बालपण: एक आनंददायी जीवनकाळ

बालपण: एक आनंददायी जीवनकाळ

बालपण हा आयुष्याचा खूप सुंदर काळ असतो. ज्यावेळी एक जीव या पृथ्वीवर जन्म घेतो,त्यावेळी तो एकदम स्वच्छ,निरागस, निष्पाप असा जीव असतो.बालपण किंवा लहानपण हे खूप छान होते याची जाणीव मोठे झाल्यावर प्रत्येकाला होते.बालपणात एक सात्त्विकता असते.एखाद्या लहान मुलाकडे बघितले कि आपल्याला कसे प्रसन्न वाटते. त्याच्या चेहऱ्यावरुन एक चैतन्य ओसंडून वाहत असते. त्याच्या चेहऱ्यावर कायम हास्य झळकत असते. बालक कधी निराश, हतोत्साही, दमलेला दिसत नाही.तो कधी रडेलही पण रडगाणे गात बसणार नाही. तो कायम काहीतरी करत असतो, कशात तरी रमलेला असतो. त्याच्या मनात कुणाविषयी द्वेषभावना किंवा वैर तो ठेवत नाही. त्याला उद्याची चिंता नसते. तो प्रत्येक क्षणात रमत जातो, त्याच्या खेळात गुंतत जातो. त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या चांगल्यावाईट घटनांचा परिणाम त्याच्यावर होत नाही. त्याचे जीवन एखाद्या स्थितप्रज्ञासारखे असते. त्याच्या हास्यात एक निर्व्याजता असते. खोटेपणा नसतो, तो झोपतो तेव्हा शांत असतो, खेळतो तेव्हा उत्साही असतो, शिकतो तेव्हा जिज्ञासू असतो, हसतो तेव्हा प्रसन्न असतो, रडतो तेव्हा हट्टी असतो, तो प्रत्येकाला वेड लावतो.
बालपणी प्रत्येकाला मोठे व्हावेसे वाटते, त्याला विचारले की तुला काय व्हायचे आहे तर तो म्हणेल मला मोठे व्हायचे आहे. कधी वाटते माणसाने मोठे होऊन काय कमावले?   या जगात चालणारा गोंगाट, खोटेपणा, लाचारी, लुच्चेपणा यापैकी कशाचाही परिचय लहानपणी बालकाला नसतो.मात्र तो जसजसा मोठा होतो, त्याला आपल्या आजूबाजूला चालणाऱ्या गोष्टी बघायला मिळतात. तसतसा तो आपल्यात बदल करत जातो. शाळेतली रांगेत चालण्याची शिस्त मोठेपणी सिग्नलवर नाहीशी होते. सत्य आणि प्रामाणिकतेचे धडे गिरवून मोठा झालेला मुलगा साहेब बणल्यावर भ्रष्टाचार करताना कचरत नाही.या सर्व गोष्टीला समाज म्हणून आपणच जबाबदार असतो.कारण शाळेत त्याला कितीही आदर्श गोष्टी शिकवल्या तरी जेव्हा तो एक नागरिक म्हणून या जगाच्या प्रांगणात पाऊल ठेवतो,त्यावेळी त्याला अनेक विरोधाभास दिसू लागतात आणि मग तो स्वतः च या सर्व गोष्टीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करता करता कधी येथील परिस्थितीचा एक भाग बनून जातो ते त्याचे त्यालाही समजत नाही.
कधी वाटते, आपण कितीजरी मोठे झालो तरी आपल्यात एक बालक कायम जिवंत असावा, तो बालक मरता कामा नये. आमच्यातला तो बालक जर मरून गेला तर तो सोबत त्या सर्वच गोष्टी घेऊन जाईल. आणि शिल्लक राहील नुसती चिंता, निरुत्साह, द्वेष, लालसा, जीवघेणी स्पर्धा, खोटेपणा, आणि लुच्चेगिरी. म्हणून असे वाटते की बालपण एक शुद्ध जीवन असते. कसली पर्वा नसते आणि कसली भीती नसते, कसला दिखावा नसतो अन कसली काळजी नसते. फक्त एक आनंदाचा झरा असतो, तो खळखळत असतो, आनंदाचा गुंजारव करत असतो, तो गुंजारव शाळेत रांगेत बसलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर दिसतो, कधी प्रार्थनेसाठी जोडलेल्या हातासोबत जोडलेल्या हृदयात दिसतो, कधी बोबड्या बोलात दिसतो. वाळूत किल्ले बनविणाऱ्या हातात दिसतो, गल्लीत मुक्त बागडणाऱ्या पावलात दिसतो, सुरपारोंब्या खेळणाऱ्या झाडांच्या फांदीवर दिसतो.
त्या गुंजारवात मला माझे बालपण दिसू लागते. माझ्यातला बालक जागा होतो आणि मला बालपण खुणावू लागते. 
-राजेश खाकरे 
मो.७८७५४३८४९४
rajesh.khakre@gmail.com

दादाजी तुमचे येणे


दादाजी तुमचे येणे...!

१९ ऑक्टोंबर मनुष्य गौरव दिन.पूजनीय पांडुरंगशास्त्री वैजनाथशास्त्री आठवले (दादाजी) यांचा जन्मदिन. जगभरातील स्वाध्यायी हा दिवस मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतात.रोहा (जि. रायगड) येथे १९ ऑक्टोंबर १९२० ला दादांचा जन्म झाला. दादाजींनी ज्ञान, कर्म आणि भक्ती यांच्या माध्यमातून धर्म आणि अध्यात्म क्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडवून आणली. गीता, वेद, उपनिषद यांचे विचार एका वेगळ्या दृष्टिकोनातून आणि वैज्ञानिक अधिष्ठान ठेवून बुद्धिप्रामाण्यातून समाजापुढे मांडले. धर्म, अध्यात्म हे केवळ कर्मकांड नाही तर, जगातील सर्वच समस्या ह्या धर्माच्या माध्यमातून सुटू शकतात.हे दादाजींनी विविध प्रयोगातून सिद्ध केले, धर्मभेद,उच्च-नीच भाव, जातीयता, have & have not ह्या दऱ्या जर दूर करायच्या असतील तर त्या केवळ देव आणि भक्तीच्या माध्यमातूनच दूर होऊ शकतात, हे दादांनी पटवून दिले. "Bhakti is a social force" भक्ती ही सामाजिक शक्ती आहे. आणि या शक्तीच्या साहाय्याने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही घडू शकतात ते दादांनी गावागावात शेतकरी बांधवांसाठी १०,००० पेक्षा जास्त योगेश्वर कृषि, सागरपुत्रासाठी मत्स्यगंधा, घरमंदिर, अमृतालयम, हिरामंदिर, आदी प्रयोगातून सिद्ध केले.गीतेच्या"स्वकर्मनां तमभ्यर्च्य सिद्धी विन्दती मानवा:" या श्लोकाचे मूर्तिमंत रूप म्हणजे दादाजींनी दिलेले विविध प्रयोग.
भगवंताकडे भीतीतुन नव्हे तर प्रीतीतून जायला हवे, भगवंताचा आणि माझा काही संबंध आहे, आणि त्याच संबंधातून आम्ही त्याच्याकडे गेले पाहिजे, भगवंतावर बौद्धिक प्रेम निर्माण झाले पाहिजे. आज मंदिरात जाणाऱ्या रांगा बघितल्या तर काहीतरी मागायला, तक्रार करायला, किंवा भीतीतून माणूस देवाकडे जातो आहे, त्यात माणसाचा विकास नाही. या गोष्टी दादाजी नीं समजावल्या. आणि देव, धर्म, संस्कृती यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकला.
मी देवाचा आहे, माझ्यासोबत देव आहे, कुठे आकाशात बसून नाही तर माझ्या हृदयात राहून तो माझे जीवन चालवतो, मला सकाळी उठवतो, स्मृती देतो, मी जे अन्न खातो, त्या अन्नाचे पचन कसे करायचे ते मला माहित नाही, रक्त कसे बनते ते मला माहित नाही, मी चालतो बोलतो,हसतो, रात्री दमून भागून थकून अंथरुणावर पडतो, तेव्हा मला शांत झोप लागते, मला झोप काय ते माहीत नाही, मात्र तरीही या सर्व क्रिया होतात, या खरेतर मी करत नाही, कुणी आत शक्ती माझ्यात बसली आहे, ह्रदयात वसली आहे, तीच शक्ती म्हणजे भगवंत. आणि तिच्याप्रति माणसाने कृतज्ञ असले पाहिजे, तिचा आणि माझा काही संबंध असेल तर मी कृतज्ञतापूर्वक त्या शक्तीची आठवण केली पाहिजे, माझ्या मनात त्या शक्तीबद्दल प्रेम निर्माण झाले पाहिजे, दादांनी या गोष्टी समजावल्या आणि माणसाची देवाकडे बघायची दृष्टी बदलून गेली. त्यासाठी दादांनी त्रिकाल संध्या दिली.त्रिकाल संध्या म्हणजे कर्मकांड नाही,तर ज्या भगवंताने मला उठवले,मी खाल्लेले अन्न पचवले आणि मला झोप देऊन शांतीदान दिले,त्याच्याप्रतीची कृतज्ञता व्यक्त करणे आणि या तीन वेळी त्याला नमस्कार करणे म्हणजे त्रिकाळसंध्या.
धर्माचे खऱ्या अर्थाने पुनरुत्थान दादाजींनी केले, तीर्थयात्रा, एकादशी, मंदिर, सण, उत्सव,मूर्तिपूजा यांच्या पाठीमागचे विज्ञान समजावले, एकादशी म्हणजे खाण्यात नव्हे तर चालण्यात बदल, पंधरा दिवसातून एक दिवस देवासाठी, दैवी कार्यासाठी देणे, पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये आणि अकरावे मन अशा अकरा गोष्टी या दिवशी भगवंतासाठी वापरणे म्हणजे एकादशी, मूर्तिपूजेचे महत्व सांगतांना दादाजी म्हणतात की, "murtipooja is a perfect science" मूर्तिपूजा ही पूर्ण शास्त्रीय आहे. माणसाचे मन शक्तिशाली (powerful), संवेदनशील(sensitive), आणि प्रगमनशील बनविण्यासाठी मूर्तिपूजेसारखे दुसरे साधन नाही. मूर्तिपूजा म्हणजे केवळ देवाला गंध अक्षदा वाहणे नाही तर तो मनावर केलेला उपचार आहे. मानवी मनात प्रचंड क्षमता आहे. त्याला आपण जसे घडवू, त्यावर जसे संस्कार करू त्याप्रमाणे ते तयार होते, मूर्तिपूजेत चित्तएकाग्रतेला महत्व आहे, आपल्या आराध्य देवतेच्या मूर्तीत चित्त एकाग्र करून त्यातून आपल्या मनावर संस्कार घडत जातात. मानवी मनाच्या विकासासाठी मूर्तिपूजा आहे.
'बेटा तेरा भला हो जायेगा' म्हणत कित्येक भक्तांना आणि आपल्या अनुयायांना गंडवणाऱ्या आजच्या काळात दादाजी गुरु बनून कुणाजवळ आले नाहीत, तर एक मोठा भाऊ बनून आले, त्याला प्रेमाने समजावले कि तू माझा भाऊ आहे, कारण तुझा आणि माझा रक्ताचा नव्हे तर रक्त बनविणाऱ्याचा संबंध आहे. Other is not other, he is my divine brother. दुसरा दुसरा नाही तर तो माझा दैवी भाऊ आहे, याच संबंधातून आज विश्वभरात विशाल स्वाध्याय परिवार उभा झाला आहे. दादांनी कुणाला गंडा दिला नाही किंवा कधी गंडा घातला ही नाही. अमुक एक पोशाख करा, अमुक माळा घाला,असेही कधी सांगितले नाही. "न विचित्र वेषं क्रुयात" या तत्वानुसार दादाजींनी कधी वेगळा वेष धारण केला नाही.दादा सामान्य बनून राहिले. सामान्यांत राहिले आणि त्यांच्याकडून असामान्य काम करून घेतले. गीतेचे विचार घेऊन माणसां-माणसापर्यंत गेले आणि "उद्धरे दात्मनात्मानाम" तुझा उद्धार तुलाच करायचा आहे,सांगून माणसाला उठविले, त्याच्यात अस्मिता जागृत केली. आणि गीतेचे विचार आणि प्रेमाची शिदोरी सोबत घेऊन दादाजी आयुष्यभर झिजत राहिले. परिणामी दादाजींच्या स्वप्नातील एक दैवी परिवार उभा झाला. भावफेरी, भक्तिफेरी, एकादशी व्रती, तीर्थयात्रा यांच्या माध्यमातून गीतेचे विचार घराघरात पोचले. स्वाध्याय केंद्र, प्रवचन केंद्र च्या माध्यमातून गीता, वेद, उपनिषदांचे विचार गाव आणि शहरापर्यंत पोहचले, महिला केंद्रातुन स्त्रीशक्ती जागृत झाली,युवा केंद्राने युवकांना ध्येय आणि दिशा दिली. युवक गीताजयंती वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने गीतेच्या विचारांचा स्वाध्याय करायला लागला, श्रीकृष्णजन्माष्टमी पथनाट्यातून भगवान श्रीकृष्णाला मानवंदना करू लागला.युवती केंद्र,युवाकेंद्रातील चरित्र दर्शन,डिबेट, उत्सव दर्शन, यातून युवकांची बौद्धिक विकास घडवून आला तर सूर्यनामस्कारातून शारीरिक विकासमाणार्ह केंद्रातून वयोवृद्ध आणि तपोवृद्ध व्यक्तींचे विचारमंथन घडवून आणले, बालसंस्कार केंद्रातून बालकांच्या बालमनावर सुसंस्कार सिंचन केले.असे असंख्य अष्टामृत केंद्र आज भारत आणि भारताबाहेरही सुरु आहेत.
स्वाध्याय जीवनपद्धती शिकवतो, जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीत आनंदाने जगायला शिकविणारी शाळा म्हणजे स्वाध्याय. ते एक निराळेच स्पिरिट आहे. स्वाध्याय विचार अंगिकारलेली व्यक्ती भाकरीचा कोरडा तुकडा खाईल मात्र कधी रडत बसणार नाही,त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण खुमारी जाणवेल, ती खुमारी त्याच्यात दादांनी भरली आहे.प्रभुबद्दल निर्व्याज प्रेम आणि विश्वास यातून ती आली आहे. त्याच्या जीवनात सुख आले तरी तो हुरळून जाणार नाही, त्याला तो प्रभूचे प्रेम समजेल, दुःख आले तर तो रडत बसणार नाही. तो दुःखापासून काही शिकेल, त्याला प्रभुचा प्रसादच समजेल, सुख दुःख हे मला अधिक भक्कम करायला भगवंत पाठवतो असेच तो म्हणेल.
भौतिक साधने मिळाल्याने किंवा पैसा आणि वैभव मिळाल्याने माणूस जर सुखी होऊ शकला असता तर सगळे करोडपती आज सुखी दिसले असते,मात्र तसे दिसत नाही. सुख ही निराळीच गोष्ट आहे, ती आणि ते ज्याला समजले तोच खरा सुखी आहे. माणसाकडे एक अशी जीवनदृष्टी असणे आवश्यक आहे;ज्यामुळे तो कुठल्याही परिस्थितीत भक्कमपणे उभा राहू शकेल,तरच तो सुखी होऊ शकेल, समाधानी होऊ शकेल, ती जीवनदृष्टी दादाजींनी स्वाध्याय विचारांतून दिली. माणसाला केंद्रस्थानी ठेवून भगवंत, सृष्टी, आणि संस्कृती यांना एका माळेत गुंफून विविध प्रयोगाद्वारे आणि दैवी विचाराद्वारे, निःस्वार्थ प्रेमाच्या माध्यमातून मानवी जीवनाला अधिकाधिक उन्नत मार्गाकडे दादाजी घेऊन  गेले.खऱ्या अर्थाने मनुष्य गौरव करणाऱ्या आणि साकारणाऱ्या पूजनीय दादांजीना त्यांच्या जन्मदिनानिमित्त ह्रदयपूर्वक वंदन..
-राजेश खाकरे
औरंगाबाद
मो.७८७५४३८४९४

मनुष्य गौरव दिन

--------------------------------------------------
१९ ऑक्टोंबर, स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्मदिवस. संपूर्ण विश्वातील स्वाध्यायी हा दिवस मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतात. पांडुरंगशास्त्री यांचे संपूर्ण नाव पांडुरंगशास्त्री वैजीनाथशास्त्री आठवले. स्वाध्यायी त्यांना आपले मोठे बंधू या नात्याने दादाजी म्हणतात. दादांचा जन्म दिनांक १९ ऑक्टोंबर १९२० ला रायगड जिल्ह्यातल्या रोहा या गावी झाला. दादांनी उभा केलेला स्वाध्याय परिवार आणि स्वाध्याय विचार आज विश्वातल्या कानाकोपऱ्यात गेला आहे.त्यांच्या ९७ व्या जन्मदिवासानिमित्त ही भाववंदना
--------------------------------------------------
मनुष्य गौरव दिन
"केवळ दोन पायावर चालतो म्हणून कुणी माणूस होऊ शकत नाही, जर तसे असेल तर कावळा ही दोन पायावर चालतो मग त्याला पण माणूस म्हणणार का..? माणूस कुणाला म्हणायचे हा मोठाच प्रश्न आहे, प्रत्येक पशु पक्षी प्राण्याला तर माणूस म्हणता येत नाही, म्हणजे माणसाचे काही वेगळेपण आहे, त्याची काही वेगळी ओळख आहे. केवळ जगतो, श्वासोच्छवास करतो म्हणूनही कुणाला माणूस म्हणता येत नाही. माणसाला भगवंताने काही विशेष बनवले आहे." दादा जेव्हा समोर बसलेल्या विशाल जनसमुदायासमोर ह्या ओळी उच्चारतात तेव्हा ते शब्द प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेतात. ते केवळ शब्द राहत नाही तर एखाद्या मंत्राप्रमाणे ते माणसाच्या मन बुद्धीत संचारीत होतात.
माणूस स्वतः बद्दल  विचार करायला लागतो. मी एक माणूस.. खरंच मी माणूस आहे म्हणजे नेमके काय आहे.? मला माणसाचे शरीर मिळाले म्हणून मी माणूस आहे, मी संसार करतो म्हणून माणूस असेन तर पशु पक्षीही आपल्या पिलांना जन्म देतात, त्यांना खाऊ पिऊ घालतात, त्यांचा सांभाळ करतात.सृष्टीतील इतर प्राण्यांपेक्षा माझ्यात काय विशेष आहे म्हणून मी माणूस आहे? मी जर माणूस आहे तर मी माणूस म्हणून जगतो का? माणूस म्हणून वागतो का? माझ्यात माणूसपण आहे का.? आणि तिथून सुरु होतो माणसाचा स्वतः विषयीचा अभ्यास.. स्वाध्याय.
दादा समजावतात की, "ज्याच्यात अस्मिता, कृतज्ञता,आणि भावमयता आहे तोच खरा माणूस आहे". माणसाचा स्वतः बद्दलचा स्वाभिमान म्हणजे अस्मिता, केलेले प्रेम आणि उपकार यांची जाणीव म्हणजे कृतज्ञता, आणि दुसऱ्याकडे, माणसाकडे, सृष्टीकडे भावपूर्ण नजरेने बघण्याची क्षमता म्हणजे भावमयता. या गोष्टी जर माणसात नसतील तर त्याला माणूस म्हणता येणार नाही. आज आपण बघितले तर आज माणसाकडे या तिनही गुणांचा काही अपवाद सोडले तर अभावच दिसतो. समाजात बघितले तर पद, प्रतिष्ठा आणि पैसा या तीन गोष्टीलाच जास्त महत्व आहे. प्रत्येकजण या गोष्टीमागे धावतो आहे. स्वतः चे अस्तित्वच हरवून गेले आहे. माणूस मोठा का तर त्याच्याकडे पैसा आहे म्हणून मोठा, पद आहे म्हणून मोठा, प्रतिष्ठा आहे म्हणून मोठा, मात्र यात कुठेतरी माणूसपण हरवून गेले आहे. ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तो कमी पैशावाल्याला तुच्छ समजतो, तर त्याच्यापेक्षा अधिक पैसेवाला दिसला की स्वतः ला लहान समजतो, हेच पद, प्रतिष्ठेच्या बाबतीतसुद्धा लागू होते. माणूस माणूस म्हणून मोठा आहे असे दिसत नाही. तर त्याच्याकडे काय आहे, यावरून माणसाची किंमत ठरते. आणि हीच बाब दादांजीना खटकत होती. त्यांना वाटायचे कि, पद, प्रतिष्ठा आणि पैसा यांच्याशिवाय माणसाचे काहीच मूल्य नाही का..? दुधात साखर, केशर, इलायची, खोबरं घातले तर दुधाची किंमत वाढेलच पण दुधाला स्वतः ची पण एक किंमत आहे, तीच म्हणजे अस्मिता किंवा आत्मगौरव. आणि हा आत्मगौरव माणसाला उभा करतो, त्याला शक्तिशाली बनवतो. माणूस हा न्यूनगंड, भयगंड आणि अहंगंड या तीन गंडानी ग्रस्त होतो म्हणून त्याचा विकास होत नाही हे फ्राईडने सांगितले होते. ज्याच्याकडे काही नाही त्याच्यात न्यूनगंड येतो, ज्याच्याकडे काही आहे तो अहंगंडाचा शिकार बनतो, माझ्याच्याने होईल का, मला जमेल का ही भीती भयगंडाला जन्म घालते. या मानसशास्त्रावर दादांनी तोडगाच शोधून काढला. सामान्यातल्या सामान्य माणसात दादांनी अस्मिता उभी केली. दादांनी समजावले कि, या सृष्टीचा पालनकर्ता भगवंत तुझ्या शरीरात येऊन बसला आहे." सर्वस्यच्याहं हृदिसान्निविष्टो" असे गीतेत स्वतः च भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. आणि जर या सृष्टीला चालविणारा, तसेच माझे शरीर चालविणारा भगवंत जर माझ्यासोबत असेल तर मग मी छोटा कसा असेल? मला दोन शर्ट कमी आहेत म्हणून मी छोटा नाही, मी मोठयांचा (भगवंताचा) आहे म्हणून मी मोठा आहे. त्यामुळे माणसात आत्मगौरव निर्माण झाला.त्याचा न्यूनगंड गळून पडला. भगवंतावर प्रीतीतून भक्ती निर्माण झाली. भगवंतावर बौद्धिक प्रेम निर्माण झाले. मी भगवंतांमुळे मोठा आहे त्यातून अहंगंड गळाला, आणि भगवंतच माझ्यासोबत आहे, ही जाणीव झाल्याने भीती निघून गेली.
मला जसे देवाने निर्माण केले आणि तो माझ्यासोबत माझ्या हृदयात राहतो आहे, माझे जीवन चालवतो आहे, तसाच तो भगवंत दुसऱ्यात पण आहे म्हणजे त्याचा आणि माझा काही संबंध आहे, ही जाणीव म्हणजे परसन्मान. आत्मगौरव आणि परसन्मान मिळून मनुष्य गौरव तयार होतो. दादा आयुष्यभर मनुष्य गौरवासाठी झिजले, मनुष्य गौरव हे जणू स्वाध्यायाचे दुसरे नावच आहे. माणूस चांगला बनावा, माणूस कृतज्ञी बनावा, लाखो लोकांचा एक परिवार बनावा, हे स्वप्न दादाजींने बघितले, त्यासाठी झिजले आणि साकार केले.
स्वाध्याय म्हणजे चांगले जीवन, आनंदी जीवन आणि प्रभूला आवडेल असे जीवन जगण्याची पद्धती. स्वाध्याय म्हणजे स्वतः चे अध्ययन, स्वतः च्या जीवनविकास, स्वाध्याय म्हणजे निःस्वार्थ प्रेम करण्याचा अभ्यास, स्वाध्याय म्हणजे दिव्यात्वाचा ध्यास, स्वाध्याय म्हणजे एक जीवनवृत्ती, स्वाध्याय म्हणजे एक विचारप्रवृत्ती, स्वाध्याय म्हणजे एक संस्कृती, स्वाध्याय म्हणजे सदवृत्ती, स्वाध्याय म्हणजे एक विश्वकुटुंब, स्वाध्याय म्हणजे प्रभूप्रेमरती,
दादांनी स्वाध्यायाचे रोपटे लावले, त्याला प्रेम आणि विचारांचे खतपाणी घातले. केवळ विचार देऊन दादाजी थांबले नाहीत तर ते विचार घेऊन हार्ट टू हार्ट(heart to heart) आणि हट टू हट (Hut to Hut) गेले, माणसाला उभे केले.माणसाला घडवले त्रिकाल संध्या,स्वाध्याय केंद्र, युवा केंद्र, बाल संस्कार केंद्र, युवती केंद्र, महिला केंद्र,माणार्ह केंद्र,प्रवचन केंद्र आदी केंद्रातून ज्ञान आणि भक्ती फुलवली तर योगेश्वर कृषि, निर्मलनिर, वृक्षमंदिर, हिरामंदिर, मत्स्यगंधा, भावफेरी,भक्तिफेरी,तीर्थयात्रा, एकादशी, व्रती, आदी विविध प्रयोगातून स्वाध्यायी कर्मभक्ती करू लागले. माणसाचे माणसाशी, माणसाचे सृष्टीशी, आणि माणसाचे भगवंताशी नाते दादांनी जोडले.
या जगात आज बघतो तेव्हा, सर्वत्र लाचारी दिसते, मागणी दिसते, स्वार्थ दिसतो, कुरघोडी दिसते, भ्रष्टाचार, अप्रामाणिकता दिसते, कुटुंबव्यवस्था ढासळताना दिसते, माणुसकी परेशान दिसते, मात्र त्याचवेळी नजर दादांच्या स्वाध्याय परिवारावर आणि स्वाध्याय कार्यावर जाते, मला निःस्वार्थ प्रेम दिसते, दुसर्याबद्दल भाव दिसतो, जगण्याचा आशावाद दिसतो.माझा नातेवाईक कामाशिवाय मला भेटायला येत नाही पण दादांचा स्वाध्यायी येतो, त्याला माझ्याकडून काहीच नको असते, आभाराचीही अपेक्षा नसते. तो काही मिनिटे येतो, मला जीवन समजावून जातो. माझ्यात ऊर्जा पेरून जातो. जगाकडे बघितले आणि स्वाध्याय परिवाराकडे बघितले तर अगदी विरोधाभास वाटावे असे चित्र दिसते. आज लाखोंच्या संख्येने स्वाध्यायी आमच्या अवतीभवती प्रेम आणि विचार वाटत फिरतात. ते आम्हाला ठळक वाटावे असे दिसत नाही, कारण ते प्रचार करत नाही, पोस्टर लावत नाही, जाहिरात करत नाही. मात्र ते खऱ्या अर्थाने मनुष्य गौरव निर्माण करताहेत.ते सरळ हृदयात शिरतात आणि माणसाला हृदयापासून बदलून टाकतात. माणसात खऱ्या अर्थाने मनुष्यगौरव निर्माण करणाऱ्या पूजनीय दादांजीना ह्रदयपूर्वक वंदन..!
-राजेश खाकरे
औरंगाबाद
मो.७८७५४३८४९४

सरपंच थेट निवड

सरपंच थेट निवड

निकालाचा आनंद अजून सदाशिवरावांच्या चेहऱ्यावरून झळकतच होता. आज दुपारीच ग्रामपंचायत इलेक्शनचा निकाल जाहीर झाला होता. जनतेतून थेट निवडणुकीतून सरपंच म्हणून सदाशिवराव निवडून आले होते.यावेळी पहिल्यांदाज जनतेतून थेट सरपंच निवड झालेली असल्याने निवडणुकीचे आणि राजकीय समीकरणं बऱ्यापैकी बदलून गेलेले होते. सदाशिवराव आपल्या खुर्चीत बसून मागील 15-20 दिवसांच्या घटनाक्रमाबद्दल विचार करत होते. आज ते सरपंच झाले होते. खरं तर ते खूप खुश होते.मात्र क्षणभर त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. सुनीताताई सदाशिवरावांच्या सुविद्य पत्नी, हातात चहा घेऊन त्यांच्याकडे बघत होत्या. तिकडे सदाशिवरावांचे लक्षच नव्हते.
"अहो, सरपंचसाहेब, चहा घ्या..!" सुनीताताईंच्या या आवाजाने ते थोडेसे दचकलेच.! भानावर येऊन हसत हसत म्हणाले,
"आता हे काय नवीन..!"
"अहो नवीन म्हणजे काय, तुम्ही आता सरपंच झालात न्हवं..आता सवय केली पाहिजे!" हसत हसत सुनीताताई बोलल्या आणि दोघेही खळखळून हसले. दोघांच्याही चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.
"अहो, एक ईचारू का..?" सुनीताताईने कुतूहलाने विचारले.
"काय.?"
"ते निकाल लागल्यावर 10-15 दिवस सगळ्या सदस्याला घेऊन कुठे टूरला जावे लागत असते, ते आता उद्या जाणार का..?" सुनीताताईंनी पृच्छा केली.
"अगं,कसली टूर म्हणते तू..?
"ते नाही का मागच्या वेळी ते गणपतराव सरपंच झालते तव्हा, ते सर्व 15 दिवस सगळ्या निवडून आलेल्या सदस्याला घेऊन कुठेतरी कुणाला माहीत नाही अशा ठिकाणी घेऊन गेलते म्हणे, गंगू सांगत होती की, त्यांना कुठल्या चांगल्या हॉटेलात जेवणखाण, राहणं ते सगळं करावं लागतं असं.." सुनीताताईने जरा सविस्तर सांगितले.
सदाशिवराव गालातल्या गालात हसले, आणि म्हणाले,
"तीच तर खरी मेख आहे आता..!"
सुनीताताईची काहीशी न समजल्यासारखी मुद्रा बघून सदाशिवराव म्हणाले,
"अगं, हे बघ पहिल्यांदा काय असायचं कि, निकाल लागला कि ज्याला सरपंच व्हायचं त्याला सगळ्या सदस्याला सांभाळीत बसावं लागायचं अन आत्ता..."
"अहो सरपंच.....!!!" बाहेरून आलेल्या या भारदार आवाजाने सदाशिवरावांचं बोलणं अर्धवट राहिलं आणि सदाशिवरावांनी आवाजाच्या दिशेनं बघितलं.
आवाजापाठोपाठ काही मंडळी आत आली. त्यांच्या हातात एक फुलांची मोठी माळा होती. सुनीताताईने बघितले, ते सर्वजण आज निवडून आलेले सदस्य होते. त्यांनी सोबत आणलेली फुलांची माळ सदाशिवरावांना  घातली. गुलाल उधळला, त्याचवेळी बाहेर फटाक्यांची आतिषबाजी झाली. सदाशिवरावाने सुनीताताईकडे बघून स्मितहास्य केले.सुनीताताईला थोड्या वेळापूर्वी सदाशिवरावांच्या अर्धवट राहिलेल्या वाक्याचा अर्थ समजून गेला. त्यांनाही हसू आवरले नाही.
"सदाशिवराव तुम आगे बढो... हम तुम्हारे साथ है" अशा घोषणांनी परिसर कितीतरी वेळ दणाणून गेला होता.
-राजेश खाकरे
औरंगाबाद
मो.७८७५४३८४९४
rajesh.khakre@gmail.com

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...