कवितेचे सिझर

"कवितेचे सिझर"

नुसते यमक जुळवून कविता लिहू नये
प्रसवू द्यावी कविता तिचे सिझर करू नये

कवितेतून प्रकटावा भाव कवीच्या मनातला
हृदयातुन निघावी अन भिडावी थेट हृदयाला
शब्दांचा फाफट पसारा मांडत बसू नये
प्रसवू द्यावी कविता तिचे सिझर करू नये

आतून यावी कविता अन उतरावी कागदावर
अधिराज्य गाजवावे तिने वाचकाच्या काळजावर
कुणा आवडो ना आवडो त्याची पर्वा करू नये
प्रसवू द्यावी कविता तिचे सिझर करू नये

कविता एक आनंद, अन सोहळा स्व-आनंदाचा
जन्म देऊन बाळाकडे एकटक बघणाऱ्या आईचा
हा अलौकिक आनंद सोहळा कृत्रिम करू नये
प्रसवू द्यावी कविता तिचे सिझर करू नये

संख्येनी गणली जात नाही ऊंची कवीपणाची
एक वेगळीच ओळख असते कवीत्वाच्या मनाची
विस्मरण झाले कधी तर केशवसुता विसरु नये
प्रसवू द्यावी कविता तिचे सिझर करू नये
©राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४




टप टप टप बरसे पाणी (बालगीत)

टप टप टप बरसे पाणी
वारा भर भर गाई गाणी

पाऊस येता गार गार
शिवार होई हिरवेगार

रानामध्ये चरती गायी
कोकीळा गाणे गाई

तुडूंब होई नदी नाले
अंग सारे होई ओले

खेळण्याची मौज भारी
पावसाची मजा न्यारी
--- राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४









पाऊस आला, पाऊस आला (बालकविता)

पाऊस आला, पाऊस आला
गल्लीमधुनी पुर वाहिला
चला, चला, रे मुलांनो
नाव पाण्यात सोडू चला

धींगामस्ती करू थोड़ी
पावसाशी गट्टी करू
थेंब झेलु हातावरती
मातीचे धरण करु

भिजून ओलेचिंब होऊ
थोडेसे नाचून घेऊ
रागावता आई खूप
घरात शिरु गुप-चूप

पाठीवरती आई देईल
एक धपाटा ठेऊन
थोडेसे रुसु, मग घेऊ
गरम चहा पिऊन
-राजेश खाकरे
मो.7875438494

अन्नदाता संपावर..!


अन्नदाता संपावर
-----------------------

"आई संपावर गेली तर..." असा निबंधाचा विषय आम्हाला दहावी-बारावीला असायचा...खरं तर त्यावेळी माझ्या मनात प्रश्न यायचा की 'अरे यार आई कशी संपावर जाईल..?" आई कधीच संपावर जात नाही आणि जर एखाद्या वेळी खरंच संपावर गेली तर मग त्याहून दुर्दैवी काय असणार..आणि आईशिवाय कसं जमणार...
मित्रांनो, मला वाटतं की शेतकरी हा आपली आई आहे.आई मुलाला खायला प्यायला घालून आपल्याला आवश्यक गोष्टी पुरवत असते.तसाच शेतकरी आपल्या शेतात धान्य, भाजीपाला,फळे आदी पिकवून सर्व जगाचे पोषण करत असतो. जगातला कुठलाही व्यक्ति हा कितीही श्रीमंत,पैसेवाला असला तरी तो पैसा खाऊ शकत नाही, त्याला भाकरीचीच गरज असते.अन्नाशिवाय कोणताही व्यक्ति जीवंत राहू शकत नाही.
शेतकरी हा केवळ अन्नदाताच नाही तर तो खऱ्या अर्थाने नवनिर्मितिकार आहे, शेतात किलोभर धान्यातून तो दिवासरात्र राबून, कष्ट करून त्याचे चार क्विंटल धान्य बनवतो. तुम्ही आम्हीही कामे करतो परंतु मित्रांनो शेतकर्याचे काम पूर्णतः वेगळे आहे. आणि याच अन्नदात्यावर आज संपावर जायची वेळ आली हे आमच्या सर्व लोकांची कृतघ्नता आहे,दुर्दैव आहे असे मला वाटते.
आम्ही कित्येक संप नेहमी बघत असतो, बॅक कर्मचारी संप, सरकारी कर्मचारी संप व् इतर अनेक संप..पण मित्रांनो, तसाच हा शेतकर्याला एक संप आहे का??? तर नक्कीच नाही अन्नदात्यावरच जेव्हा उपासमारीची वेळ येते, जेव्हा जगण्याचा कुठलाच मार्ग शिल्लक उरत नाही अन शेतकरी फासावर स्वतः ला लटकून घेतो, जेव्हा त्याच्या कुटुंबाच्या किमान गरजा पण तो पूर्ण करू शकत नाही, उच्च तर काय तो त्याच्या मुलाच्या साध्या शिक्षणाचाही खर्च भागवु शकत नाही, शेतात पिकवलेला सोन्यासारखा माल जेव्हा बेभाव द्यावा लागतो, तेव्हा जी काळजात एक सणक उठते ना त्याचा उद्रेक आहे हा संप...आणि सरकार आणि समाज जर त्याची योग्य दखल घेणार नाही तर भविष्यकाळ फार विदारक असेल.
आश्वासनाचे गाजर दाखवून संप मागे घेण्यास सरकार एखादेवेळी यशस्वी होईलही मात्र जर खऱ्या अर्थाने शेतकर्याचे प्रश्न सोडवले नाही तर पुढील काळ खुप भयंकर असेल.
.संपकाळात जेव्हा शेतकरी त्याचा माल रस्त्यावर फेकत आहे तेव्हा काही लोकांना अन्न वाया जातेय याचा खुप पुळका येतोय.जेव्हा भाव मिळत नाही तेव्हा शेतमाल शेतात सडतो हे त्यांना कधी दिसत नाही.  जरा त्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात बघा, एक चीड दिसेल त्याच्या डोळ्यांत येथील अन्यायी व्यवस्थेविरुद्ध, आणि त्याचीच ठिणगी म्हणजे हा संप होय
अडीच तासाचा चित्रपट तीनसे रूपये खर्च करून बघणारे आम्ही. मोठ्या हॉटेलात एका वेळच्या जेवनासाठी हजार-दोनहजार खर्च करणारे आम्ही दहा रूपयाची भाजी 5 रूपयाला मागताना आम्हाला अजिबात लाज वाटत नाही.इतर ठिकाणी पैसे खर्च करताना पर्वा न करणारे आम्ही शेतमाल खरेदी करताना खुप व्यवहारी होतो आणि मित्रांनो हे आम्ही बदलू शकलो तरच खऱ्या अर्थाने अन्नदाता सुखी होईल व् आमचा देश समृध्द होईल. आणि शेतकर्याला कधी संपावर जायची गरज पडणार नाही.
---राजेश खाकरे
मो.7875438494

रामा, तुझा वनवास अजुन संपला नाही

माणसातला राम अजून जागला नाही
रामा, तुझा वनवास अजून संपला नाही !!धृ !!

मनात तू,ध्यानात तू, प्रत्येका ह्रदयात तू
अणुत तू, रेणुत तू,भजनी,गाण्यात तू
इथला दुष्ट रावण अजून वारला नाही
रामा, तुझा वनवास अजून संपला नाही  !!१!!

ह्या कोर्टात,त्या कोर्टात तुझी सुनावणी चालू
सिद्ध कर स्वतः ला, तू असला तरच मानू
तुझ्या जन्मभूमीचा वाद अजून मिटला नाही
रामा, तुझा वनवास अजून संपला नाही  !!२!!

बघितलतं ना आमचा न्याय कसा तुला वाटला?
साठ वर्षात देवा तुझा श्वास असेल ना कोंडला
आमच्या कोर्टाची पायरी तू पुन्हा चढणार नाही
रामा, तुझा वनवास अजून संपला नाही  !!३!!
--- राजेश खाकरे मो.7875438494






आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...