखोली वाहिली जाते
सूर्य वाईट ना थंडी उन्हाळा गरज महत्वाची बाबा
कामापूरता मामा असतो कामापूरता मामा

काम पडता आठवतात मग सगे सोयरे मित्र
वेळ संपल्यावरती तुला विचारत नाही कुत्रं
नमस्कार वाकून असतो जेव्हा ठरतो कुणी दादा
कामापूरता मामा असतो कामापूरता मामा

कधी नाही करत फोन,त्याचाही कॉल येईल
भेटत नसतो कधी कुणा, तो ही भेट घेईल
असला पाहिजे पैसा अडका अन थोडा गाजावाजा
कामापूरता मामा असतो कामापूरता मामा

गरज सरो अन वैद्य मरो अशी जगाची रीत
कुणी जगो वा मरो तिकडे, साधून घ्यावे हित
स्वार्थाच्या गाडीला नसतो मानवतेचा थांबा
कामापूरता मामा असतो कामापूरता मामा
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४

बालपण: एक आनंददायी जीवनकाळ

बालपण: एक आनंददायी जीवनकाळ

बालपण हा आयुष्याचा खूप सुंदर काळ असतो. ज्यावेळी एक जीव या पृथ्वीवर जन्म घेतो,त्यावेळी तो एकदम स्वच्छ,निरागस, निष्पाप असा जीव असतो.बालपण किंवा लहानपण हे खूप छान होते याची जाणीव मोठे झाल्यावर प्रत्येकाला होते.बालपणात एक सात्त्विकता असते.एखाद्या लहान मुलाकडे बघितले कि आपल्याला कसे प्रसन्न वाटते. त्याच्या चेहऱ्यावरुन एक चैतन्य ओसंडून वाहत असते. त्याच्या चेहऱ्यावर कायम हास्य झळकत असते. बालक कधी निराश, हतोत्साही, दमलेला दिसत नाही.तो कधी रडेलही पण रडगाणे गात बसणार नाही. तो कायम काहीतरी करत असतो, कशात तरी रमलेला असतो. त्याच्या मनात कुणाविषयी द्वेषभावना किंवा वैर तो ठेवत नाही. त्याला उद्याची चिंता नसते. तो प्रत्येक क्षणात रमत जातो, त्याच्या खेळात गुंतत जातो. त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या चांगल्यावाईट घटनांचा परिणाम त्याच्यावर होत नाही. त्याचे जीवन एखाद्या स्थितप्रज्ञासारखे असते. त्याच्या हास्यात एक निर्व्याजता असते. खोटेपणा नसतो, तो झोपतो तेव्हा शांत असतो, खेळतो तेव्हा उत्साही असतो, शिकतो तेव्हा जिज्ञासू असतो, हसतो तेव्हा प्रसन्न असतो, रडतो तेव्हा हट्टी असतो, तो प्रत्येकाला वेड लावतो.
बालपणी प्रत्येकाला मोठे व्हावेसे वाटते, त्याला विचारले की तुला काय व्हायचे आहे तर तो म्हणेल मला मोठे व्हायचे आहे. कधी वाटते माणसाने मोठे होऊन काय कमावले?   या जगात चालणारा गोंगाट, खोटेपणा, लाचारी, लुच्चेपणा यापैकी कशाचाही परिचय लहानपणी बालकाला नसतो.मात्र तो जसजसा मोठा होतो, त्याला आपल्या आजूबाजूला चालणाऱ्या गोष्टी बघायला मिळतात. तसतसा तो आपल्यात बदल करत जातो. शाळेतली रांगेत चालण्याची शिस्त मोठेपणी सिग्नलवर नाहीशी होते. सत्य आणि प्रामाणिकतेचे धडे गिरवून मोठा झालेला मुलगा साहेब बणल्यावर भ्रष्टाचार करताना कचरत नाही.या सर्व गोष्टीला समाज म्हणून आपणच जबाबदार असतो.कारण शाळेत त्याला कितीही आदर्श गोष्टी शिकवल्या तरी जेव्हा तो एक नागरिक म्हणून या जगाच्या प्रांगणात पाऊल ठेवतो,त्यावेळी त्याला अनेक विरोधाभास दिसू लागतात आणि मग तो स्वतः च या सर्व गोष्टीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करता करता कधी येथील परिस्थितीचा एक भाग बनून जातो ते त्याचे त्यालाही समजत नाही.
कधी वाटते, आपण कितीजरी मोठे झालो तरी आपल्यात एक बालक कायम जिवंत असावा, तो बालक मरता कामा नये. आमच्यातला तो बालक जर मरून गेला तर तो सोबत त्या सर्वच गोष्टी घेऊन जाईल. आणि शिल्लक राहील नुसती चिंता, निरुत्साह, द्वेष, लालसा, जीवघेणी स्पर्धा, खोटेपणा, आणि लुच्चेगिरी. म्हणून असे वाटते की बालपण एक शुद्ध जीवन असते. कसली पर्वा नसते आणि कसली भीती नसते, कसला दिखावा नसतो अन कसली काळजी नसते. फक्त एक आनंदाचा झरा असतो, तो खळखळत असतो, आनंदाचा गुंजारव करत असतो, तो गुंजारव शाळेत रांगेत बसलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर दिसतो, कधी प्रार्थनेसाठी जोडलेल्या हातासोबत जोडलेल्या हृदयात दिसतो, कधी बोबड्या बोलात दिसतो. वाळूत किल्ले बनविणाऱ्या हातात दिसतो, गल्लीत मुक्त बागडणाऱ्या पावलात दिसतो, सुरपारोंब्या खेळणाऱ्या झाडांच्या फांदीवर दिसतो.
त्या गुंजारवात मला माझे बालपण दिसू लागते. माझ्यातला बालक जागा होतो आणि मला बालपण खुणावू लागते. 
-राजेश खाकरे 
मो.७८७५४३८४९४
rajesh.khakre@gmail.com

दादाजी तुमचे येणे


दादाजी तुमचे येणे...!

१९ ऑक्टोंबर मनुष्य गौरव दिन.पूजनीय पांडुरंगशास्त्री वैजनाथशास्त्री आठवले (दादाजी) यांचा जन्मदिन. जगभरातील स्वाध्यायी हा दिवस मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतात.रोहा (जि. रायगड) येथे १९ ऑक्टोंबर १९२० ला दादांचा जन्म झाला. दादाजींनी ज्ञान, कर्म आणि भक्ती यांच्या माध्यमातून धर्म आणि अध्यात्म क्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडवून आणली. गीता, वेद, उपनिषद यांचे विचार एका वेगळ्या दृष्टिकोनातून आणि वैज्ञानिक अधिष्ठान ठेवून बुद्धिप्रामाण्यातून समाजापुढे मांडले. धर्म, अध्यात्म हे केवळ कर्मकांड नाही तर, जगातील सर्वच समस्या ह्या धर्माच्या माध्यमातून सुटू शकतात.हे दादाजींनी विविध प्रयोगातून सिद्ध केले, धर्मभेद,उच्च-नीच भाव, जातीयता, have & have not ह्या दऱ्या जर दूर करायच्या असतील तर त्या केवळ देव आणि भक्तीच्या माध्यमातूनच दूर होऊ शकतात, हे दादांनी पटवून दिले. "Bhakti is a social force" भक्ती ही सामाजिक शक्ती आहे. आणि या शक्तीच्या साहाय्याने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही घडू शकतात ते दादांनी गावागावात शेतकरी बांधवांसाठी १०,००० पेक्षा जास्त योगेश्वर कृषि, सागरपुत्रासाठी मत्स्यगंधा, घरमंदिर, अमृतालयम, हिरामंदिर, आदी प्रयोगातून सिद्ध केले.गीतेच्या"स्वकर्मनां तमभ्यर्च्य सिद्धी विन्दती मानवा:" या श्लोकाचे मूर्तिमंत रूप म्हणजे दादाजींनी दिलेले विविध प्रयोग.
भगवंताकडे भीतीतुन नव्हे तर प्रीतीतून जायला हवे, भगवंताचा आणि माझा काही संबंध आहे, आणि त्याच संबंधातून आम्ही त्याच्याकडे गेले पाहिजे, भगवंतावर बौद्धिक प्रेम निर्माण झाले पाहिजे. आज मंदिरात जाणाऱ्या रांगा बघितल्या तर काहीतरी मागायला, तक्रार करायला, किंवा भीतीतून माणूस देवाकडे जातो आहे, त्यात माणसाचा विकास नाही. या गोष्टी दादाजी नीं समजावल्या. आणि देव, धर्म, संस्कृती यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकला.
मी देवाचा आहे, माझ्यासोबत देव आहे, कुठे आकाशात बसून नाही तर माझ्या हृदयात राहून तो माझे जीवन चालवतो, मला सकाळी उठवतो, स्मृती देतो, मी जे अन्न खातो, त्या अन्नाचे पचन कसे करायचे ते मला माहित नाही, रक्त कसे बनते ते मला माहित नाही, मी चालतो बोलतो,हसतो, रात्री दमून भागून थकून अंथरुणावर पडतो, तेव्हा मला शांत झोप लागते, मला झोप काय ते माहीत नाही, मात्र तरीही या सर्व क्रिया होतात, या खरेतर मी करत नाही, कुणी आत शक्ती माझ्यात बसली आहे, ह्रदयात वसली आहे, तीच शक्ती म्हणजे भगवंत. आणि तिच्याप्रति माणसाने कृतज्ञ असले पाहिजे, तिचा आणि माझा काही संबंध असेल तर मी कृतज्ञतापूर्वक त्या शक्तीची आठवण केली पाहिजे, माझ्या मनात त्या शक्तीबद्दल प्रेम निर्माण झाले पाहिजे, दादांनी या गोष्टी समजावल्या आणि माणसाची देवाकडे बघायची दृष्टी बदलून गेली. त्यासाठी दादांनी त्रिकाल संध्या दिली.त्रिकाल संध्या म्हणजे कर्मकांड नाही,तर ज्या भगवंताने मला उठवले,मी खाल्लेले अन्न पचवले आणि मला झोप देऊन शांतीदान दिले,त्याच्याप्रतीची कृतज्ञता व्यक्त करणे आणि या तीन वेळी त्याला नमस्कार करणे म्हणजे त्रिकाळसंध्या.
धर्माचे खऱ्या अर्थाने पुनरुत्थान दादाजींनी केले, तीर्थयात्रा, एकादशी, मंदिर, सण, उत्सव,मूर्तिपूजा यांच्या पाठीमागचे विज्ञान समजावले, एकादशी म्हणजे खाण्यात नव्हे तर चालण्यात बदल, पंधरा दिवसातून एक दिवस देवासाठी, दैवी कार्यासाठी देणे, पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये आणि अकरावे मन अशा अकरा गोष्टी या दिवशी भगवंतासाठी वापरणे म्हणजे एकादशी, मूर्तिपूजेचे महत्व सांगतांना दादाजी म्हणतात की, "murtipooja is a perfect science" मूर्तिपूजा ही पूर्ण शास्त्रीय आहे. माणसाचे मन शक्तिशाली (powerful), संवेदनशील(sensitive), आणि प्रगमनशील बनविण्यासाठी मूर्तिपूजेसारखे दुसरे साधन नाही. मूर्तिपूजा म्हणजे केवळ देवाला गंध अक्षदा वाहणे नाही तर तो मनावर केलेला उपचार आहे. मानवी मनात प्रचंड क्षमता आहे. त्याला आपण जसे घडवू, त्यावर जसे संस्कार करू त्याप्रमाणे ते तयार होते, मूर्तिपूजेत चित्तएकाग्रतेला महत्व आहे, आपल्या आराध्य देवतेच्या मूर्तीत चित्त एकाग्र करून त्यातून आपल्या मनावर संस्कार घडत जातात. मानवी मनाच्या विकासासाठी मूर्तिपूजा आहे.
'बेटा तेरा भला हो जायेगा' म्हणत कित्येक भक्तांना आणि आपल्या अनुयायांना गंडवणाऱ्या आजच्या काळात दादाजी गुरु बनून कुणाजवळ आले नाहीत, तर एक मोठा भाऊ बनून आले, त्याला प्रेमाने समजावले कि तू माझा भाऊ आहे, कारण तुझा आणि माझा रक्ताचा नव्हे तर रक्त बनविणाऱ्याचा संबंध आहे. Other is not other, he is my divine brother. दुसरा दुसरा नाही तर तो माझा दैवी भाऊ आहे, याच संबंधातून आज विश्वभरात विशाल स्वाध्याय परिवार उभा झाला आहे. दादांनी कुणाला गंडा दिला नाही किंवा कधी गंडा घातला ही नाही. अमुक एक पोशाख करा, अमुक माळा घाला,असेही कधी सांगितले नाही. "न विचित्र वेषं क्रुयात" या तत्वानुसार दादाजींनी कधी वेगळा वेष धारण केला नाही.दादा सामान्य बनून राहिले. सामान्यांत राहिले आणि त्यांच्याकडून असामान्य काम करून घेतले. गीतेचे विचार घेऊन माणसां-माणसापर्यंत गेले आणि "उद्धरे दात्मनात्मानाम" तुझा उद्धार तुलाच करायचा आहे,सांगून माणसाला उठविले, त्याच्यात अस्मिता जागृत केली. आणि गीतेचे विचार आणि प्रेमाची शिदोरी सोबत घेऊन दादाजी आयुष्यभर झिजत राहिले. परिणामी दादाजींच्या स्वप्नातील एक दैवी परिवार उभा झाला. भावफेरी, भक्तिफेरी, एकादशी व्रती, तीर्थयात्रा यांच्या माध्यमातून गीतेचे विचार घराघरात पोचले. स्वाध्याय केंद्र, प्रवचन केंद्र च्या माध्यमातून गीता, वेद, उपनिषदांचे विचार गाव आणि शहरापर्यंत पोहचले, महिला केंद्रातुन स्त्रीशक्ती जागृत झाली,युवा केंद्राने युवकांना ध्येय आणि दिशा दिली. युवक गीताजयंती वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने गीतेच्या विचारांचा स्वाध्याय करायला लागला, श्रीकृष्णजन्माष्टमी पथनाट्यातून भगवान श्रीकृष्णाला मानवंदना करू लागला.युवती केंद्र,युवाकेंद्रातील चरित्र दर्शन,डिबेट, उत्सव दर्शन, यातून युवकांची बौद्धिक विकास घडवून आला तर सूर्यनामस्कारातून शारीरिक विकासमाणार्ह केंद्रातून वयोवृद्ध आणि तपोवृद्ध व्यक्तींचे विचारमंथन घडवून आणले, बालसंस्कार केंद्रातून बालकांच्या बालमनावर सुसंस्कार सिंचन केले.असे असंख्य अष्टामृत केंद्र आज भारत आणि भारताबाहेरही सुरु आहेत.
स्वाध्याय जीवनपद्धती शिकवतो, जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीत आनंदाने जगायला शिकविणारी शाळा म्हणजे स्वाध्याय. ते एक निराळेच स्पिरिट आहे. स्वाध्याय विचार अंगिकारलेली व्यक्ती भाकरीचा कोरडा तुकडा खाईल मात्र कधी रडत बसणार नाही,त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण खुमारी जाणवेल, ती खुमारी त्याच्यात दादांनी भरली आहे.प्रभुबद्दल निर्व्याज प्रेम आणि विश्वास यातून ती आली आहे. त्याच्या जीवनात सुख आले तरी तो हुरळून जाणार नाही, त्याला तो प्रभूचे प्रेम समजेल, दुःख आले तर तो रडत बसणार नाही. तो दुःखापासून काही शिकेल, त्याला प्रभुचा प्रसादच समजेल, सुख दुःख हे मला अधिक भक्कम करायला भगवंत पाठवतो असेच तो म्हणेल.
भौतिक साधने मिळाल्याने किंवा पैसा आणि वैभव मिळाल्याने माणूस जर सुखी होऊ शकला असता तर सगळे करोडपती आज सुखी दिसले असते,मात्र तसे दिसत नाही. सुख ही निराळीच गोष्ट आहे, ती आणि ते ज्याला समजले तोच खरा सुखी आहे. माणसाकडे एक अशी जीवनदृष्टी असणे आवश्यक आहे;ज्यामुळे तो कुठल्याही परिस्थितीत भक्कमपणे उभा राहू शकेल,तरच तो सुखी होऊ शकेल, समाधानी होऊ शकेल, ती जीवनदृष्टी दादाजींनी स्वाध्याय विचारांतून दिली. माणसाला केंद्रस्थानी ठेवून भगवंत, सृष्टी, आणि संस्कृती यांना एका माळेत गुंफून विविध प्रयोगाद्वारे आणि दैवी विचाराद्वारे, निःस्वार्थ प्रेमाच्या माध्यमातून मानवी जीवनाला अधिकाधिक उन्नत मार्गाकडे दादाजी घेऊन  गेले.खऱ्या अर्थाने मनुष्य गौरव करणाऱ्या आणि साकारणाऱ्या पूजनीय दादांजीना त्यांच्या जन्मदिनानिमित्त ह्रदयपूर्वक वंदन..
-राजेश खाकरे
औरंगाबाद
मो.७८७५४३८४९४

मनुष्य गौरव दिन

--------------------------------------------------
१९ ऑक्टोंबर, स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्मदिवस. संपूर्ण विश्वातील स्वाध्यायी हा दिवस मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतात. पांडुरंगशास्त्री यांचे संपूर्ण नाव पांडुरंगशास्त्री वैजीनाथशास्त्री आठवले. स्वाध्यायी त्यांना आपले मोठे बंधू या नात्याने दादाजी म्हणतात. दादांचा जन्म दिनांक १९ ऑक्टोंबर १९२० ला रायगड जिल्ह्यातल्या रोहा या गावी झाला. दादांनी उभा केलेला स्वाध्याय परिवार आणि स्वाध्याय विचार आज विश्वातल्या कानाकोपऱ्यात गेला आहे.त्यांच्या ९७ व्या जन्मदिवासानिमित्त ही भाववंदना
--------------------------------------------------
मनुष्य गौरव दिन
"केवळ दोन पायावर चालतो म्हणून कुणी माणूस होऊ शकत नाही, जर तसे असेल तर कावळा ही दोन पायावर चालतो मग त्याला पण माणूस म्हणणार का..? माणूस कुणाला म्हणायचे हा मोठाच प्रश्न आहे, प्रत्येक पशु पक्षी प्राण्याला तर माणूस म्हणता येत नाही, म्हणजे माणसाचे काही वेगळेपण आहे, त्याची काही वेगळी ओळख आहे. केवळ जगतो, श्वासोच्छवास करतो म्हणूनही कुणाला माणूस म्हणता येत नाही. माणसाला भगवंताने काही विशेष बनवले आहे." दादा जेव्हा समोर बसलेल्या विशाल जनसमुदायासमोर ह्या ओळी उच्चारतात तेव्हा ते शब्द प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेतात. ते केवळ शब्द राहत नाही तर एखाद्या मंत्राप्रमाणे ते माणसाच्या मन बुद्धीत संचारीत होतात.
माणूस स्वतः बद्दल  विचार करायला लागतो. मी एक माणूस.. खरंच मी माणूस आहे म्हणजे नेमके काय आहे.? मला माणसाचे शरीर मिळाले म्हणून मी माणूस आहे, मी संसार करतो म्हणून माणूस असेन तर पशु पक्षीही आपल्या पिलांना जन्म देतात, त्यांना खाऊ पिऊ घालतात, त्यांचा सांभाळ करतात.सृष्टीतील इतर प्राण्यांपेक्षा माझ्यात काय विशेष आहे म्हणून मी माणूस आहे? मी जर माणूस आहे तर मी माणूस म्हणून जगतो का? माणूस म्हणून वागतो का? माझ्यात माणूसपण आहे का.? आणि तिथून सुरु होतो माणसाचा स्वतः विषयीचा अभ्यास.. स्वाध्याय.
दादा समजावतात की, "ज्याच्यात अस्मिता, कृतज्ञता,आणि भावमयता आहे तोच खरा माणूस आहे". माणसाचा स्वतः बद्दलचा स्वाभिमान म्हणजे अस्मिता, केलेले प्रेम आणि उपकार यांची जाणीव म्हणजे कृतज्ञता, आणि दुसऱ्याकडे, माणसाकडे, सृष्टीकडे भावपूर्ण नजरेने बघण्याची क्षमता म्हणजे भावमयता. या गोष्टी जर माणसात नसतील तर त्याला माणूस म्हणता येणार नाही. आज आपण बघितले तर आज माणसाकडे या तिनही गुणांचा काही अपवाद सोडले तर अभावच दिसतो. समाजात बघितले तर पद, प्रतिष्ठा आणि पैसा या तीन गोष्टीलाच जास्त महत्व आहे. प्रत्येकजण या गोष्टीमागे धावतो आहे. स्वतः चे अस्तित्वच हरवून गेले आहे. माणूस मोठा का तर त्याच्याकडे पैसा आहे म्हणून मोठा, पद आहे म्हणून मोठा, प्रतिष्ठा आहे म्हणून मोठा, मात्र यात कुठेतरी माणूसपण हरवून गेले आहे. ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तो कमी पैशावाल्याला तुच्छ समजतो, तर त्याच्यापेक्षा अधिक पैसेवाला दिसला की स्वतः ला लहान समजतो, हेच पद, प्रतिष्ठेच्या बाबतीतसुद्धा लागू होते. माणूस माणूस म्हणून मोठा आहे असे दिसत नाही. तर त्याच्याकडे काय आहे, यावरून माणसाची किंमत ठरते. आणि हीच बाब दादांजीना खटकत होती. त्यांना वाटायचे कि, पद, प्रतिष्ठा आणि पैसा यांच्याशिवाय माणसाचे काहीच मूल्य नाही का..? दुधात साखर, केशर, इलायची, खोबरं घातले तर दुधाची किंमत वाढेलच पण दुधाला स्वतः ची पण एक किंमत आहे, तीच म्हणजे अस्मिता किंवा आत्मगौरव. आणि हा आत्मगौरव माणसाला उभा करतो, त्याला शक्तिशाली बनवतो. माणूस हा न्यूनगंड, भयगंड आणि अहंगंड या तीन गंडानी ग्रस्त होतो म्हणून त्याचा विकास होत नाही हे फ्राईडने सांगितले होते. ज्याच्याकडे काही नाही त्याच्यात न्यूनगंड येतो, ज्याच्याकडे काही आहे तो अहंगंडाचा शिकार बनतो, माझ्याच्याने होईल का, मला जमेल का ही भीती भयगंडाला जन्म घालते. या मानसशास्त्रावर दादांनी तोडगाच शोधून काढला. सामान्यातल्या सामान्य माणसात दादांनी अस्मिता उभी केली. दादांनी समजावले कि, या सृष्टीचा पालनकर्ता भगवंत तुझ्या शरीरात येऊन बसला आहे." सर्वस्यच्याहं हृदिसान्निविष्टो" असे गीतेत स्वतः च भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. आणि जर या सृष्टीला चालविणारा, तसेच माझे शरीर चालविणारा भगवंत जर माझ्यासोबत असेल तर मग मी छोटा कसा असेल? मला दोन शर्ट कमी आहेत म्हणून मी छोटा नाही, मी मोठयांचा (भगवंताचा) आहे म्हणून मी मोठा आहे. त्यामुळे माणसात आत्मगौरव निर्माण झाला.त्याचा न्यूनगंड गळून पडला. भगवंतावर प्रीतीतून भक्ती निर्माण झाली. भगवंतावर बौद्धिक प्रेम निर्माण झाले. मी भगवंतांमुळे मोठा आहे त्यातून अहंगंड गळाला, आणि भगवंतच माझ्यासोबत आहे, ही जाणीव झाल्याने भीती निघून गेली.
मला जसे देवाने निर्माण केले आणि तो माझ्यासोबत माझ्या हृदयात राहतो आहे, माझे जीवन चालवतो आहे, तसाच तो भगवंत दुसऱ्यात पण आहे म्हणजे त्याचा आणि माझा काही संबंध आहे, ही जाणीव म्हणजे परसन्मान. आत्मगौरव आणि परसन्मान मिळून मनुष्य गौरव तयार होतो. दादा आयुष्यभर मनुष्य गौरवासाठी झिजले, मनुष्य गौरव हे जणू स्वाध्यायाचे दुसरे नावच आहे. माणूस चांगला बनावा, माणूस कृतज्ञी बनावा, लाखो लोकांचा एक परिवार बनावा, हे स्वप्न दादाजींने बघितले, त्यासाठी झिजले आणि साकार केले.
स्वाध्याय म्हणजे चांगले जीवन, आनंदी जीवन आणि प्रभूला आवडेल असे जीवन जगण्याची पद्धती. स्वाध्याय म्हणजे स्वतः चे अध्ययन, स्वतः च्या जीवनविकास, स्वाध्याय म्हणजे निःस्वार्थ प्रेम करण्याचा अभ्यास, स्वाध्याय म्हणजे दिव्यात्वाचा ध्यास, स्वाध्याय म्हणजे एक जीवनवृत्ती, स्वाध्याय म्हणजे एक विचारप्रवृत्ती, स्वाध्याय म्हणजे एक संस्कृती, स्वाध्याय म्हणजे सदवृत्ती, स्वाध्याय म्हणजे एक विश्वकुटुंब, स्वाध्याय म्हणजे प्रभूप्रेमरती,
दादांनी स्वाध्यायाचे रोपटे लावले, त्याला प्रेम आणि विचारांचे खतपाणी घातले. केवळ विचार देऊन दादाजी थांबले नाहीत तर ते विचार घेऊन हार्ट टू हार्ट(heart to heart) आणि हट टू हट (Hut to Hut) गेले, माणसाला उभे केले.माणसाला घडवले त्रिकाल संध्या,स्वाध्याय केंद्र, युवा केंद्र, बाल संस्कार केंद्र, युवती केंद्र, महिला केंद्र,माणार्ह केंद्र,प्रवचन केंद्र आदी केंद्रातून ज्ञान आणि भक्ती फुलवली तर योगेश्वर कृषि, निर्मलनिर, वृक्षमंदिर, हिरामंदिर, मत्स्यगंधा, भावफेरी,भक्तिफेरी,तीर्थयात्रा, एकादशी, व्रती, आदी विविध प्रयोगातून स्वाध्यायी कर्मभक्ती करू लागले. माणसाचे माणसाशी, माणसाचे सृष्टीशी, आणि माणसाचे भगवंताशी नाते दादांनी जोडले.
या जगात आज बघतो तेव्हा, सर्वत्र लाचारी दिसते, मागणी दिसते, स्वार्थ दिसतो, कुरघोडी दिसते, भ्रष्टाचार, अप्रामाणिकता दिसते, कुटुंबव्यवस्था ढासळताना दिसते, माणुसकी परेशान दिसते, मात्र त्याचवेळी नजर दादांच्या स्वाध्याय परिवारावर आणि स्वाध्याय कार्यावर जाते, मला निःस्वार्थ प्रेम दिसते, दुसर्याबद्दल भाव दिसतो, जगण्याचा आशावाद दिसतो.माझा नातेवाईक कामाशिवाय मला भेटायला येत नाही पण दादांचा स्वाध्यायी येतो, त्याला माझ्याकडून काहीच नको असते, आभाराचीही अपेक्षा नसते. तो काही मिनिटे येतो, मला जीवन समजावून जातो. माझ्यात ऊर्जा पेरून जातो. जगाकडे बघितले आणि स्वाध्याय परिवाराकडे बघितले तर अगदी विरोधाभास वाटावे असे चित्र दिसते. आज लाखोंच्या संख्येने स्वाध्यायी आमच्या अवतीभवती प्रेम आणि विचार वाटत फिरतात. ते आम्हाला ठळक वाटावे असे दिसत नाही, कारण ते प्रचार करत नाही, पोस्टर लावत नाही, जाहिरात करत नाही. मात्र ते खऱ्या अर्थाने मनुष्य गौरव निर्माण करताहेत.ते सरळ हृदयात शिरतात आणि माणसाला हृदयापासून बदलून टाकतात. माणसात खऱ्या अर्थाने मनुष्यगौरव निर्माण करणाऱ्या पूजनीय दादांजीना ह्रदयपूर्वक वंदन..!
-राजेश खाकरे
औरंगाबाद
मो.७८७५४३८४९४

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...