कृष्णा..!

कृष्णा,
तुझ्या जन्माला झालीत पाच हजार वर्षे
आणि कदाचित त्याहून अधिक
पण तू  इथल्या प्रत्येक माणसाच्या हृदयात
राहीला आजही अगदी तसाच..
तू म्हणायचा कि "संभवामि युगे युगे"
तसाच आज कितीतरी युगानंतर तू राहीला
इथल्या मनामनात...
तुला आम्ही किती समजून घेऊ शकलो,
माहीत नाही,
मात्र तुझे जीवन मानवामात्राला आजही समजावते आनंदाचे जगणे
तुझ्या जीवनात तू अगणित प्रसंग झेलले,
मात्र तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य नाही झाले कधी कमी
तू मंजुळ बासरीच्या सुरात गात राहिला जीवनगाणे,
तू जन्मला कारागृहाच्या चार भिंतीत
गर्द अंधाऱ्या-तुफान रात्रीत
मात्र तू नाही रडला कधीच
तू चोरले दूध-दही आणि चोरलेत मनही
तू खेळला, खिलाडू वृत्तीने
तू लढला, श्रेष्ठ योद्धा होऊन
सुदामाच्या मैत्रीने तू मैत्री काय असते, दाखवून दिले
तू सखा बनून अर्जुनाचे सारथ्य केले
नरकासुरांच्या तावडीतून हजारो स्रियांना सोडवून
त्यांना सन्मानाने जगण्यासाठी तुझे नाव दिले
तू द्रौपदीला वस्त्र दिले,
तू गोकुळवासीयांना धारिष्ट्य दिले
तू दाखवले कंसाच्या रूपाने दुष्ट व्यक्ती कधी नसतो आपला नातलग 
'परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम' तू करत आलास आयुष्यभर
तू दिलीस "गीता" मानवामात्राला जीवनमार्गदर्शन करणारी अर्जुनाच्या निमित्ताने आणि बनलास जगद्गुरू खऱ्या अर्थाने..
आजही कृष्णा,
जेव्हा मनाला ग्लानी येते,
संकट जीवनाला व्यापून घेते
तेव्हा तुझा चेहरा दिसतो..
तुझी बासरी दिसते...
तुझी गीता दिसते...
आणि अगणित ऊर्जा मिळते..
जणू नवसंजीवनी मिळते..!
कृष्णा,
तू आजही आमच्या मनात आणि इथल्या चराचरात मला जिवंत दिसतो...!
◆राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४


आडवाणींचा अंतरात्मा बीजेपीला शाप देणार का...?

आडवाणींचा अंतर्रात्मा बीजेपीला शाप देणार का..?
Writed by -राजेश खाकरे
एखादी व्यक्ती एखाद्या संस्थेसाठी किंवा पक्षासाठी आपली संपूर्ण हयात वेचून त्या संस्थेला किंवा पक्षाला सर्वोच्चस्थानी नेण्यासाठी धडपडली असेल आणि ती संस्था किंवा पक्ष सर्वोच्चस्थानी असताना त्याच व्यक्तीची जर अवहेलना करणार असेल तर यापेक्षा मोठी दुसरी कृतघ्नता कोणती असू शकेल.
जनसंघाच्या स्थापनेपासून 1951 पासून ते बिजेपीच्या स्थापना 1980 पर्यंत आणि बीजेपीच्या स्थापनेपासून आजपर्यंत लालकृष्ण अडवाणी भारतीय जनता पार्टीसाठी काम करत आहेत. एक वरिष्ठ आणि कणखर नेता अशी त्यांची ओळख आहेच, त्याचबरोबर बीजेपीला राष्ट्रीय पातळीवर एक प्रमुख पक्ष म्हणून ओळख देण्यासाठी ज्या नेत्यांनी प्रयत्न केले आहेत त्यामध्ये लालकृष्ण अडवाणी यांचे नाव अग्रस्थानी आहे. पार्टीचा विस्तार आणि उत्कर्षासाठी त्यांनी आजपर्यंत अनेक महत्वाच्या भूमिका पार पाडल्या. 1951 ते 1957 भारतीय जनसंघाचे सचिव, 1973 ते 1977 भारतीय जनसंघाचे अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेनंतर 1986 पर्यंत पार्टीचे महासचिव, आणि तीन वेळा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अशी संघटनात्मक जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे, 5 वेळा लोकसभा आणि 4 वेळा राज्यसभेत खासदार म्हणून ते निवडले गेले आहेत.
राममंदिर आंदोलनावेळी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा आडवाणीजींनी काढली, या रथयात्रेने अडवाणी आणि बीजेपीला एक नवी ओळख मिळाली.
2014 ला जेव्हा नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली बीजेपीचे पूर्ण बहूमताचे सरकार स्थापन झाले तेव्हा आडवाणींना नक्कीच एखादे चांगले मंत्रिपद देण्यात येईल असे बीजेपीच्या कार्यकर्त्यापासून ते भारतातल्या सर्वसामान्य नागरिकालाही वाटत होते, मात्र तसे घडले नाही, वयाचे कारण देत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आडवाणीसह इतर वरिष्ठ नेत्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवले, हा आडवाणीच्या सन्मानाला आणि स्थानाला धक्का होताच मात्र तो त्यांनी सहन केला, किंबहुना त्यांना तो सहन करावा लागला, एकेकाळचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे आडवाणी काहीसे मऊ मऊ झाले, त्यांना पार्टीत आपल्याला आता किती मान आहे हे त्यावेळीच लक्षात आले असावे, ज्यावेळी पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदीजींचे नाव घोषित करायला त्यांनी विरोध केला होता.
जेव्हा मंत्रीपदापासून आडवाणींना दूर लोटले आणि आडवाणीही मोठ्या संयमाने शांत बसलेले दिसले तेव्हा सर्वानाच असे वाटले की तीन वर्षांनी होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी आडवाणीजीं भाजपाचे उमेदवार असतील. राष्ट्रपतींची निवडणूक जवळ यावी आणि अयोध्या प्रकरणात न्यायालयाचा निकाल यावा हा योगायोग असू शकतो मात्र खरी गोष्ट ही आहे की लालकृष्ण आडवाणी यांना राष्ट्रपती करण्याची भाजपची पर्यायाने पंतप्रधान मोदीजी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांची खरोखर इच्छा होती का..?
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात गृहमंत्री आणि नंतर उपपंतप्रधान हे पद आडवाणींना देण्यात आले, 2008 ला लालकृष्ण आडवाणींचे नाव एन डी ए ने पंतप्रधान पदासाठी जाहीर केले होते मात्र मोठे पद आडवाणीच्याजणू नशिबात नसावे, बीजेपी सत्तेवर आली नाही आणि पंतप्रधान बनण्याचे त्यांचे स्वप्न तसेच अधुरे राहिले.
आज बीजेपीचा सुवर्णकाळ चालू आहे, न्यायालयाच्या निकालानंतर आडवाणींना राष्ट्रपती बनविणे शक्य होते की नाही हे कायद्याचे जाणकार सांगतील मात्र सर्वसामान्य नागरिक म्हणून जे जाणवते त्यात बीजेपीची तशी इच्छाच नसावी हेच जाणवते, आज मोदीजी आणि अमित शहा यांच्यासमोर बोलण्याची कोणात हिंमत आहे असे दिसत नाही.
मुले मोठी झाल्यावर आईवडिलांची जशी अवहेलना एखादया कुटुंबात केली जाते तसेच काहीसे दिसते आहे.काहीही असो, हा 90 वर्षांचा कणखर तरुण मात्र आज मूक आहे, तो बोलणार नाही, कारण बोलून काही उपयोग नाही हे त्यांना जाणवले असावे, आणि या वयात काही वेगळा मार्गही ते निवडू शकणार नाही हे बीजेपीसह सर्वानाच माहिती आहे.
असे असले तरी आडवाणींचा न्याय बीजेपीने केला का??? त्याचे उत्तर नाही असेच आहे. कोणत्याही पक्ष, संस्था, संघटनेसाठी ज्यांनी अविश्रांत मेहनत घेतली त्यांची कृतज्ञता ती संस्था, पक्ष, संघटना तिच्या चांगल्या काळात नक्कीच व्यक्त करू शकते, आणि ती व्यक्त केली गेलीच पाहिजे, जर लालकृष्ण आडवाणीबाबत बीजेपीने न्याय केला नसेल तर, ते जरीही काही बोलत नसले तरी त्यांचा अंतरात्मा नक्कीच बीजेपीला शाप दिल्यावाचून राहणार नाही...!
काल भारताचे 14 वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी शपथ घेतली, त्यांच्या निवडीबद्दल कुणाला आक्षेप असण्याचे काहीही कारण नाही. ते एक शांत,संयमी व्यक्तिमत्व आहेत आणि राज्यघटनेचे अभ्यासक आहेत. तसेच बिहारचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. एका सर्वसामान्य गरीब कुटुंबातुन आलेले रामनाथ कोविंदजी देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाले आहे, हा लोकशाहीचा मोठा विजयच आहे, त्यांना त्यांच्या कार्यकाळासाठी मनापासून शुभेच्छा देतांना काही विचार मनात आले तेच प्रामाणिकपणे या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
-राजेश खाकरे
मो.7875438494
rajesh.khakre@gmail.com
(लेखक हे राजकारणाचे अभ्यासक नाहीत)

कविताचोराची कथा

कविता चोराची कथा
एक कविताचोर होता, एक कशाला बरेच आहेत, "कुठल्यातरी कवीने लिहलेल्या कविता कॉपी करून स्वतःच्या नावाने किंवा निनावी पुढे पाठवणारा, भावना, संवेदना कशाशी खातात याचा गंध नसलेला, आणि स्वतः चा मेंदू पिळून काढला तरी त्यातून एखादीही कविता, चारोळी, किंवा गद्य ओळी टपकणार नाही याची जाणीव झालेला, निर्लज्ज श्रेणीत मोडणारा व्यक्ती म्हणजे कविताचोर होय"
         तर असाच एक कविताचोर होता. घरची परिस्थिती बऱ्यापैकी होती. खाण्यापिण्याचे वांधे अजिबात नव्हते. पोशाखही चांगला असायचा. चांगला दहा-बारा हजाराचा अड्रॉइड मोबाईल वापरायचा, फेसबुक, whatsapp यावर तासनतास online असायचा.
           आजकाल whatsaap, फेसबुक यावर कवितेचे बरेच ग्रुप आहेत. त्यात कवी त्यांच्या भावना शब्दरूपाने काव्यरूपाने लिहितात. Whatsaap च्या अशा कवितेच्या, साहित्याच्या बऱ्याच ग्रुपमध्ये तो शिरला, लिंक हा त्याला अशा ठिकाणी घुसण्याचा सोपा मार्ग असायचा. त्याठिकाणी अनेक कवी, लेखक, त्यांच्या, स्वलिखित कविता, चारोळ्या, लेख टाकायचे, तिथे साहित्याचा सोहळा चालायचा. मात्र हा कविताचोर त्याला एखादी कविता आवडली कि लगेच त्याखालचे नाव काढून स्वतःचे नाव टाकायचा आणि इतर मित्र मैत्रिणीच्या ग्रुपवर टाकायचा, कधी त्याच्या गर्लफ्रेंडला पाठवायचा. कधी स्वतः चे नाव नाही टाकले तर निनावी पुढे पाठवायचा..! असा त्याचा उपक्रम ग्रुपमध्ये चालायचा.
            कधी काय व्हायचे कि स्वतःचे नाव टाकून इतर कवीची रचना पुढे पाठवताना जिथून उचलली त्याच ग्रुपवर जायची, मग मात्र मोठा घोळ व्हायचा, मग एडिटिंग करताना झाले, चुकून झाले, असे काहीबाही उत्तर देऊन निसटून जाण्याचा प्रयत्न करायचा. कधी खूपच प्रकरण तापले तर माफी गिफी मागायचा. एखादा admin खूपच डेंजर असला तर रिमोव्ह पण करायचा. मात्र या सर्व गोष्टींचे त्याला काही वाटायचे नाही. (त्याला काहीच का वाटायचे नाही असा प्रश्न तुम्हाला पडला तर वर दिलेली व्याख्या पून्हा एकदा वाचा.)
           असे प्रसंग घडत असले तरी त्याचा तो कविताचोरण्याचा उपक्रम बंद पडला नाही.बरेच दिवस निघून गेले.
             त्यादिवशी रात्री बारा-साडेबारा वाजता एक अँबुलन्स तिचा तो कर्कश आवाज काढत आणि रात्रीच्या शांततेचा भंग करत सिटी हॉस्पिटल मध्ये शिरली. दरवाजा उघडला, त्यातून 5-7 माणसे व 2 स्त्रीया खाली उतरली. स्ट्रेचरवरून पेशन्टला आत नेण्यात आले, डॉक्टरने त्वरित उपचार सुरु केले. काही तपासण्या करणे आवश्यक होते. नातेवाईकांना सांगून डॉक्टरने ईसीजी, ब्लड, सिटीस्कॅन अशा काही तपासण्या केल्या.
           दुसरा दिवस उगवला. पेशन्टच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली होती. पेशन्टला बघायला कविताचोर आला होता. त्यांची जुनी मैत्री असल्याने तो बघायला आला होता. थोड्याफार गप्पा झाल्या. सहज कविताचोराने पेशन्टची फाईल चाळली, त्यात 4-5 रिपोर्ट होते, खिशातला पेन काढून त्याने त्यावर काहीतरी लिहले. थोड्या वेळाने कविताचोर पेशन्टचा निरोप घेऊन निघून गेला. तासाभराने डॉक्टर नियमित तपासणी करायला आले, त्यांनी पेशन्टची फाईल उघडली आणि त्यांच्या डोळ्यासमोर अंधारीच आली.
त्या फाईलमध्ये 4-5 रिपोर्ट होते.
ईसीजी च्या रिपोर्टवर पेनाने लिहलेले होते,
" हि रचना कोणाची आहे माहीत नाही, ज्याची असेल त्याला लाख सलाम."
ब्लड रिपोर्टच्या खालील डॉक्टरचे नाव खोडून टाकलेले होते. आणि पुढे लिहले होते "खरे डॉक्टर असाल तर फॉरवर्ड करा"
सिटीस्कॅन च्या रिपोर्टखालील डॉक्टरचे नाव खोडून कविताचोराने चक्क स्वतः चे नाव घातले होते. आणि पुढे लिहले होते "कमीतकमी 10 ग्रुपवर तरी पाठवा."
©राजेश खाकरे
मो.7875438494
rajesh.khakre@gmail.com

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...