सरपंच थेट निवड

सरपंच थेट निवड

निकालाचा आनंद अजून सदाशिवरावांच्या चेहऱ्यावरून झळकतच होता. आज दुपारीच ग्रामपंचायत इलेक्शनचा निकाल जाहीर झाला होता. जनतेतून थेट निवडणुकीतून सरपंच म्हणून सदाशिवराव निवडून आले होते.यावेळी पहिल्यांदाज जनतेतून थेट सरपंच निवड झालेली असल्याने निवडणुकीचे आणि राजकीय समीकरणं बऱ्यापैकी बदलून गेलेले होते. सदाशिवराव आपल्या खुर्चीत बसून मागील 15-20 दिवसांच्या घटनाक्रमाबद्दल विचार करत होते. आज ते सरपंच झाले होते. खरं तर ते खूप खुश होते.मात्र क्षणभर त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. सुनीताताई सदाशिवरावांच्या सुविद्य पत्नी, हातात चहा घेऊन त्यांच्याकडे बघत होत्या. तिकडे सदाशिवरावांचे लक्षच नव्हते.
"अहो, सरपंचसाहेब, चहा घ्या..!" सुनीताताईंच्या या आवाजाने ते थोडेसे दचकलेच.! भानावर येऊन हसत हसत म्हणाले,
"आता हे काय नवीन..!"
"अहो नवीन म्हणजे काय, तुम्ही आता सरपंच झालात न्हवं..आता सवय केली पाहिजे!" हसत हसत सुनीताताई बोलल्या आणि दोघेही खळखळून हसले. दोघांच्याही चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.
"अहो, एक ईचारू का..?" सुनीताताईने कुतूहलाने विचारले.
"काय.?"
"ते निकाल लागल्यावर 10-15 दिवस सगळ्या सदस्याला घेऊन कुठे टूरला जावे लागत असते, ते आता उद्या जाणार का..?" सुनीताताईंनी पृच्छा केली.
"अगं,कसली टूर म्हणते तू..?
"ते नाही का मागच्या वेळी ते गणपतराव सरपंच झालते तव्हा, ते सर्व 15 दिवस सगळ्या निवडून आलेल्या सदस्याला घेऊन कुठेतरी कुणाला माहीत नाही अशा ठिकाणी घेऊन गेलते म्हणे, गंगू सांगत होती की, त्यांना कुठल्या चांगल्या हॉटेलात जेवणखाण, राहणं ते सगळं करावं लागतं असं.." सुनीताताईने जरा सविस्तर सांगितले.
सदाशिवराव गालातल्या गालात हसले, आणि म्हणाले,
"तीच तर खरी मेख आहे आता..!"
सुनीताताईची काहीशी न समजल्यासारखी मुद्रा बघून सदाशिवराव म्हणाले,
"अगं, हे बघ पहिल्यांदा काय असायचं कि, निकाल लागला कि ज्याला सरपंच व्हायचं त्याला सगळ्या सदस्याला सांभाळीत बसावं लागायचं अन आत्ता..."
"अहो सरपंच.....!!!" बाहेरून आलेल्या या भारदार आवाजाने सदाशिवरावांचं बोलणं अर्धवट राहिलं आणि सदाशिवरावांनी आवाजाच्या दिशेनं बघितलं.
आवाजापाठोपाठ काही मंडळी आत आली. त्यांच्या हातात एक फुलांची मोठी माळा होती. सुनीताताईने बघितले, ते सर्वजण आज निवडून आलेले सदस्य होते. त्यांनी सोबत आणलेली फुलांची माळ सदाशिवरावांना  घातली. गुलाल उधळला, त्याचवेळी बाहेर फटाक्यांची आतिषबाजी झाली. सदाशिवरावाने सुनीताताईकडे बघून स्मितहास्य केले.सुनीताताईला थोड्या वेळापूर्वी सदाशिवरावांच्या अर्धवट राहिलेल्या वाक्याचा अर्थ समजून गेला. त्यांनाही हसू आवरले नाही.
"सदाशिवराव तुम आगे बढो... हम तुम्हारे साथ है" अशा घोषणांनी परिसर कितीतरी वेळ दणाणून गेला होता.
-राजेश खाकरे
औरंगाबाद
मो.७८७५४३८४९४
rajesh.khakre@gmail.com

शिक्षक दिन

शिक्षक दिन
●●●
आई नंतर बालकाचे जीवन कुणी घडवत असेल तर तो शिक्षक असतो. शिक्षक खऱ्या अर्थाने माणसाचे भवितव्य आणि चारित्र्य घडवत असतो. एखादा कुंभार जसा मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मडके घडवतो, अगदी तसेच शिक्षक मुलांना ज्ञान आणि संस्काराचे सिंचन करून घडवत असतो.शिक्षक त्याच्या पूर्ण कौशल्याने कधी प्रेमपूर्वक, कधी धाकाने,कधी आदराने मुलांना घडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो.
खरं तर शिक्षक हा पेशा नाही, तर ती वृत्ती आहे, देण्याची वृत्ती. ज्ञान, समाधान, प्रेरणा देण्याची वृत्ती... आणि हे देण्याचे भाग्य खूपच कमी जणांच्या वाटयास येते.काही शिक्षक अगदी मन लावून पूर्ण निष्ठेने आपले कर्तव्य बजावत असतात. मुलांचे जीवन आणि भवितव्य घडविण्यासाठी धडपड करत असतात. आपला विद्यार्थी जीवनात अधिकाधिक उंच जावा, यशस्वी व्हावा यासाठी प्रयत्न करत असतात.त्यात त्यांना आनंद तर मिळतोच तसेच आत्मिक समाधानही मिळते. तेच खरे शिक्षक असतात. प्रसंगी पदरमोड करणारे, विद्यार्थ्यांशी एकरूप होणारे, विद्यार्थ्यांची आर्थिक आणि कौटुंबिक स्थिती ओळखून त्यांना परिस्थितीशी लढायला प्रवृत्त करणारे, प्रेमाचा हळूवार हात फिरवून मायेने जवळ घेणारे, प्रसंगी शिक्षाही करणारे, असेच शिक्षक हे खरे शिक्षक असतात. त्यांच्या प्रत्येक कृतीत विद्यार्थ्यांचे भले होण्याची तळमळ सामावलेली असते. मात्र काही शिक्षक असेही असतात, जे फक्त नोकरी म्हणून शिक्षक असतात; केवळ पाट्या टाकण्याचे काम असे शिक्षक करत असतात. त्यांना नुसते दिवस ढकलायचे असतात, असे शिक्षक हे त्यांच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबतच खेळत असतात.आणि त्याच्या अशा कृतीतून ते मोठे सामाजिक आणि नैतिक पातक करत असतात. मला अशावेळी पूज्य साने गुरुजींचे वाक्य आठवते "आज तुम्ही आदर्श शिक्षक असाल किंवा नसाल मात्र तुमच्या वर्गातील मुले तुमच्याकडे एक आदर्श शिक्षक म्हणूनच बघत असतात" हे साने गुरुजींचे वाक्य खूप बोलके आहे. शिक्षकाची जबाबदारी किती मोठी आहे, हे अधोरेखित करणारे आहे.
शाळेत पाऊल ठेवणारा एक निष्पाप बालक हा,घराचा उंबरठा ओलांडून शाळेच्या उंबरठ्यावर आपले पहिले पाऊल टाकत असतो. तो निरागस असतो, जगाच्या हरामखोरीशी, लुच्चेगिरीशी, भ्रष्टपणाशी त्याचा संबंध आलेला नसतो. एखाद्या कोऱ्या काळ्याशार पाटीप्रमाणे तो बालक असतो, त्यावर हळुवार ज्ञान आणि संस्काराच्या रेघोट्या काढून त्याचे सुंदर, आल्हाददायक चित्र शिक्षक काढत असतो, त्यात विविध नितीमूल्याचे रंग भरून ते चित्र अधिकाधिक खुलवण्याचा तो प्रयत्न करत असतो.शाळा संपल्यावर जेव्हा हे चित्र घेऊन विद्यार्थी जगाच्या भाऊगर्दीत शिरतो, तेव्हा शिक्षकाने साकारलेल्या त्या सुंदर चित्राची जपवणूक करणे, ही पूर्णपणे त्या विद्यार्थ्यांची जबाबदारी असते.
शाळा संपली म्हणून विद्यार्थी आणि शिक्षकांचे नाते संपत नाही, उलट ते अधिक घट्ट होते. मुलगा मोठा झाल्यावर बाप जसा त्याचा मित्र बनतो, तसेच शाळेत कडक शिस्तीचे वाटणारे शिक्षक नंतर कुठे भेटले की मित्राप्रमाणे बोलताना बघून आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. त्यावेळी कळते की या वरून नारळाप्रमाणे टणक भासणाऱ्या आवरणाखाली असणारा एक मृदू आणि गोड शिक्षक आपल्याला कधी लक्षातच आला नाही.
आपला एखादा विद्यार्थी जेव्हा एखाद्या मोठ्या पदावर गेल्याचे समजते, तेव्हा शिक्षकाच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक तयार होते, जी त्याला मिळणाऱ्या पगारापेक्षा कितीतरी मोठी असते, तो आनंद परमानंद असतो. त्यात असूया नसते तर गर्व असतो, अभिमान असतो. शिक्षकांनी शिकविलेली मुले डॉक्टर बनतात, इंजिनीयर बनतात, संशोधक बनतात, कलेक्टर बनतात, मात्र शिक्षक कायम शिक्षकच असतो, जणू त्याचा तो स्थायीभाव असतो. किंबहुना शिक्षक असणारी व्यक्ती दुसऱ्या पदावर जरी गेली तरी त्यांच्यातला शिक्षक तसाच जिवंत राहतो. राष्ट्रपती पद भूषवूनसुद्धा डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्यातील शिक्षक शेवटच्या क्षणापर्यंत तसाच राहिला. यापेक्षा दुसरे मोठे उदाहरण कोणते असू शकेल.
शाळा,कॉलेज जीवनात कितीतरी शिक्षक आम्हाला शिकवून गेलेले असतात, मात्र तीन चार अशी नावे असतात कुणी 'शिक्षक' शब्द उच्चारला की आमच्या नजरेसमोर ती नावे आणि त्यांचे चेहरे ऊभी राहतात.मला वाटते "शिक्षक दिन" खऱ्या अर्थाने अशा शिक्षकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.
"गु-शब्द स्तवन्धकारास्यात
रु-शब्द स्तनिवर्तक:"
(आमच्या जीवनातील अंधकार जो काढून टाकतो तो गुरु)
असे आपले उपनिषद गुरूंचे यथार्थ वर्णन करतात.
कधी एखाद्या शिक्षकदिनी तुमच्या शाळेतील शिक्षकांना भेटायला नक्की जा..त्यांना सांगा, सर मी तुमच्यामुळे घडलो, तुम्ही मला जीवन दिले...या दोन शब्दांने त्यांचा ऊर अभिमानाने भरून येईल.त्यांचा प्रेमळ हात पुन्हा पाठीवर फिरला की तुम्हाला पुन्हा एकदा विद्यार्थी झाल्यासारखे वाटेल..!
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४


कृष्णा..!

कृष्णा,
तुझ्या जन्माला झालीत पाच हजार वर्षे
आणि कदाचित त्याहून अधिक
पण तू  इथल्या प्रत्येक माणसाच्या हृदयात
राहीला आजही अगदी तसाच..
तू म्हणायचा कि "संभवामि युगे युगे"
तसाच आज कितीतरी युगानंतर तू राहीला
इथल्या मनामनात...
तुला आम्ही किती समजून घेऊ शकलो,
माहीत नाही,
मात्र तुझे जीवन मानवामात्राला आजही समजावते आनंदाचे जगणे
तुझ्या जीवनात तू अगणित प्रसंग झेलले,
मात्र तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य नाही झाले कधी कमी
तू मंजुळ बासरीच्या सुरात गात राहिला जीवनगाणे,
तू जन्मला कारागृहाच्या चार भिंतीत
गर्द अंधाऱ्या-तुफान रात्रीत
मात्र तू नाही रडला कधीच
तू चोरले दूध-दही आणि चोरलेत मनही
तू खेळला, खिलाडू वृत्तीने
तू लढला, श्रेष्ठ योद्धा होऊन
सुदामाच्या मैत्रीने तू मैत्री काय असते, दाखवून दिले
तू सखा बनून अर्जुनाचे सारथ्य केले
नरकासुरांच्या तावडीतून हजारो स्रियांना सोडवून
त्यांना सन्मानाने जगण्यासाठी तुझे नाव दिले
तू द्रौपदीला वस्त्र दिले,
तू गोकुळवासीयांना धारिष्ट्य दिले
तू दाखवले कंसाच्या रूपाने दुष्ट व्यक्ती कधी नसतो आपला नातलग 
'परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम' तू करत आलास आयुष्यभर
तू दिलीस "गीता" मानवामात्राला जीवनमार्गदर्शन करणारी अर्जुनाच्या निमित्ताने आणि बनलास जगद्गुरू खऱ्या अर्थाने..
आजही कृष्णा,
जेव्हा मनाला ग्लानी येते,
संकट जीवनाला व्यापून घेते
तेव्हा तुझा चेहरा दिसतो..
तुझी बासरी दिसते...
तुझी गीता दिसते...
आणि अगणित ऊर्जा मिळते..
जणू नवसंजीवनी मिळते..!
कृष्णा,
तू आजही आमच्या मनात आणि इथल्या चराचरात मला जिवंत दिसतो...!
◆राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४


आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...