आडवाणींचा अंतरात्मा बीजेपीला शाप देणार का...?

आडवाणींचा अंतर्रात्मा बीजेपीला शाप देणार का..?
Writed by -राजेश खाकरे
एखादी व्यक्ती एखाद्या संस्थेसाठी किंवा पक्षासाठी आपली संपूर्ण हयात वेचून त्या संस्थेला किंवा पक्षाला सर्वोच्चस्थानी नेण्यासाठी धडपडली असेल आणि ती संस्था किंवा पक्ष सर्वोच्चस्थानी असताना त्याच व्यक्तीची जर अवहेलना करणार असेल तर यापेक्षा मोठी दुसरी कृतघ्नता कोणती असू शकेल.
जनसंघाच्या स्थापनेपासून 1951 पासून ते बिजेपीच्या स्थापना 1980 पर्यंत आणि बीजेपीच्या स्थापनेपासून आजपर्यंत लालकृष्ण अडवाणी भारतीय जनता पार्टीसाठी काम करत आहेत. एक वरिष्ठ आणि कणखर नेता अशी त्यांची ओळख आहेच, त्याचबरोबर बीजेपीला राष्ट्रीय पातळीवर एक प्रमुख पक्ष म्हणून ओळख देण्यासाठी ज्या नेत्यांनी प्रयत्न केले आहेत त्यामध्ये लालकृष्ण अडवाणी यांचे नाव अग्रस्थानी आहे. पार्टीचा विस्तार आणि उत्कर्षासाठी त्यांनी आजपर्यंत अनेक महत्वाच्या भूमिका पार पाडल्या. 1951 ते 1957 भारतीय जनसंघाचे सचिव, 1973 ते 1977 भारतीय जनसंघाचे अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेनंतर 1986 पर्यंत पार्टीचे महासचिव, आणि तीन वेळा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अशी संघटनात्मक जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे, 5 वेळा लोकसभा आणि 4 वेळा राज्यसभेत खासदार म्हणून ते निवडले गेले आहेत.
राममंदिर आंदोलनावेळी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा आडवाणीजींनी काढली, या रथयात्रेने अडवाणी आणि बीजेपीला एक नवी ओळख मिळाली.
2014 ला जेव्हा नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली बीजेपीचे पूर्ण बहूमताचे सरकार स्थापन झाले तेव्हा आडवाणींना नक्कीच एखादे चांगले मंत्रिपद देण्यात येईल असे बीजेपीच्या कार्यकर्त्यापासून ते भारतातल्या सर्वसामान्य नागरिकालाही वाटत होते, मात्र तसे घडले नाही, वयाचे कारण देत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आडवाणीसह इतर वरिष्ठ नेत्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवले, हा आडवाणीच्या सन्मानाला आणि स्थानाला धक्का होताच मात्र तो त्यांनी सहन केला, किंबहुना त्यांना तो सहन करावा लागला, एकेकाळचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे आडवाणी काहीसे मऊ मऊ झाले, त्यांना पार्टीत आपल्याला आता किती मान आहे हे त्यावेळीच लक्षात आले असावे, ज्यावेळी पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदीजींचे नाव घोषित करायला त्यांनी विरोध केला होता.
जेव्हा मंत्रीपदापासून आडवाणींना दूर लोटले आणि आडवाणीही मोठ्या संयमाने शांत बसलेले दिसले तेव्हा सर्वानाच असे वाटले की तीन वर्षांनी होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी आडवाणीजीं भाजपाचे उमेदवार असतील. राष्ट्रपतींची निवडणूक जवळ यावी आणि अयोध्या प्रकरणात न्यायालयाचा निकाल यावा हा योगायोग असू शकतो मात्र खरी गोष्ट ही आहे की लालकृष्ण आडवाणी यांना राष्ट्रपती करण्याची भाजपची पर्यायाने पंतप्रधान मोदीजी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांची खरोखर इच्छा होती का..?
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात गृहमंत्री आणि नंतर उपपंतप्रधान हे पद आडवाणींना देण्यात आले, 2008 ला लालकृष्ण आडवाणींचे नाव एन डी ए ने पंतप्रधान पदासाठी जाहीर केले होते मात्र मोठे पद आडवाणीच्याजणू नशिबात नसावे, बीजेपी सत्तेवर आली नाही आणि पंतप्रधान बनण्याचे त्यांचे स्वप्न तसेच अधुरे राहिले.
आज बीजेपीचा सुवर्णकाळ चालू आहे, न्यायालयाच्या निकालानंतर आडवाणींना राष्ट्रपती बनविणे शक्य होते की नाही हे कायद्याचे जाणकार सांगतील मात्र सर्वसामान्य नागरिक म्हणून जे जाणवते त्यात बीजेपीची तशी इच्छाच नसावी हेच जाणवते, आज मोदीजी आणि अमित शहा यांच्यासमोर बोलण्याची कोणात हिंमत आहे असे दिसत नाही.
मुले मोठी झाल्यावर आईवडिलांची जशी अवहेलना एखादया कुटुंबात केली जाते तसेच काहीसे दिसते आहे.काहीही असो, हा 90 वर्षांचा कणखर तरुण मात्र आज मूक आहे, तो बोलणार नाही, कारण बोलून काही उपयोग नाही हे त्यांना जाणवले असावे, आणि या वयात काही वेगळा मार्गही ते निवडू शकणार नाही हे बीजेपीसह सर्वानाच माहिती आहे.
असे असले तरी आडवाणींचा न्याय बीजेपीने केला का??? त्याचे उत्तर नाही असेच आहे. कोणत्याही पक्ष, संस्था, संघटनेसाठी ज्यांनी अविश्रांत मेहनत घेतली त्यांची कृतज्ञता ती संस्था, पक्ष, संघटना तिच्या चांगल्या काळात नक्कीच व्यक्त करू शकते, आणि ती व्यक्त केली गेलीच पाहिजे, जर लालकृष्ण आडवाणीबाबत बीजेपीने न्याय केला नसेल तर, ते जरीही काही बोलत नसले तरी त्यांचा अंतरात्मा नक्कीच बीजेपीला शाप दिल्यावाचून राहणार नाही...!
काल भारताचे 14 वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी शपथ घेतली, त्यांच्या निवडीबद्दल कुणाला आक्षेप असण्याचे काहीही कारण नाही. ते एक शांत,संयमी व्यक्तिमत्व आहेत आणि राज्यघटनेचे अभ्यासक आहेत. तसेच बिहारचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. एका सर्वसामान्य गरीब कुटुंबातुन आलेले रामनाथ कोविंदजी देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाले आहे, हा लोकशाहीचा मोठा विजयच आहे, त्यांना त्यांच्या कार्यकाळासाठी मनापासून शुभेच्छा देतांना काही विचार मनात आले तेच प्रामाणिकपणे या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
-राजेश खाकरे
मो.7875438494
rajesh.khakre@gmail.com
(लेखक हे राजकारणाचे अभ्यासक नाहीत)

कविताचोराची कथा

कविता चोराची कथा
एक कविताचोर होता, एक कशाला बरेच आहेत, "कुठल्यातरी कवीने लिहलेल्या कविता कॉपी करून स्वतःच्या नावाने किंवा निनावी पुढे पाठवणारा, भावना, संवेदना कशाशी खातात याचा गंध नसलेला, आणि स्वतः चा मेंदू पिळून काढला तरी त्यातून एखादीही कविता, चारोळी, किंवा गद्य ओळी टपकणार नाही याची जाणीव झालेला, निर्लज्ज श्रेणीत मोडणारा व्यक्ती म्हणजे कविताचोर होय"
         तर असाच एक कविताचोर होता. घरची परिस्थिती बऱ्यापैकी होती. खाण्यापिण्याचे वांधे अजिबात नव्हते. पोशाखही चांगला असायचा. चांगला दहा-बारा हजाराचा अड्रॉइड मोबाईल वापरायचा, फेसबुक, whatsapp यावर तासनतास online असायचा.
           आजकाल whatsaap, फेसबुक यावर कवितेचे बरेच ग्रुप आहेत. त्यात कवी त्यांच्या भावना शब्दरूपाने काव्यरूपाने लिहितात. Whatsaap च्या अशा कवितेच्या, साहित्याच्या बऱ्याच ग्रुपमध्ये तो शिरला, लिंक हा त्याला अशा ठिकाणी घुसण्याचा सोपा मार्ग असायचा. त्याठिकाणी अनेक कवी, लेखक, त्यांच्या, स्वलिखित कविता, चारोळ्या, लेख टाकायचे, तिथे साहित्याचा सोहळा चालायचा. मात्र हा कविताचोर त्याला एखादी कविता आवडली कि लगेच त्याखालचे नाव काढून स्वतःचे नाव टाकायचा आणि इतर मित्र मैत्रिणीच्या ग्रुपवर टाकायचा, कधी त्याच्या गर्लफ्रेंडला पाठवायचा. कधी स्वतः चे नाव नाही टाकले तर निनावी पुढे पाठवायचा..! असा त्याचा उपक्रम ग्रुपमध्ये चालायचा.
            कधी काय व्हायचे कि स्वतःचे नाव टाकून इतर कवीची रचना पुढे पाठवताना जिथून उचलली त्याच ग्रुपवर जायची, मग मात्र मोठा घोळ व्हायचा, मग एडिटिंग करताना झाले, चुकून झाले, असे काहीबाही उत्तर देऊन निसटून जाण्याचा प्रयत्न करायचा. कधी खूपच प्रकरण तापले तर माफी गिफी मागायचा. एखादा admin खूपच डेंजर असला तर रिमोव्ह पण करायचा. मात्र या सर्व गोष्टींचे त्याला काही वाटायचे नाही. (त्याला काहीच का वाटायचे नाही असा प्रश्न तुम्हाला पडला तर वर दिलेली व्याख्या पून्हा एकदा वाचा.)
           असे प्रसंग घडत असले तरी त्याचा तो कविताचोरण्याचा उपक्रम बंद पडला नाही.बरेच दिवस निघून गेले.
             त्यादिवशी रात्री बारा-साडेबारा वाजता एक अँबुलन्स तिचा तो कर्कश आवाज काढत आणि रात्रीच्या शांततेचा भंग करत सिटी हॉस्पिटल मध्ये शिरली. दरवाजा उघडला, त्यातून 5-7 माणसे व 2 स्त्रीया खाली उतरली. स्ट्रेचरवरून पेशन्टला आत नेण्यात आले, डॉक्टरने त्वरित उपचार सुरु केले. काही तपासण्या करणे आवश्यक होते. नातेवाईकांना सांगून डॉक्टरने ईसीजी, ब्लड, सिटीस्कॅन अशा काही तपासण्या केल्या.
           दुसरा दिवस उगवला. पेशन्टच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली होती. पेशन्टला बघायला कविताचोर आला होता. त्यांची जुनी मैत्री असल्याने तो बघायला आला होता. थोड्याफार गप्पा झाल्या. सहज कविताचोराने पेशन्टची फाईल चाळली, त्यात 4-5 रिपोर्ट होते, खिशातला पेन काढून त्याने त्यावर काहीतरी लिहले. थोड्या वेळाने कविताचोर पेशन्टचा निरोप घेऊन निघून गेला. तासाभराने डॉक्टर नियमित तपासणी करायला आले, त्यांनी पेशन्टची फाईल उघडली आणि त्यांच्या डोळ्यासमोर अंधारीच आली.
त्या फाईलमध्ये 4-5 रिपोर्ट होते.
ईसीजी च्या रिपोर्टवर पेनाने लिहलेले होते,
" हि रचना कोणाची आहे माहीत नाही, ज्याची असेल त्याला लाख सलाम."
ब्लड रिपोर्टच्या खालील डॉक्टरचे नाव खोडून टाकलेले होते. आणि पुढे लिहले होते "खरे डॉक्टर असाल तर फॉरवर्ड करा"
सिटीस्कॅन च्या रिपोर्टखालील डॉक्टरचे नाव खोडून कविताचोराने चक्क स्वतः चे नाव घातले होते. आणि पुढे लिहले होते "कमीतकमी 10 ग्रुपवर तरी पाठवा."
©राजेश खाकरे
मो.7875438494
rajesh.khakre@gmail.com

शेती आणि शेतकरी

शेती आणि शेतकरी
शेती हा व्यवसाय असेल आणि जर शेतीकडे व्यवसाय म्हणून बघायचे असेल तर आजच्या घडीला शेती हा तोट्याचा व्यवसाय झालेला आहे, आणि कुठलाही व्यवसाय जेव्हा तोट्याकडे वाटचाल करतो, तेव्हा तो व्यवसाय करणाऱ्याचा उत्कर्ष कसा घडवून आणू शकेल.त्यामुळे आम्ही जेव्हा शेतकऱ्याच्या परिस्थितीबद्दल बोलतो तेव्हा या गोष्टीचा विचार होणे तितकेच महत्वाचे आहे.
आमचा देश कृषिप्रधान आहे आणि इथला 70 % टक्के समाज हा शेती व शेतीशी निगडित व्यवसायाशी संबधित आहे,किंबहुना त्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून आहे, तरीही शेती व शेतकऱ्यांच्या बाबतीतली स्थिती समाधानकारक नाही. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या आणि कर्जबाजारीपण यामुळे ते जास्तच अधोरेखित होते. सुधारित बियाणे, खते, किटकनाशके, सुधारित शेती औजारे यांमुळे शेती करण्याची पद्धत निश्चितच सुधारली आहे, काही प्रमाणात मानवी श्रमही कमी झालेले आहेत, मात्र त्यामानाने खर्च वाढलेला असतानाही शेतमालाला योग्य भाव मिळाला नाही. शेतीमालाला उत्पादन खर्च आणि नफा यादृष्टिने योग्य भाव जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची परिस्थिति कायमस्वरूपी सुधारणार नाही. कारण आज शेतकरी भरपूर पिकवतो आहे, मात्र भाव नसल्याने मातीमोल भावाने विक्री करून त्याच्या हातात काहीही पडत नाही.
जसे शेतमालाला योग्य भाव मिळणे आवश्यक आहे, तसेच शेतकऱ्याला कृषि निविष्ठा वेळेवर व माफक दरात मिळणे आवश्यक आहे. ज्यामध्ये बियाणे, खते, किटकनाशके इत्यादींचा समावेश होतो. शासनाने सर्वच शेतकऱ्यांना शेती उपयोगी औजारे, यंत्रसामग्री ही किमान 50% अनुदानावर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, त्याचबरोबर पिककर्ज हे सर्वच शेतकऱ्यांना सरसकट मिळणे आवश्यक आहे, आजही पिककर्ज मिळवताना सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येतात. सधन शेतकऱ्यांनाच पिककर्ज देण्याकडे बँकांचा आणि तेथील अधिकाऱ्यांचा कल दिसतो, परिणामी गरीब शेतकरी सावकारांकडून जास्त दराने कर्ज काढतो ज्याची व्याजासह परतफेड करणे त्याच्या क्षमतेच्याबाहेर असते, यातूनच शेतकरी नैराश्याने ग्रासला जातो आणि आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो, हे चित्र बदलायला हवे.
कर्जमाफी हा तात्पुरता उपाय असू शकतो, मात्र कर्जमाफीने शेतकऱ्यांची स्थिती कायमस्वरूपी कधीही बदलू शकणार नाही, त्यामुळे एक तर शेतकरी एवढा सक्षम व्हावा की त्याला कर्जाची गरजच पडू नये किंवा त्याची कर्ज परतफेड करण्यायोग्य आर्थिक सुबकता बनावी, हे जोपर्यंत होणार नाही आणि तसे होण्यासाठी ठोस पावले जोपर्यंत उचलली जाणार नाही तोपर्यंत कर्जमाफी किंवा कुठली आर्थिक मदत ही फक्त मलमपट्टी ठरेल, जखम तशीच राहील.
शेती हा व्यवसाय निसर्गावर मुख्यतः अवलंबून असल्याने इतर व्यवसायाप्रमाने या व्यवसायाचे ठोकताळे किंवा हमी नाही, म्हणजे अमुक इतका उत्पादन खर्च केला म्हणजे अमुक इतके उत्पादन निघेलच असे सांगू शकत नाही.त्यामुळे या व्यवसायात मोठी जोखिम आहे. दुष्काळ, अपुरा पाऊस, गारपीट, अवकाळी पाऊस,रोगराई, नापिकी ही नैसर्गिक संकटे एका बाजूने तर कमीभाव, दारिद्र्य,महागाई कर्जबाजारीपण,प्रतिकूल शेतकरीधोरण एका बाजूने यामध्ये शेतकरी पुर्णतः भरडला जात आहे.
शेतकऱ्यांनीही परिस्थितिनुरूप काही बदल करणे काळाची गरज आहे. शेतात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, शेततळे, नवीन सिंचन सुविधा, इत्यादींचा प्रभावी उपयोग करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून राहता कामा नये, शेतीसोबत इतर कुठला तरी जोडधंदा असणे आवश्यक आहे, भले तो जोडधंदा शेतीपुरक असेल किंवा नसेल.जोडधंद्यामुळे कमी प्रमाणात का होईना येणारा पैसा तुमच्या इतर कौटुंबिक गरजा भागविण्यास मदत करील.
शेती हा फायद्याचा धंदा कदाचित नसेल ही मात्र शेतीमुळे प्रत्येकाला दोन घास पोटात घालायला मिळतात त्यामुळे तो प्रत्येकाला जगविण्याचा धंदा नक्कीच आहे, आणि त्या बदल्यात समाज,शासन आणि माणूस किती कृतज्ञ आहे..? हा आश्चर्यचकित करणारा प्रश्न आहे. शेतकरी माझ्यासाठी धान्य पिकवतो ही समज ज्या दिवशी पक्की होईल त्या दिवसांपासून कुठल्याही शेतकऱ्याच्या गळ्याला फास लागणार नाही आणि एखाद्या शेतकऱ्याची चूल पेटली नाही असे कधी होणार नाही एव्हढे मात्र नक्की...!
© राजेश खाकरे
मो.7875438494
rajesh.khakre@gmail.com

निसटते क्षण ...!

निसटते क्षण

क्षण कितीही सुवर्णासारखे असले तरी क्षणच ते निसटतातच ओंजळ रिकामी ठेऊन...आठवणीची कुपी मात्र तशीच राहते अन्तर्मनात...
क्षणाक्षणांनी आयुष्य सरकते, जणू एक एक क्षण निसटत जातो, आयुष्याचा...
बालपनाचा काळ किती सुखाचा असतो ना आमच्या आयुष्यात, मनात असते फक्त एक निष्पाप भावना, ना कसली चिंता, ना कसली पर्वा...बालपण नकळत निसटून जाते, उरतात त्या रम्य आठवणी, मात्र एक बालक प्रत्येक मनात राहतो तसाच जागृत शेवटपर्यंत...
प्रेम एक मधुर भावना...प्रत्येक मनात रुजलेली, उमललेली...कधी ती भावना फूलते, फळते तर कधी तशीच राहते अपूर्ण...अनंत काळापर्यंत...क्षण जातात निसटून अलगद...वेडे मन मात्र राहते गुंतून तसेच अंतिम श्वासापर्यंत...
आई आणि वडील असतात शिल्पकार जणू आमच्या जीवनाचे, आम्हाला घडवत जातात, आमचे पालन पोषण करतात... आम्हाला हवे-नको बघत बघत स्वतः च्या इच्छा-आकाक्षांना घालतात मुरड... आमच्या डोळ्यांत बघतात ती उद्याची उज्वल स्वप्ने...त्यांनी आमच्यावर केलेल्या प्रेम आणि वात्सल्याचे ते क्षण ही अलगद जातात निसटून...आई- वडिलांपासून  कधी दूर जातांना मनात उमटते निसटलेल्या क्षणांची भावना...
आमच्या शालेय आणि कॉलेज जीवनात कितीतरी शिक्षक भेटतात आम्हाला...काही मात्र खूपच जवळचे वाटतात...का कुणास ठाऊक आमची काळजी करतात...कधी चुकलो तर प्रेमाने समज काढतात... आम्हाला प्रेरणा देतात...त्यांच्यापासून दूर होण्याची वेळ येते मात्र तेव्हा डोळ्यांच्या कडा नकळत पाणवतात...ह्र्दयाची वीण तुटावी तसाच काहीसा भास होतो...तो दुरावा असह्य वाटतो... ते सहवासाचे क्षण मात्र निसटून गेलेले असतात...
शाळा -कॉलेजात असताना मित्रांसोबत केलेली मौज, मस्ती, जगलेले आनंददायी, वेदनादायी क्षण, घालवलेले अन मनात कायम एक घर करून राहिलेले मित्र-मैत्रिणी... शिक्षण संपून कधी मित्रांचा निरोप घेण्याची वेळ येते...इतके वर्ष कशी संपून गेली ते समजतच नाही... क्षण जातात निसटून...
आपल्या सोबत काम करणारा एखादा सहकारी बदली होऊन दुरच्या गावी जातो किंवा आपल्याला हवेहवेसे वाटणारे आपले वरिष्ठ साहेब बदलून दुसरीकडे जातात... त्यांच्या सोबत काम करताना किती छान वाटायचं ना... मनात काही निसटून गेल्याची भावना उगीच सतावत राहते...मनाला उगीच अस्वस्थ करते...
असे अनंत सुखदुःखाचे क्षण येतात आमच्या आयुष्यात कधी ते तसेच राहावेत असे वाटते, मात्र क्षण आम्हाला पकडून ठेवता येत नाही... ते निसटतातच मनाचा गाभारा रिकामा करून.. मनाची पोकळी रिकामी करून..त्या सुखद क्षणांना आठवतांता डोळ्यांत कधी हळुवार अश्रू येतात तर कधी ओठांवर नुसते स्मितहास्य... आयुष्य म्हणजे दूसरे काय असेल तरी अशाच निसटलेल्या क्षणांची एक जोडलेली साखळी... कुठली कडी हवीहवीसी तर कुठली नकोसी वाटणारी.. जीवनगाडी मात्र पुढे सरकतच असते निसटत्या क्षणांना मागे सोडून...
कधी एखाद्या संध्याकाळी हातात चहाचा कप घेऊन आठवत राहतात यासारख्या कितीतरी गोष्टी...नकळत चहा संपून जातो...हातात रिकामा कप तसाच धरुन नजर दूर कुठेतरी शोधत राहते निसटलेल्या क्षणांना...
© राजेश खाकरे
मो.7875438494
rajesh.khakre@gmail.com

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...